मंत्र्यांचे 'व्हिडीओ', काळी जादू.. हे काय चालले आहे?
By यदू जोशी | Updated: March 27, 2026 05:31 IST2026-03-27T05:29:42+5:302026-03-27T05:31:56+5:30
निर्ढावलेले राजकारणी त्यांची दुष्कृत्ये समोर आली की स्वतःचा बचाव करण्याची व्यर्थ धडपड करतात; पण 'ये पब्लिक है, ये सब जानती है'...

मंत्र्यांचे 'व्हिडीओ', काळी जादू.. हे काय चालले आहे?
यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत
'लॉ मेकर्स आर द बिगेस्ट लॉ ब्रेकर्स' असे एक वाक्य आहे. संविधानाच्या चौकटीव्यतिरिक्त सामाजिक भान-कर्तव्याचा पण एक अलिखित कायदा असतो. तो अलिखित असला तरी त्याचे वजन खूप असते. सध्या त्याचीच मोडतोड करणे सुरू आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित अश्लील व्हिडीओ दोन दिवसांपासून प्रचंड फिरतो आहे. एका तृतीयपंथीयाशी सलगी करत असल्याचा हा कथित व्हिडीओ आहे. झिरवाळ हे अन्न व औषधी प्रशासनमंत्री आहेत, व्हिडीओमध्ये नाही त्या 'औषधी' बाटल्या खोलीत दिसत आहेत.
दोन दिवसांपासून झिरवाळ मोबाइल बंद करून लपून बसले आहेत. सरकारच्या कायद्यानुसार कारवाई होईल म्हणून बरेच लोक लपून बसत असतात; पण नैतिकतेचा जो सामाजिक कायदा आहे त्याच्या भीतीनेही लपून बसावे लागते. लोकांसमोर येऊन तोंड दाखवण्याची हिंमत नाही होत, बहुदा झिरवाळ यांचे सध्या तसेच झाले आहे. मागे त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एक कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला होता, आता तृतीयपंथीयासोबतची कथित जवळीक त्यांच्यावर शेकत आहे.
निर्ढावलेले राजकारणी त्यांची दुष्कृत्ये समोर आली की काही ना काही कारणे देऊन स्वतःचा बचाव करण्याची धडपड करतात पण 'ये पब्लिक है, ये सब जानती है'... प्रश्न आहे समाजाच्या नजरेचा, कारण कोर्टात केवळ केस चालते, समाजात प्रतिमा चालते. सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी दिलेली असते, विकृत सेवा करवून घेण्यासाठी आणि तोंड काळे व्हायची वेळ आली की लपून बसण्यासाठी तर नाहीच हे लोकप्रतिनिधीने लक्षात ठेवले पाहिजे.
झिरवाळांचे काय होईल?
आयुष्यात पारदर्शकता ही असलीच पाहिजे; पण आजकाल काही नेते इतके पारदर्शक झाले आहेत की त्यांचे खासगी आणि त्यातही अनैतिक जीवन हे सार्वजनिक होत आहे. तसे झाले की 'माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हे षडयंत्र आहे' अशी आवई उठविली जाते. झिरवाळ यांच्याबाबत ते किंवा त्यांचे समर्थक उद्या हेच म्हणतील.
झिरवाळ यांच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा बचाव करतात का ते पाहायचे. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आणि सरकारची प्रतिमा या दोन्हींची जबाबदारी फडणवीस यांच्यावरच आहे. बरे। तिकडे राष्ट्रवादीत सुनेत्राताईंनी काहीही ठरविले तरी त्यावर पक्षात एकमत व्हायला पाहिजे. सध्या अंतर्गत खेचाखेची जबरदस्त चालली आहे, घड्याळाचे काटे एका दिशेने फिरताना दिसत नाहीत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे झिरवाळ यांना हटविण्यास अनुकूल असलेच तर लगेच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात आणायचे म्हणून हे सगळे चालले आहे असा सूर निघायला वेळ लागणार नाही. लाच घेतली गेली तेव्हा झिरवाळ यांना अभय दिले होते, आता 'अभय योजना २' येईल कदाचित।
झिरवाळांना घरी जायला सांगितले तर आदिवासी समाज नाराज होईल, अशी एक भीती असावी पण या प्रकरणात व्हिडीओची शाहनिशा करावी आणि ते सगळे खरेच असेल तर आदिवासी वगैरे कोणताही विचार न करता झिरवाळ यांना ताबडतोब घरी पाठवणेच उचित ठरेल पण आपल्याकडे जातीपातींसह अनेक रंग अशावेळी दिले जातात आणि मग दुष्कृत्य झाकले जाते असा सर्वपक्षीय अनुभव आहेच. समाजाच्या नाराजीपेक्षा नाराज / निराश होत असलेल्या नैतिकतेची काळजी अधिक घेतली पाहिजे ना? झिरवाळ उद्या मंत्रिमंडळात राहतीलही, पण नैतिकतेच्या मंचावर त्यांना खाली मान घालूनच चालावे लागेल.
काळे जादूगार
कोणी आपल्या शेतावर, कोणी बंगल्यावर काळी जादू करत असतात. महाराष्ट्रातील बड्या मंत्र्यांची नावे या संदर्भात समोर येत आहेत. ही नावे कोणती हे सारे जाणतात. करणी, वशीकरण हे अघोरी प्रकार मंत्री करत असतील तर महाराष्ट्राला ते शोभणारे नाही. उद्या त्यांनी ते बंद केले तर सर्वांना माहिती होईलच. आपल्या अंतर्गत आणि बाह्य विरोधकांना संपविण्यासाठी राजकीय डावपेच टाकणे हा भाग समजू शकतो, पण करणी करून एखाद्याला संपवायच्या अघोरीपणाचा जो रोग विविध पक्षांच्या नेत्यांना लागला आहे त्याने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व खड्ड्यात चालले आहे.
... तसे काही होणार नाही!
मध्यंतरी एक बातमी आली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदारांना आपल्या पक्षात आणणार असून, त्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत गाठीभेटी घेतल्या, उद्धवसेनेच्या खासदारांवरही त्यांनी जाळे टाकले आहे. या दोन पक्षांचे खासदार शिंदेसेनेत जातील का? सध्याची माहिती अशी आहे की, उद्धवसेनेचे खासदार शिंदेंच्या गळाला लागू शकतात. शरद पवार गटातील खासदार गेलेच तर पुढेमागे अजित पवार गटात जातील किंवा दोघे एकत्र येतील. शिंदेंसोबत जाण्याची शक्यता नाही. उद्धवसेना काय किंवा शरद पवार गट काय; दोन्हींमधील खासदार आपल्याकडे आणणे शिंदेंपेक्षा भाजपला सोपे, पण 'उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे जात असतील तर जावू द्यावेत, शरद पवारांचे खासदार अजित पवार गटात जाऊ द्यावेत, आपल्याकडे नकोत. पक्ष फोडल्याचा आरोप आपल्याला अंगावर घ्यायचा नाही', असा दिल्लीहून भाजप श्रेष्ठींचा निरोप आहे म्हणतात. दिल्लीने त्याबाबत हिरवा झेंडा दाखविला असता तर बरेच खासदार केव्हाच भाजपमध्ये दिसले असते.
yadu.joshi@lokmat.com