नवज्योतसिंग क्लीन बोल्ड बाय सिद्धू; अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:31 AM2021-10-03T10:31:59+5:302021-10-03T11:01:54+5:30

सिद्धुनं त्या सामन्यात १२४ धावा तडकावल्या. त्यात ८ उत्तूंग षटकार होते. यातले सहा षटकार तर त्याने एकट्या मुरलीधरनलाच  खेचले होते

Navjyot Singh Clean Bold By Sidhu! He could not become a 'captain' like Amarinder Singh | नवज्योतसिंग क्लीन बोल्ड बाय सिद्धू; अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली! 

नवज्योतसिंग क्लीन बोल्ड बाय सिद्धू; अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली! 

Next

सृकृत करंदीकर

सन १९९४. उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस. जानेवारीतला अठरावा दिवस. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी क्रिकेट  मालिकेतल्या पहिल्याच सामन्यासाठी लखनौचं मैदान खचाखच भरलेलं. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननं नाणेफेक  जिंकून फलंदाजी  घेतली. मनोज प्रभाकर आणि नवज्योतसिंग सिद्धू ही सलामीची जोडी मैदानात उतरली. फिरकी गोलंदाजी ही श्रीलंकेची ताकद होती.  मुथय्या मुरलीधरन या विशी-बाविशीतल्या श्रीलंकेच्या ऑफ-स्पिन गोलंदाजानं आंतरराष्ट्रीय पदार्पण करुन जेमतेम वर्षच झालं होतं.  पण तेवढ्यातही मुरलीधरनचं नाव गाजू लागलं होतं. दुसऱ्या बाजूला नवज्योतसिंग सिद्धुला भारताकडून खेळण्यास सुरवात करुन तोवर दहा वर्षं झाली होती. छातीपर्यंत उसळणाऱ्या, कानाजवळून सुसाट जाणाऱ्या चेंडूंसमोर सिद्धुची बॅॅट फार बोलत नसे.  पण फिरकी,  मध्यमगती गोलंदाज समोर आले की सिद्धुचे डोळे लकाकत. भारताविरुद्ध पहिलाच सामना खेळणाऱ्या मुरलीधरनला याचा अनुभव  लवकरच आला. 

सिद्धुनं त्या सामन्यात १२४ धावा तडकावल्या. त्यात ८ उत्तूंग षटकार होते. यातले सहा षटकार तर त्याने एकट्या मुरलीधरनलाच  खेचले होते. क्रीज सोडून पुढं सरसावत जात मुरलीधरनला त्यानं लॉंग-ऑन, लॉंग-ऑफवरुन लांबवर भिरकावलं होतं. पुढं हाच मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल आठशे बळी मिळवणारा जगातला एकमेव गोलंदाज ठरला. पण भारतातला पहिला दौरा तो आयुष्यभर विसरु  शकला नाही. ‘षटकार ठोकणारा सिद्धू’ अशीच त्यानं त्याची ओळख कसोटी आणि वन-डेतही निर्माण केली होती. भारताच्या दौऱ्यावर  आलेल्या शेन वॉर्ननं नंतर सांगितलं होतं, ‘माझ्या गोलंदाजीवर क्रिजबाहेर सरसावत माझ्या डोक्यावरुन मला फेकून देणारा सचिन माझ्या स्वप्नात येतो आणि माझी झोपच उडते. ’ पण याच वॉर्नला क्रीजबाहेर येत फिल्डरच्या डोक्यावरून फटकावण्याची सुरुवात  सिद्धूनं आधी केली होती. करिअरच्या सुरवातीला मात्र  सिद्धुला फार चमक दाखवता आली नव्हती. एवढंच काय  पण ‘स्ट्रोकलेस’  अशी त्याची हेटाळणीही झाली. संघातलं स्थान त्याला गमवावं लागलं. त्यानंतर सिद्धुनं खूप मेहनत केली. 

१९८७ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये ती फळालाही आली. या मालिकेत सिद्धुनं सलग चार अर्धशतकं ठोकली.  १९९६ च्या भारतात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वर्ल्ड कपमध्येही सिद्धू एक अविस्मरणीय खेळी खेळून गेला. खरं तर ती फार कोणी लक्षात  ठेवत नाही. मैदान होतं बंगळुरूच आणि मुकाबला होता थेट पाकिस्तानशी. दोनच गोष्टींमुळं हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायमचा लक्षात राहिला. एक म्हणजे अखरेच्या षटकांमध्ये अजय जडेजानं केलेली वकार युनूसची बेदम कत्तल आणि वेंकटेश  प्रसादनं उद्दाम  आमिर सोहेलच्या उखडलेल्या दांड्या. पण हे दोन्ही घडण्यापूर्वी सिद्धू हाच भारताच्या डावाला आकार देणारी ९३ धावांची मजबूत खेळी  खेळून गेला होता. त्याच्या जोरावरच भारताने २८७ धावांचा डोंगर उभा केला ज्यापुढं पाकिस्तान नेस्तनाबूत झाला. 

१९९६ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्त्वाखाली भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. दौरा चालू असताना मधूनच सिद्धू महाशय स्वत:चं  कीट उचलून निघाले आणि कोणालाही न सांगता थेट भारतात परतले. असा प्रसंग यापूर्वी कधीच न घडल्यानं बीसीसीआयनं  चौकशी  समिती नेमली. तेव्हा सिद्धू एकच सांगत राहिला ते म्हणजे, ‘मेरी गलती मै मानता हूँ.’ पण दौरा अर्धवट टाकण्याचा वेडगळपणा का केला  हे त्यानं कधीच सांगितलं नाही. बहुधा चूक मान्य केल्यानं त्याला वेस्टइंडिज दौऱ्यावर नेण्यात आलं. त्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनला  सिद्धुनं सलग अकरा तास फलंदाजी करुन द्विशतक ठोकलं. त्यानंतर मात्र फार काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकला नाही. त्याचं क्रिकेट करिअर चढउताराचं पण चमकदार राहिलं. कसोटीतली ४२ ची आणि वनडेतली चाळीसला टेकणारी त्याची सरासरी वाईट अजिबातच नाही. त्याच्या रुपानं भारताला एक चांगला सलामीवीर मिळाला होता.  पण १९९८-९९ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सुमार  कामगिरीमुळं त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून वगळलं. त्यानंतर १९९९ मध्ये त्यानं ‘नो रिग्रेट्स’ म्हणत क्रिकेटला तडकाफडकी राम राम ठोकला. निवृत्त होताना त्याला इंग्लंड दौऱ्यातल्या ‘त्या’ घोडचुकीबद्दल विचारणा झाली त्यावेळी त्याचं उत्तर  होतं,  ‘मी  भूतकाळाचा किंवा भविष्याचा फार विचार करत नसतो.’ सिद्धूच्या व्यक्तिमत्वातला हाच दोष असावा. सिद्धुच्या संघ सहकाऱ्यांचा  अनुभव असा की सिद्धू बऱ्यापैकी अबोल आणि एकलकोंडा होता. सिद्धुनं आणि त्याच्या मित्रानं १९८८ मध्ये रस्त्यावरच्या भांडणात एका  वयस्कर माणसाला बॅॅटनं इतकं मारलं की त्यात त्याचा मृत्यू झाला. सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरुन सिद्धुला तीन वर्षांचा तुरुंगवास  ठोठावण्यात आला. नंतर तो जामीनावर सुटला. क्रिकेट समालोचक म्हणून २००१ मध्ये माईक हाती घेतलेला नवाच सिद्धू जगासमोर  आला. मंदिरा बेदी-सिद्धू या जोडगोळीनं क्रिकेट कॉमेंट्रीचं स्वरुपच बदलून टाकलं. क्रिकेटपेक्षा  जास्त चाहते  सिद्धूनं त्याच्या अखंड  बडबडीतून मिळवले. या लोकप्रियतेच्या बळावर २००४ मध्ये तो भाजपाचं कमळ  हाती घेऊन  अमृतसरमधून खासदार झाला. पण  १९८८ मधल्या खून प्रकरणात दोषी आढळल्यानं त्यानं २००६ मध्ये राजीनामा दिला. सर्वोच्च  न्यायालयानं त्याची शिक्षा स्थगित केल्यावर  पुन्हा २००७ मध्ये पोटनिवडणूक  जिंकली. २००९ मध्ये अमृतसरमधून विजयाची पुनरावृत्ती  केली. 

भाजपानं २०१४ मध्ये अरुण जेटलींसाठी सिद्धूला तिकीट नाकारलं. एव्हाना अनेक कॉमेडी शो, रिऍलिटी शो यातून  सिद्धू ‘टीव्ही स्टार’  बनला. या लोकप्रियतेनं त्याची महत्वाकांक्षा वाढवली. भाजपानं त्याला राज्यसभा दिली पण त्यानं तो समाधानी नव्हता. भाजपामध्ये नरेंद्र  मोदींशी त्याचं जुळलं नाही. आपमध्ये अरविंद केजरीवालांशी संधान साधण्याचा प्रयत्न असफल ठरला. ‘आवाज-ए-पंजाब’ ही आघाडी काढून पाहिली आणि लगेच गुंडाळलीही. सिद्धुचे वडील भगवंतसिंह पंजाब कॉंग्रेसचे नेते होते. शेवटी त्यानं वडलांचा पक्ष जवळ केला  आणि कॅॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या ‘टीम’मधे पंजाबचा मंत्री झाला. पण तिथंही मांड पक्की बसण्याआधीच त्याला सिंहासन खुणावू लागलं. भारतीय क्रिकेटमध्ये पंधरा-सोळा वर्षं खेळल्यानंतरही सिद्धू कधीच कर्णधार बनू  शकला नाही. ना  संघातलं स्थान त्याला  कधी भक्कम राखता आलं. अमरिंदरसिंग यांची जागा घेण्याची घाई केली पण फासे असे पडले की  त्याला  पालखीचं भोई  व्हावं  लागलं.  संयम, दुरदृष्टीचा अभाव, उतावीळपणा आणि प्रसंगी माघार न घेण्याचा हट्टीपणा  यामुळं सिद्धुचं  राजकीय भवितव्य अस्थिरतेच्या गर्तेत आहे. अमरिंदरसिंग यांनी जाहीर केलेल्या व्यक्तिगत वैराची त्यात भर पडली आहे. क्रीज सोडून पुढं सरसावत चेंडू मैदानाबाहेर भिरकावून देण्यासाठी आत्मविश्वास लागतो, धाडस असावं लागतं आणि थोड़ी बेफिकिरीही. क्रिकेटमध्ये हे गुण सर्वोच्च धावा मिळवून देतात आणि भरपूर  टाळ्या-शिट्याही. सिद्धूला हे क्रिकेटमध्ये जमलं. पण क्रिकेटच्या मैदानातला 'सिक्सर किंग' सिद्धू याच आत्मविश्वास, धाडस आणि बेफिकिरीच्या बळावर राजकारण खेळायला गेला.  

क्रिकेटमध्ये ‘हिट विकेट’ असते. यात फलंदाज स्वत:च्याच चुकीनं यष्ट्या उध्वस्त करतो, स्वयंचित होतो आणि त्याला तंबूत परतावं  लागतं. सिद्धूनं राजकारणात तेच केलं आहे. क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता पण तो ‘सुनील गावस्कर’ कधी बनू  शकला  नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्यानं निवडणुका जिंकल्या पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको  ताली

(लेखक लोकमत पुणेचे सहसंपादक आहेत)

Web Title: Navjyot Singh Clean Bold By Sidhu! He could not become a 'captain' like Amarinder Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.