देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 06:20 AM2020-01-01T06:20:53+5:302020-01-01T06:20:56+5:30

नववर्षाला नव्या उमेदीने सामोरे जात आपण सर्वांनी त्याचे उत्साहात स्वागत करायला हवे. जे होऊ शकले नाही त्याची चर्चा न करता, जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कृतीची खरी गरज आहे. देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

need to encourage youth who are capable of transforming the country | देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज

देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज

googlenewsNext

२०१९ साल संपले आहे आणि २०२० सालचा सूर्योदय झालेला आहे. रात्र तीच आणि रात्रीनंतर येणारा दिवसही तोच. पण माणसाच्या संकल्पनेतून ही कालगणना निर्माण झाली आणि त्यामुळे मानवी जीवनाचे टप्पे निश्चित करणे सुलभ झाले. एखाद्या सत्तेचा कालावधी निश्चित करणे कालगणनेमुळे शक्य झाले आणि त्यामुळे जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची इच्छाही बलवत्तर झाली. माणूस एकसुरी जीवनाला कंटाळतो. त्याला पेहेरावात बदल करावासा वाटतो, घरांच्या रचनेत बदल करावासा वाटतो, सत्ताधीश बदलून टाकावेसे वाटतात. नवे सत्ताधीश आपल्या जीवनात काही नवीन बदल घडवून आणतील, असे माणसाला वाटते. ते घडले नाही तर मग क्रांती होते आणि बदल घडून येतात. रशियाचे विघटन होते, तर युरोपची राष्ट्रे एकत्र येऊन पुन्हा त्यांची वाटचाल विघटनाकडे होताना दिसते. सत्तेवर येणारे सत्ताधीश नव्या कल्पना घेऊन येतात. त्या कल्पना राबविण्याचा प्रयत्न करतात. महात्मा गांधी ग्रामस्वराज्याची कल्पना आणू पाहत होते, तर पंडित नेहरू मोठी धरणे, मोठे उद्योग आणून देशाचा कायापालट घडवायला निघाले होते. त्यांच्या कल्पनेतून पूर्वी ज्या देशात टाचणीचेदेखील उत्पादन होत नव्हते तेच राष्ट्र आता मेट्रो रेल्वेची इंजिने तयार करून निर्यात करू लागले. एक सत्ताधीश बँकांचे राष्ट्रीयीकरण करतो तर दुसरा बँकांच्या खासगीकरणाचा मार्ग प्रशस्त करू पाहतो. कुणी नागरिकांना अच्छे दिन दाखवण्याची स्वप्ने दाखवतात.




आपल्या देशाचे एक राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी तर भारत महासत्ता बनेल, असे स्वप्न २००२ साली बघितले होते. त्यात भारताचे रूपांतर २०२० सालापर्यंत विकसित राष्ट्रात करण्याची कल्पना केली होती. त्यासाठी कृषी, पायाभूत सोयी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान आणि आण्विक तंत्रज्ञानाचा विकास ही क्षेत्रे त्यांनी निवडली होती. पण या गोष्टी सहजसाध्य नाहीत, हे नंतरच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सहज करता येण्याजोग्या गोष्टी करायला सुरुवात केली. त्यांनी कलम ३७० हटवले, नागरिकत्व सुधारणा कायदा केला. पण या अनुत्पादक गोष्टी करून माणसाचा भौतिक विकास घडवून आणणाऱ्या मुख्य गोष्टी मात्र दुर्लक्षित राहिल्या.




कलामांचे व्हिजन २०२० हे नवे २०२० साल प्रत्यक्ष सुरू होत असताना स्वप्नवतच ठरले आहे. कलामांच्या व्हिजनच्या पूर्ततेसाठी देशभरात २००० कलाम केंद्रे स्थापन करण्यात यायची होती. त्या केंद्रांच्या माध्यमातून गाव आणि शहरे यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. प्रत्यक्षात गावे ओस पडत असून, लोकांची धाव शहराकडे सुरू आहे. २०२० सालापर्यंत शेतीचे उत्पादन दुप्पट होणार होते. अन्नावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होणार होते, गरिबीचे पूर्णत: निर्मूलन, संपूर्ण राष्ट्र साक्षर होणे, स्त्रिया व बालके यांच्यावरील अत्याचार समाप्त होणे, सगळे लोक मुख्य प्रवाहात आणणे असे अत्यंत आशादायी चित्र कलामांनी बघितले होते. पण गेल्या २० वर्षांत त्यापैकी काहीच साध्य झालेले नाही.

आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे पाडले जात आहोत, ही भावना लोकांमध्ये बळावली आहे. आणि केंद्र सरकार व राज्यांची सरकारे यांच्यातील समन्वय हरवतो आहे की काय, असे उदासवाणे चित्र समोर उभे राहते आहे. पण त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता जनतेतच आहे. हाँगकाँग या राष्ट्राची अवस्था ४० वर्षांपूर्वी आपल्या देशाप्रमाणे अनागोंदी स्वरूपाची होती. त्या देशाने शक्तिशाली आयोग स्थापन करून भ्रष्टाचार संपवला. भारतालाही तोच आदर्श समोर ठेवून काम करावे लागेल. सध्या राष्ट्राकडूनच सगळे मिळायला हवे ही वृत्ती बळावली आहे आणि राज्यकर्ते त्या वृत्तीला बळ देत आहेत. आजचा तरुण देशात परिवर्तन घडवून आणण्यास सक्षम आहे. राजकारण्यांनी त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवीन वर्षाला नव्या उमेदीने सामोरे जायचे आहे. त्याच पद्धतीने आपण सर्वांनी नववर्षाचे स्वागत करायला हवे. जे होऊ शकले नाही त्याची चर्चा न करता, जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कृतीची खरी गरज आहे.

Web Title: need to encourage youth who are capable of transforming the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.