चित्रपट बनवणे हे स्वयंपाक रांधण्यासारखेच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 08:42 IST2021-05-15T08:40:39+5:302021-05-15T08:42:55+5:30
पंगतीत बसलेल्या अनेकांना एखादी भाजी आवडली नाही, तर “मी बनवलेल्या पदार्थाची चवच त्यांना कळली नाही,” असे एखादा स्वयंपाकी म्हणू शकतो का?

चित्रपट बनवणे हे स्वयंपाक रांधण्यासारखेच!
सत्यजित राय, ख्यातनाम दिग्दर्शक
पुण्याला मी ५-६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आणि तेही एकदाच आलो होतो, तेव्हा मनावर कोरला गेला तो फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरातला तजेलदारपणा.
चित्रपटाबद्दल गहन चर्चा करताना, त्याची मीमांसा करताना, त्याबद्दल विचार करताना, वाचन करताना आणि वादविवाद घालताना आणि कदाचित चित्रपटाची स्वप्ने पाहताना असे चित्रपटाच्या वेडात गुंग होऊन गेलेले तरुण-तरुणी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. निष्ठुर अशा फिल्म इंडस्ट्रीच्या दबावाचा स्पर्शही न झालेला उत्साह, आशावाद मी येथे अनुभवला. असे वातावरण फक्त एका फिल्म स्कूलमध्येच असू शकते. काही लोक आजूबाजूचे पाहून, मन लावून आपापल्या परीने शिकतात, आणि प्रगतीच्या शिड्या चढतात. बाकीचे लोक प्रस्थापित कलाकारांबरोबर बरीच वर्षे काम केल्यामुळे शिकतात. पण, ही प्रक्रिया काही आपोआप होत नाही. ही विद्या त्यांना बळजबरीने मागून घेऊन मिळवावी लागते.
काही प्रस्थापित कॅमेरामन तर आपली व्यावसायिक गुपिते अशी राखून ठेवताना मी पाहिले आहे, की त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मदतनिसांना शॉटनुसार कॅमेराची पोझिशन कशी राहणार आहे याची माहिती मिळणेसुद्धा मुश्कील व्हावे! पण, निदान कॅमेरामनजवळ लपवून ठेवण्यासारखी काही गुपिते असतात तरी! एखादा अनुभवी नटसुद्धा त्याच्याबरोबर सीन करत असलेल्या नवशिक्या अभिनेत्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगू शकतो. परंतु या सर्वांना सांभाळणारा जो दिग्दर्शक, त्याचे काय? त्याच्याजवळ सर्वांपासून लपवण्याजोगी काही गुपिते असतात का? दिग्दर्शकाजवळ (या कलेस आवश्यक) असे शिक्षण असते का? मुळात त्याला अशा शिक्षणाची गरज असते का?
- मी खात्रीपूर्वक सांगतो, निदान आपल्या देशात तरी ज्या प्रकारचे चित्रपट बनतात त्यामध्ये दिग्दर्शकाचे काडीचेही योगदान नसते. दिग्दर्शक काही करत नाही; कारण त्याला काही माहीतच नसते. तुम्ही विचाराल हे कसे शक्य आहे? तर उत्तर अगदी सोपे आहे.
चित्रपट बनवत असताना अनेक कला प्रकारातील लोक आपापल्या परीने योगदान देत असतात. त्यापैकी दिग्दर्शकाचे नक्की काय योगदान असते ते अचूकपणे सांगणे खूप कठीण असते. या गोष्टीचाच नेमका फायदा हा स्वयंघोषित दिग्दर्शक उठवतो. अभिनेते, छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक यांचे काम आपण पाहू शकतो आणि जोखू शकतो. कर्णेद्रियांद्वारे आपल्याला आवाजाची गुणवत्ता कळू शकते. अभिनेता जे संवाद बोलतो त्याद्वारे लेखकाचे काम आपण तपासतो. ज्या प्रकारे कथा पुढे सरकते त्याद्वारे पटकथेची ताकद आपल्याला कळते. एखादा निपुण दिग्दर्शक या सर्व कला प्रकारांना व्यवस्थित एका सूत्रात बांधून त्याला हवा तसा चित्रपट बनवू शकतो. जेणेकरून त्या चित्रपटावर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची छाप आढळून येईल. हे तो कितपत साध्य करतो याची त्या चित्रपटाशी निगडित असणाऱ्या थोडक्या मंडळींव्यतिरिक्त इतरांना सुतराम कल्पना नसते. पण, मजेची गोष्ट म्हणजे या दिग्दर्शकाजवळ ना ती कुवत असते ना त्याला कोणावर प्रभाव टाकायचा असतो. आपली पोटापाण्याची सोय कशी होईल याच्याशीच फक्त त्याचा मतलब असतो आणि शूटिंग संपले रे संपले की त्या चित्रपटाशी त्याला काही देणे-घेणे नसते. पुढचे सगळे तो एडिटरवर सोपवून मोकळा होतो. जेवढे काही शूटिंग झालेले आहे त्याची एक सूत्रबद्ध मांडणी करू शकेल असा आणि त्याला अपेक्षित असे काम करू शकणारा एडिटर निवडणे एवढेच त्या दिग्दर्शकाचे चातुर्य. कंटिन्युइटीची काळजी घेणारे, शॉट बरोबर आहेत की नाही ते पाहणारे आणि कदाचित दिग्दर्शकाला ॲक्शन असे ओरडण्याची तसदी देण्यापासून वाचवणारे असे अनेक उत्तम साहाय्यकही त्याने जमा केलेले असतात. एवढा चाणाक्षपणाही त्याच्यात नक्की असतो.
आता तुम्ही विचाराल, असल्या अडाणी माणसावर विश्वास ठेवून निर्माता का बरे पैसे लावेल?- तर त्याचे उत्तर नाही असे आहे. निर्माता विश्वास ठेवतो तो बाकीच्या गोष्टींवर म्हणजे मुख्यतः स्टार्सवर, त्याचप्रमाणे गाण्यांवर आणि कधी कधी चुकूनमाकून कथेवरसुद्धा. पण, सर्वांत धोक्याची बाब म्हणजे चित्रपट विद्येशी दुरान्वयेही संबंध न आलेल्या मनुष्याने मी आत्ताच वर्णन केलेल्या परिस्थितीमध्ये बनवलेल्या अशा चित्रपटाला लोकप्रियता मिळू शकते, स्वयंघोषित समीक्षक अशा चित्रपटाची प्रशंसा करतात आणि दैवदुर्विलास म्हणजे अशा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळू शकतो.
मी शाळेत शिकत होतो त्या सुमारासच माझे स्वतःचे चित्रपटाविषयीचे शिक्षण सुरू झाले. चित्रपटगृहे म्हणजे माझा जणू वर्गच होता. त्याच्यात भर पडली ती सिनेमांवरची पुस्तके वाचून आणि मग नंतर चित्रपट बनवायच्या धंद्यात प्रत्यक्ष पडल्यानंतर. जो व्यावसायिक सिनेमा म्हणून ओळखला जातो तो मी सार्वजनिक चित्रपटगृहांमध्ये पाहिला. हे चित्रपट इंग्रजी भाषेत होते; काही ब्रिटिश, बाकीचे बहुतेक अमेरिकन आणि यामध्ये कधी कधी भारतीय, फ्रेंच किंवा सोवियत सिनेमे. त्या काळात माझ्यासाठी व्यावसायिक ही संज्ञा काही लांच्छनास्पद नव्हती. सिनेमाची आर्थिक परिभाषा समजण्यास त्यामुळे उलट मदतच झाली. कारण चित्रपट बनवायचा म्हणजे भरपूर पैसे घालावे लागणार आणि तो पैसा परत मिळवायचा तर जास्तीतजास्त लोकांनी तो पाहिला पाहिजे.
यापैकी काही व्यावसायिक चित्रपट चांगले तर काही वाईट होते. असे खराब सिनेमे म्हणजे काय करू नये याविषयीचे उत्तम धडेच! वाईट चित्रपटाबद्दलची माझी व्याख्या सुस्पष्ट होती; जो चित्रपट आपले ध्येय गाठण्यात अयशस्वी ठरतो तो वाईट. जो सिनेमा आपले म्हणणे मांडण्यात सफल होतो तो चांगला चित्रपट! अतिशय भिकार चित्रपटांपासून ते अत्यंत तरल अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांना ही व्याख्या लागू होते. प्रत्येक चित्रपट हा कलात्मकच असला पाहिजे हे काही माझ्या डोक्यात नव्हते. मी फक्त अत्युत्तम कलाकृतीच पाहिल्या असत्या तर कदाचित मी काहीच शिकलो नसतो. प्रेरणा ही एक अनाकलनीय गोष्ट असते आणि त्या प्रेरणेतून निर्माण झालेली कलाकृतीही गूढच राहते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे तिचे आकलन अशक्य होते. जास्त काही शिकवण्यापेक्षा असे चित्रपट बोधप्रद असतात.
ठळक आणि स्पष्ट अशा कथेतून आणि ज्यामध्ये फार काही अस्पष्ट गंभीरता नाही अशा चित्रपटातूनच बऱ्यापैकी शिकवण मिळते. तांत्रिक बाबी तर यातून शिकण्यासारख्या असतातच; पण अनेकदा कला आणि व्यवसाय यांचा जो सुंदर मेळ यांत साधलेला असतो तो जास्त अनुकरणीय असतो. हे समीकरण ज्या वेळी बिघडते आणि चित्रपट अयशस्वी ठरतो त्या वेळी सगळा दोष मात्र दिग्दर्शकाच्या पदरात येतो. चित्रपटाच्या दर्जाच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या प्रेक्षकांना दोष देण्याची प्रथा त्या काळात नव्हती. कारण चित्रपट बनवण्यापूर्वी ज्या प्रकारचा प्रेक्षक आहे त्याची पातळी दिग्दर्शकाने विचारात घेणे अपेक्षित असायचे. हे म्हणजे स्वयंपाक बनवण्यासारखेच झाले. समजा खूप लोक जेवत आहेत आणि त्यांना एखादी ठरावीक भाजी आवडली नाही तेव्हा “मी बनवलेल्या पदार्थाची चवच त्या लोकांना कळली नाही,” असे म्हणायला स्वयंपाक्याला बिलकूल वाव नसतो. ज्या प्रकारचा चित्रपट तुमच्यापैकी बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्या चित्रपटाची निर्मिती ही अशा अन्नाप्रमाणे त्याचे ग्रहण करण्याच्या आणि आस्वाद घेण्याच्या हेतूनेच झालेली असते. जोपर्यंत रिळे डब्यात पडून असतात तोपर्यंत तो चित्रपट मृतवत असतो. थिएटरमध्ये लागल्यानंतर प्रेक्षक ज्या वेळी पडद्यावर पाहतात त्याचवेळी तो चित्रपट जिवंत होतो आणि त्याचा हेतू साध्य होतो.
एक पुरोगामी, राजकीय आणि तुम्हाला हवा तसा चित्रपट बनवण्याची स्वप्ने तुम्ही पाहात असलात, तर अशा प्रेक्षकांचा तुम्ही विचार केलाच पाहिजे. फक्त स्वान्त सुखाय असा किंवा काही थोडक्या समूहाच्या आनंदाकरिता चित्रपट बनवण्याच्या इच्छेमध्ये मूलतः काही गैर नाही. पण मग आर्थिक बाबींचा विचार पूर्णपणे बाजूला सारून दिल्यावरच हे शक्य आहे. ज्याला कोणाला असा स्वान्त सुखाय चित्रपट बनवायचा आहे आणि आर्थिक बाबींशी काहीही देणेघेणे ठेवायचे नाही त्यांनी लवकरात लवकर एक उदार निर्माता मिळो अशी प्रार्थना फक्त मी करू शकतो. तुम्ही खरे प्रतिभावंत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे चित्रपट बनवा; आज ना उद्या तुम्हाला तुमचा प्रेक्षकवर्ग निर्माण करता येईल. तसे नसेल आणि तरीही तुम्हाला या धंद्यात टिकून राहायचे असेल तर मात्र तडजोडीच्या मार्गाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही गत्यंतर नाही.
अशा कलंदरांना सिनेमा व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात नसली तरी त्याच्या कडेला, परिघावरती मात्र नक्कीच जागा असेल. समांतर सिनेमालासुद्धा आपले मार्केट आणि स्वतःचा प्रेक्षक शोधावा लागेल. अशा या परिस्थितीत तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवलेले असतील तरच तुम्हाला स्वप्ने पाहणे परवडू शकेल.
ही गोष्ट अशक्यप्राय वाटू शकेल; पण तसे नाही. आपले स्वत्त्व न गमावता खूप मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेल्या कलावंतांची अशी भरपूर उदाहरणे सिनेमाच्या इतिहासात आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्जनशीलतेला थोडीशी समज आणि जराश्या चातुर्याची जोड देता तेव्हाच हे शक्य होते. खरे म्हणजे माझ्या स्वतःच्या पहिल्या पाथेर पांचाली चित्रपटाच्या विषयाची निवड करताना माझ्या डोक्यात हेच होते की माझ्यासारख्या नवीन दिग्दर्शकाकडे अविश्वासाने पाहण्यापेक्षा या लोकप्रिय कादंबरीमध्ये (बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांची पाथेर पांचाली ही कादंबरी) प्रेक्षकांना जास्त रस असेल. प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करणे ही त्यामागची कल्पना. बाकी सारे मग त्या चित्रपटावरती अवलंबून. प्रेक्षक हा असा प्राणी आहे की जो बदलू शकतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे प्रेक्षकांच्या अभिरुचीमध्ये बदल होत असतो.ज्याला आधुनिक मानव म्हणता येईल अशा टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून खूप मोठ्या प्रेक्षकवर्गाच्या अभिरुचीत आणि विचारशक्तीत बदल व्हावा लागेल.
पण, कलाकारांनी त्याची एवढी काळजी करायची काही आवश्यकता नाही.अजून एक दुसरा वर्ग आहे, जो जास्त आधुनिक आहे, पण त्यांची संख्या खूप कमी आहे! त्यांनी आपापली झाडे सोडली आहेत, त्यांच्या शेपट्या गळून गेल्या आहेत आणि ते आपल्या दोन पायांवर उभे राहून शिकार करत आहेत. त्यांना जे भक्ष्य हवे आहे ते तुम्ही देऊ शकता.
इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्या देशात चित्रपट कलावंताच्या मार्गात इतके अडथळे आणि अनपेक्षित संकटे असतात की त्यापासून कसा बचाव करायचा त्याचे शिक्षण कोणत्याच शाळेत मिळत नाही. मात्र अशा आव्हानांना सामोरे जाताना धैर्य कधीच सोडायचे नाही आणि अगदी शेवटपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहायचे हे मी अनुभवांतून शिकलेलो आहे. कोणास ठाऊक तुम्ही कदाचित या लढाईत जिंकू शकाल! हे जर पूर्वी घडलेले आहे, तर पुन्हाही ते घडेलच!
अनुवाद : प्रकाश मगदुम,
संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय
prakashmagdum@gmail.com