मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:38 IST2025-12-20T08:37:55+5:302025-12-20T08:38:35+5:30
जेव्हा तुम्ही स्वतःला साधे, निरागस, किंचित मूर्ख होऊ देता, तेव्हा बुद्धीच्या पाशातून मुक्त होता. उद्या जागतिक ध्यान दिवस. त्यानिमित्त ध्यानाचे महत्त्व!

मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
गुरुदेव श्री श्री रविशंकर
आध्यात्मिक गुरू
ध्यान म्हणजे मनाला शांत, स्थिर आणि जागरूक अवस्थेत नेण्याची साधना. जर तुम्ही ध्यान करू शकत नसाल, तुमचे मन गोंधळत असेल आणि काहीच जमून येत नसेल तर फक्त असे अनुभवा की, मला काहीच माहीत नाही. जसे ज्या क्षणी तुम्ही जाणून घेण्याची ही कल्पना सोडून द्याल, तसे तुम्ही आत खोलवर जाताना स्वतःला अनुभवाल. तुमची बुद्धी ही तुमच्या संपूर्ण चेतनेचा फक्त एक छोटासा भाग आहे; पण आपण त्यात अडकून बसतो, तेव्हा जीवनातील बरेच काही प्रसंग आठवतात. जेव्हा तुम्ही बुद्धीच्या पलीकडे जाता, आनंदाची अनुभूती तेव्हाच येते.
ते कसे शक्य आहे? साधे होऊन. थोडे मूर्ख बनून! असे भासवा की, तुम्हाला काहीच माहीत नाही. प्रत्येकजण मूर्ख दिसू नये, अज्ञान न दिसावे म्हणून खूप प्रयत्न करतो; पण तो खरा मूर्खपणा आहे! जेव्हा तुम्ही स्वतःला साधे, निरागस, किंचित मूर्ख होऊ देता, तेव्हा तुम्ही बुद्धीच्या पाशातून मुक्त होता. ध्यानाचे दरवाजे खुलतात; पण त्या 'मूर्ख' अवस्थेत थांबून ध्यानच केले नाही, तर ती अवस्था कधीकधी जडत्वात किंवा नैराश्यात बदलू शकते. म्हणून थोडे मूर्ख बनून मग शांत बसा आणि ध्यान करा. त्या ध्यानातून ताजेपणा व आनंद फुलताना तुम्ही अनुभवाल.
मूर्ख कसे बनायचे? फक्त स्वतः, नैसर्गिक, सहज आणि असुरक्षित राहून. आश्चर्याच्या भावनेतही आपण बुद्धीच्या पलीकडे जातो. जेव्हा विस्मयाने मन भरते, विश्लेषण करणारी बुद्धी थबकते. फुलाकडे पाहताना, सूर्यास्ताकडे पाहताना, एखाद्या बाळाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताना कधीतरी आपण अचानक थबकतो त्या क्षणी अंतर्मन जागृत होते आणि एक विलक्षण अशी अनुभूती आपल्याला येते.
आयुष्य म्हणजे निराश 'मला माहीत नाही'पासून एका सुंदर 'मला माहीत नाही' पर्यंतचा प्रवास आहे. जेव्हा काहीतरी आविष्कारिक, विस्मयकारक जाणवते, तेव्हा डोळे मिटा, हसू ठेवा आणि त्या अनुभूतीत स्थिर व्हा. विस्मय हा आध्यात्मिक प्रवासाचा प्रारंभ आहे. ही सृष्टी किती अद्भुत गोष्टींनी भरलेली आहे; पण आपण त्यांना गृहीत धरू लागलो की जडत्व येते, कंटाळा येतो, तमस किंवा आळस वाढतो आणि आपण निष्क्रिय व अचेतन होतो. विस्मयाची भावना तुम्हाला ध्यानाकडे घेऊन जाते. विस्मय योगभूमिका अर्थात विस्मय ही योगाची पायरी आहे. जेव्हा 'वा।' असा अनुभव येतो, विस्मयाची लहर मनात उठते, तेव्हा जाणून घ्या की, तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडलेले आहात. तुम्ही आधीच ध्यानात आहात. तुम्ही योगाच्या अवस्थेत आहात. किती सुंदर
नाही का हे? किती अद्भुत ?...
आपण पाहतो, काही लोकांमध्ये अजिबात उत्साह नसतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही इटलीच्या ग्रामीण भागाचे चित्र पाहता, तेव्हा ते तुम्हाला आश्चर्य आणि आनंद देते; पण इटलीचे ट्रक ड्रायव्हर्स त्यांच्या मार्गावर असलेल्या त्या सौंदर्याकडे पाहतही नाहीत । ते फक्त गाडी चालवतात, खातात आणि झोपतात, त्यांच्याभोवती असलेल्या त्या सर्व सौंदर्याकडे दुर्लक्ष करून, तिथे काही नवीनपणा उरत नाही.
जेव्हा प्राण किंवा जीवनशक्ती सुप्त असते, तेव्हा उत्साह नसतो. चक्र, म्हणजे ऊर्जा केंद्रे, आपण अनुभवत असलेल्या विशिष्ट भावनांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, मूलाधार चक्र, म्हणजे तळाचे ऊर्जा केंद्र. हे उत्साह आणि जडत्व या दोन्हींचे स्थान आहे. त्याच चक्रातून दोन भिन्न भावना निर्माण होतात. नियमित ध्यानाने तुम्ही ही ऊर्जा जडत्व आणि आळशीपणातून गतिमानता आणि उत्साहात रूपांतरित करू शकता. जेव्हा दुसरे चक्र सक्रिय होते, तेव्हा आपण अत्यंत सर्जनशील होतो. तिसऱ्या चक्रात, भावना चार स्वरूपात प्रकट होतात उदारता, लोभ, मत्सर आणि आनंद, आनंद नेहमी पोटातून प्रकटतो, म्हणूनच हसरा बुद्ध आणि गणपती यांना मोठ्या पोटासह दाखवतात.
जेव्हा आपण मत्सर करतो, तेव्हा आपल्याला पोटात काहीतरी जाणवते. हृदय चक्रात ऊर्जा तीन भावनांत व्यक्त होते प्रेम, द्वेष, आणि भीती. कुठल्याही क्षणी त्यापैकी एकच प्रबळ असते. जर तुम्ही घाबरला असाल तर प्रेम किंवा द्वेष नसतो. प्रेम असेल तर भीती किंवा द्वेष नसतो. भुवयांमधील ऊर्जा दोन रूपे घेते: राग आणि सजगता, सहस्रार चक्र, म्हणजे सर्वात वरचे चक्र, इथे निखळ आनंद आहे. जेव्हा ऊर्जा या चक्रात पोहोचते, तेव्हा तुम्हाला प्रसन्नता, पूर्ण समाधान आणि परमानंद जाणवतो. जेव्हा आपण या सर्व चक्रांवर ध्यान करतो, तेव्हा नकारात्मक भावना सकारात्मक होतात.
ध्यान तर्कबुद्धीला तीक्ष्ण करते आणि हृदय कोमल करते. हे मनातील छाप पुसून टाकते आणि तुमची अभिव्यक्ती सुधारते. भावनांना ते एकाच वेळी कोमल आणि मजबूत बनवते. तुमच्या भावनांपैकी काही खूप तीव्र असतात तर काही अतिशय नाजूक. पण ध्यान संवेदनशीलता आणि विवेक यात समतोल आणते. आणि मग ते तुमची अंतर्ज्ञानशक्ती सुधारते. हे अज्ञाताचे द्वार उघडे करते. बऱ्याच वेळा आपण हे जाणतच नाही की आपण संपूर्ण विश्वाशी जोडलेले आहोत आणि आपण स्वतःला छोट्या छोट्या गोष्टी देवाकडून मागणारे साधे लोक समजतो. या संकुचितपणातून आपण कसे बाहेर पडायचे? आपण आपल्या अस्तित्वाच्या केंद्राचा शोध घेतला पाहिजे. जीवन म्हणजे काय? मी कोण? मला काय हवे आहे? या आत्मर्चितनातून आपल्या आत व्यापक दृष्टी जागृत होते. येथे ध्यान आणि प्राणायाम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मन शांत करतात आणि आनंद आतून निर्माण करतात. ध्यान हे आत्म्याचे अन्न आहे.