मुल्ला-लष्करातील साटेलोटे हे पाकिस्तानचे खरे दुखणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:20 IST2025-06-12T11:17:34+5:302025-06-12T11:20:05+5:30
Pakistan: पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि लष्करानेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले, हेच सत्य होय!

मुल्ला-लष्करातील साटेलोटे हे पाकिस्तानचे खरे दुखणे
- वप्पला बालचंद्रन
(मंत्रिमंडळ सचिवालयाचे निवृत्त विशेष सचिव)
मुल्ला मंडळींबरोबर पाकिस्तानी सैन्याचे साटेलोटे जनरल झिया-उल-हक लष्करप्रमुख झाले होते तेव्हापासूनचे, म्हणजे १९७६ पासूनचे असल्याचा सर्वसाधारण समज आहे; परंतु तो बरोबर नाही. त्याची प्रक्रिया खूप आधी सुरू झालेली होती. पाकिस्तानमधील ‘फ्रायडे टाइम्स’ने ९ नोव्हेंबर २०२१ रोजी असे म्हटले आहे की, १९४७ साली भारतातील काश्मीरशी संघर्ष उद्भवला, तेव्हापासून सशस्त्र बंडखोर पुरविण्याचे काम राजकीय पक्ष करत आले आहेत.
काश्मीर संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी महाराजा हरिसिंग यांची संमती मिळविणाऱ्या व्ही. पी. मेनन यांनी १९५६ साली लिहिलेल्या ‘द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स’ या पुस्तकात याला दुजोरा देणारा उल्लेख आहे.
सीमेवरील वन्य जमातीचे सुमारे ५ हजार सशस्त्र बंडखोर दोन-तीनशे लॉऱ्यांमध्ये भरून २२ ऑक्टोबर १९४७ रोजी चाल करून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यात आफ्रिडी, वझीर, मेहसूद आणि स्वाथीज् अशा जमातींच्या टोळ्या होत्या.
१९९३ ते ९६ या काळात बेनझीर सरकारमध्ये जनरल नसीर उल्ला बाबर हे गृहमंत्री होते. अफगाण तालिबानची निर्मिती त्यांनीच केली. २००७ साली एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, ‘पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि सैन्याच्या आघाडीनेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले.’
१९७१ च्या पराभवानंतर झुल्फिकार अली भुत्तो यांना मुल्ला आणि लष्करातील साटेलोटे तोडता आले असते; परंतु त्यांनी राजकीय लाभासाठी धर्माचा उलट जास्त वापर केला. १९७४ मध्ये त्यांनी दुसरी जागतिक इस्लामिक शिखर बैठक लाहोरमध्ये भरवली. त्याचवर्षी त्यांनी मध्ये अहमदियाना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. ते मुस्लीम राहिले नाहीत. रविवारऐवजी शुक्रवार हा त्यांनी सुट्टीचा दिवस जाहीर केला.
‘द मिराज ऑफ पॉवर इन्क्वायरी इन टू भुत्तो इयर्स, १९७१-१९७७’ या पुस्तकात झुल्फिकार अली भुत्तो यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मुबशीर हुसेन म्हणतात, ‘सरकारी माध्यमातील सरंजामदार आणि त्यांच्या नोकरचाकरांनी मुल्लांमध्ये आणखी मुल्लापण भरले.’
भुत्तोंशी जवळीक असलेले खालीद हुसैन म्हणतात, ‘भुत्तोंनी पाकिस्तानी लष्कर आणि त्याच्या नीतिधैर्याची पुनर्बांधणी केली. १९७१च्या नामुष्की झालेल्या युद्धानंतर ती आवश्यक होती. परंतु त्यांनी एक चूक केली. लष्कराची ताकद त्यांनी स्वतःला बळकट करण्यासाठी वापरली. लष्करावर विसंबून राहण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. उलट त्यांनी नागरी व्यवहारापासून लष्कर दूर ठेवायला हवे होते; परंतु तसे घडले नाही.’
अफगाण युद्धासाठी मूलतत्त्ववादी इस्लामी शक्ती एकत्र केल्याचा आरोप झियांवर होतो; परंतु ही चूक कितीतरी आधी १९७३ साली भुत्तोंनी केली होती. कारण अगदी वेगळे होते. मोहम्मद दाऊद खान यांनी अफगाणिस्तानमध्ये बंड करून चुलत भाऊ किंग मोहम्मद जहीर शाह यांची राजवट उलथून टाकली, तेव्हा हे घडले. ब्रिगेडियर नसीरुल्ला बाबर त्यावेळी सीमावर्ती स्काउटचे प्रमुख होते.
दाऊदला विरोध करण्यासाठी गुलबुद्दीन हिकमत्यार यांच्यासारख्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घ्यायला भुत्तो यांनीच बाबर यांना सांगितले. आयएसआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घेण्याचा प्रघात पडला आणि नंतर तेच पाकिस्तानचे धोरण झाले. याच नसरुल्ला बाबर यांनी बेनझीर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबान्यांना मदत पोहोचविण्यासाठी १९९४ साली त्यांनी अफगाण सेल तयार केला. क्वेट्टा ते मध्य आशिया असा जाणारा महत्त्वाचा हमरस्ता युद्धखोरांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अफगाणांची ताकद वापरण्याची कल्पना बेनझीर यांची होती. अर्थातच, अमेरिकेचे व्यापारी हितसंबंध त्यामागे होते.
मुल्ला आणि लष्कर यांचे साटेलोटे पाकिस्तानमध्ये खोलवर मुरलेले आहे. त्या देशाच्या परदेशी मालकांचे तुष्टीकरण करण्यासाठी अत्यंत हुशारीने त्यात विविधरंगी बदल होत असतात आणि त्यावरच तो देश जगत आलेला आहे.
(लेखातील मते व्यक्तिगत.)