अग्रलेख: पत्र, जे कानशिलात लगावते! अनिष्ट बाबींना आपण आजही करकचून मिठी मारलीये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 07:05 IST2026-01-23T07:04:41+5:302026-01-23T07:05:07+5:30
‘मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा’ असे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एका दहावीच्या अल्पवयीन मुलीने मुख्याध्यापकाला लिहिले.

अग्रलेख: पत्र, जे कानशिलात लगावते! अनिष्ट बाबींना आपण आजही करकचून मिठी मारलीये...
‘मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा’ असे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एका दहावीच्या अल्पवयीन मुलीने मुख्याध्यापकाला लिहिले. हे पत्र आपल्या व्यवस्थेच्या कानशिलात लगावते. अगदी ताराबाई शिंदे यांनी १८८२च्या सुमारास ‘स्त्री-पुरुष तुलना’ किंवा मुक्ता साळवे हिने अस्पृश्य समाजाचे दु:ख मांडणारा निबंध लिहिताना समाज व धर्मव्यवस्थेचे जे वाभाडे काढले तसे. आपला सामाजिक व्यवहार हा नेहमी ढोंगांनी व भेदाभेदाने भरलेला आहे. समाजातील लिंगभेद, जातिभेद व अनिष्ट बाबींना आपण आजही करकचून मिठी मारून आहोत. या सनातनी बाबी समाजासाठी लेकीबाळींपेक्षाही लाडक्या आहेत. म्हणून या अस्वस्थ लेकीला मुख्याध्यापकाला साद घालावी लागली. कारण पुढे शिकायचे स्वप्न मनी धरून असलेल्या या मुलीचे वडील तिचे हात पिवळे करायला निघाले आहेत.
ग्रामीण भागात यास ‘मुलगी उजवणे’ किंंवा ‘भाजून टाकणे’ म्हणतात. थोडक्यात लग्न करून मुलगी कटवणे. बापाने जबाबदारीतून मुक्त होणे. वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील एका मुलीचे तिची शिकायची इच्छा असताना बापाने लग्न उरकून टाकले. म्हणून तिने आत्महत्या केली. तिचे वडील तर शिक्षक. कायद्याने मुलगी अठराची झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. असा विवाह अल्पवयीन व गुन्हा ठरतो. पण, आजही असे अल्पवयीन विवाह राजरोस सुरू आहेत. देशात लाखो माता अल्पवयीन असतील. त्यांची बाळंतपणे सरकारी, खासगी दवाखान्यात होतात. बऱ्याचदा अशा अडलेल्या मुली भीतीपोटी दवाखान्यात आणल्याही जात नसतील. ते तर आणखी भयानक.
अहिल्यानगर जिल्ह्यात एका ट्रस्टच्या हॉस्पिटलने प्रशासनाला लेखी अहवाल दिला की, त्यांच्याकडे २०२४-२५ या एका वर्षात अडीच हजार अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिला. या सर्व बाळांचे बाप आणि त्या मुलींचे आईवडील म्हटले तर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगार आहेत. पण, कारवाई केली तर या मुलींच्या पुढील जीवनाचे काय? हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून सरकारही तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. बालविवाह मुक्तीचे अभियान तेवढे जोरात सुरू आहे. लाडक्या बहिणींवर भाषणे ठोकणारे ‘अल्पवयीन मातांवर’ बोलत नाहीत. यात दोष केवळ पुरुषांचाही नाही. लाडक्या बहिणी, लखपती दीदी यांनाही आपली लेक आजही जड वाटते. त्याही तिला ‘भाजून’ टाकायला तयार होतात. पण, हिंगोलीच्या लेकीने विरोध करण्याचे धाडस केले. तिने खरा तिच्या शिक्षणाचा अर्थ जाणला. जे शिकली तशी कृती केली.
या मुलीच्या मागोमाग बीड जिल्ह्यातील एका मुलीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ‘शाळेत सुविधा द्या’ अशी मागणी केली आहे. मुली अशा बेधडक बोलू लागल्या, भूमिका घेऊ लागल्या तर व्यवस्था ठिकाणावर येईल. संक्रांतीचे वाण वाटण्यापेक्षा व हळदी-कुंकू करत बसण्यापेक्षा अशी व्यवस्था सुधारण्यात महिलांचा पुढाकार हवा आहे. भारतीय स्त्रियांत अशी बंडखोर वृत्ती वेळोवेळी दिसते. अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षण केले अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली गेली. पण, त्यांनी सती जाण्यासारखी सनातनी व चुकीची प्रथा झुगारली. धर्मातील अनिष्ट प्रथा नाकारली हे सांगितले जात नाही. ‘मला नांदायला न्या अन्यथा हीच फारकत समजून मी दुसरा नवरा करीन’ अशी नोटीस पूर्वीच्या काळी महिला नवऱ्यांना देत होत्या. ‘दीनमित्र’सारख्या सत्यशोधक नियतकालिकांत त्या छापून आलेल्या आहेत.
अशाच बंडखोरीची आजही मोठी गरज आहे. हिंगोलीच्या लेकीचे हे पत्र वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह का धरला होता ती बाबही अधोरेखित होते. हे बिल संमत होत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदामंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. कारण, हे बिल स्त्रियांच्या अधिकाराची भाषा करत होते. आंबेडकर यांचे म्हणणे होते की, ‘इतर सर्व कायद्यांपेक्षा स्त्रियांना समान संधी देणे व विशेषतः संपत्तीची समान संधी देण्याची सामाजिक सुधारणा खूप महत्त्वाची आहे. वर्ग आणि लिंग असमानता कायम ठेवून केवळ आर्थिक समस्यांशी संबंधित कायदे केले तर आपल्या राज्यघटनेचे आपण हसू करू. असे करणे हे शेणाच्या ढिगांवर महाल बांधण्यासारखे होईल’. आपण तेच करतो आहोत. महिलांच्या खात्यात लाभाचे पैसे टाकताना मुलींना उजवून टाकतो आहोत. हा दांभिकपणा आहे.