बहु झाला कल्लोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:02 PM2018-12-04T18:02:46+5:302018-12-04T18:03:20+5:30

अत्र-तत्र-सर्वत्र कसा आनंद भरुन वाहतोय. गुजरातमध्ये वेडा झालेला विकास महाराष्टÑात आल्यावर एकदम हुश्शार झालाय. अगदी त्याची बुध्दिमत्ता मापन चाचणी घेतली तर अनेक समुपदेशकांनी तोंडात पाची बोटे घातली.

Much giggling! | बहु झाला कल्लोळ!

बहु झाला कल्लोळ!

Next

मिलिंद कुलकर्णी
अत्र-तत्र-सर्वत्र कसा आनंद भरुन वाहतोय. गुजरातमध्ये वेडा झालेला विकास महाराष्टÑात आल्यावर एकदम हुश्शार झालाय. अगदी त्याची बुध्दिमत्ता मापन चाचणी घेतली तर अनेक समुपदेशकांनी तोंडात पाची बोटे घातली. विकासासाठी किती हा आटापिटा, खटाटोप...किती ही मेहनत, परिश्रम..अधिकारी म्हणू नका, पदाधिकारी म्हणू नका, लोकप्रतिनिधी म्हणू नका...सगळे खपतायत विकासासाठी...अर्जुनाचे सारे लक्ष्य केवळ आणि केवळ माशाच्या डोळ्याकडे होते, अगदी तसेच सगळ्यांचे लक्ष्य केवळ २०१९ या आकड्याकडे आहे.
महाराष्टÑ प्रांतीचा जळगाव हा सुभा तसा सुपीक. शतप्रतिशतची मात्रा यशस्वी. विकास याठिकाणी सौख्यभरे नांदतोय. विकासपुरुष, संकटमोचक, आरोग्यदूतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. विकासपुरुषांना सध्या पक्षाने अल्पकाळ (?) विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चाळीस वर्षांपासून अथकपणे हे विकासपुरुष कार्यरत आहेत. पक्ष म्हणू नका, मतदारसंघ म्हणू नका, जिल्हा म्हणू नका, खान्देश म्हणू नका, पुन्हा समाज म्हणू नका...कुणाचा विकास त्यांनी केला नाही. नव्या दमाचा सारथी लाभल्यावर विकासपुरुषांना पक्षाने ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगण्याच्या भूमिकेत स्थापित केले. पक्षाच्या या निर्णयाचा आदर करीत विकासपुरुषांनी पक्षवाढीसाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांऐवजी कार्यकर्त्यांना सत्तास्थाने देण्यासाठी, खान्देश आणि अर्थात जळगावची राहिलेली छोटी-छोटी विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, परिश्रम आणि मार्गदर्शन सुरु केले आहे. दोन-अडीच वर्षात सत्तास्थानी नसल्याचा खेद, दु:ख एवढेच काय अन्याय तर दूर राहिला, अंतमर््ानी व्यक्त केला नाही. जाहीरपणे व्यक्त करण्याची शक्यता तर केवळ असंभव. कायम पक्षाविषयी अभिमान, कौतुक आणि पक्षाने दिलेल्या मान सन्मानाविषयी कृतज्ञतेची भाषा..किती थोर विचार आणि किती थोर कृती...
राहिले ते आमचे संकटमोचक. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र आबादीआबाद आहे. सिंचनाची सगळी कामे झाली आहेत. दुष्काळातही सगळी धरणे धो-धो वाहत आहे. कालवे, बंधाऱ्यांमध्ये खळखळ पाणी नाचत आहे. शेती, बांधापर्यंत पाणी पोहोचले आहे. शेतकºयाला प्रधानसेवकांच्या संकल्पनेनुसार दुप्पट नफा होत आहे. ‘मेडिकल हब’ साकारले आहे. जळगावकरांना एखादा जरी आजार झाला तरी तो ‘हब’मध्ये जातो आणि कोणती पॅथी निवडावी,असा क्षणभर विचार करतो, लगेच ‘आरोग्यदूतां’ची फौज धावत येते. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी,नॅचरोपॅथी असे कोणत्या पॅथीचे उपचार घ्यायचे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले जाते. सगळे उपचार, शस्त्रक्रिया, नंतरच्या सुविधा सगळ्याच एका छताखाली मिळत आहेत. सगळे प्रश्न सुटले आहेत. शतप्रतिशत झाले आहे. जनतेवर, पक्षावर कोणतेही संकट राहिले नसल्याने संकटमोचकांकडे मग श्रेष्ठींनी इतर सुभ्यांची जबाबदारी सोपविली आहे. कधी पालघर, कधी पारनेर, कधी नाशिक, कधी धुळे...एवढंच काय मोर्चा, उपोषण, आंदोलन असे काहीही असो...सगळ्यांवर एकच उपाय..संकटमोचक.
तिसरे नेतृत्त्व तर अचाट, अफाट आणि विस्मयकारी असे आहेत. कधी काळी जळगावात सायकलवर फिरुन संघटनात्मक कार्य करणाºया या नेत्याने समाज, पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेला वैचारिक, बौध्दिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक एवढी उंची गाठून दिली आहे की, हे नेते येतात रेल्वेने आणि जातात विमानाने. वेळ म्हणून विचारु नका. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कार्यालय थाटून हे जनहिताच्या फाईलींचा निपटारा करतात. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना २०१९ चे मुख्यमंत्री त्यांच्यात दिसून येतात, असे हेच सांगतात. करवीर ते जळगाव व्हाया मुंबई असे कष्ट घेतलेल्या नेत्याला बक्षीस मिळायला नको.
इतके प्रगल्भ, समजूतदार, द्रष्टे नेतृत्व लाभलेल्या जिल्ह्याला प्रशासकीय अधिकारीदेखील त्याच उंचीचे मिळणार हे स्वाभाविक. शासकीय सेवेचा मिळालेला कालावधी जळगावसाठी परिपूर्णपणे खर्च करुन आता या मंडळींना लपंडाव खेळायची लहर आली तर काय हरकत आहे. सतरा मजलीत ११ महिने घालविलेल्या आणि ‘जीव गुंतला’सारखी स्थिती झाल्याने पुन्हा एकदा तिकडे जावे का, असे द्वंद्व ब्रिटिशकालीन इमारतीतील सेवकाला वाटले तर त्याचे नवल काय? मुंबईला तर सगळेच जातात, पण अदलाबदल करायला काय हरकत आहे? आणि जोवर ‘पालकां’चा हात डोक्यावर आहे तोवर, कोणत्याठिकाणी काय व्हायला हवे, हे आम्ही सांगणार हे पालकत्वाच्या भावनेतून आहे, हे समजून घ्या. जर नाही समजून घेतले तर खेळण्यातली मोटार आणि चार तासांचे साखळी उपोषणाचे हत्यार हाती आहेच की हो...सोडू का..
असा सगळा कल्लोळ माजलेला असताना आपण ‘आनंद’ घ्यायचा दुसरे काय?

Web Title: Much giggling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.