नागपूरला दृष्ट का लागली? धर्म आणि जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी 'हा' धोका वेळीच ओळखलेला बरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:34 IST2025-03-19T08:33:34+5:302025-03-19T08:34:27+5:30

आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

It would be better if those who try to do politics of religion and caste recognized 'this' danger in time editorial about Nagpur riot | नागपूरला दृष्ट का लागली? धर्म आणि जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी 'हा' धोका वेळीच ओळखलेला बरा

नागपूरला दृष्ट का लागली? धर्म आणि जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी 'हा' धोका वेळीच ओळखलेला बरा

चकचकीत सिमेंटचे रस्ते, हिरव्यागार वृक्षराजीतून वाट काढत डाैलात धावणारी मेट्रो हे नवे आकर्षण बनलेल्या सुंदर नागपूर शहरावर सोमवारी रात्री धार्मिक हिंसाचाराचा डाग पडला. मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर सुरू असलेल्या वादात स्थानिक आंदोलनानंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या आणि शेकडोंच्या जमावाने जाळपोळ, तोडफोड केली. पोलिसांना लक्ष्य बनविले गेले. चार उपायुक्तांसह पस्तीसच्या आसपास कर्मचारी जखमी झाले. जमाव इतका हिंसक होता की पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव पडला. लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या वापरून जमाव नियंत्रित करावा लागला. आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

खरेतर असे एकमेकांवर आरोप करण्याऐवजी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस जखमी होण्याइतके काय चुकले याचा शोध घ्यायला हवा. त्याचप्रमाणे अशी घटना यापुढे घडू नये यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. कारण, महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान असलेल्या नागपूर शहराला असा धार्मिक दंगलींचा ना इतिहास आहे ना वारसा. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर संपूर्ण देश हिंसाचारात होरपळत असतानाही नागपूर तुलनेने शांत होते. गेल्या शंभर वर्षांत १९२७ किंवा १९६७ असे एक-दोन अपवाद वगळता या शहरात असे कधी दंगेधोपे झाले नाहीत. त्याचे कारण या शहराची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बहुविविधता. नागपूरचे भाैगोलिक स्थान, नागपूरकर भोसल्यांचा अवध, बंगालपर्यंतचा राज्यविस्तार आणि नंतर ब्रिटिशांची कामठीच्या लष्करी छावणीवर मदार आदी कारणांनी या शहरात देशाच्या मल्याळम, तमिळ, ओडिया, बंगाली, उत्तर भारतीय असे सगळेच समाजघटक पिढ्यान् पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. त्या साैहार्दाचे प्रतिबिंब इथल्या आगळ्यावेगळ्या सण-उत्सवात, प्रथा-परंपरांमध्ये उमटलेले दिसते. हे शहर बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने ओळखले जाते. बहुतांश हिंदू भक्त हे त्या श्रद्धेचे खास वैशिष्ट्य आहे. 

लगतच्या वर्धा-सेवाग्राम किंवा पवनारच्या रूपाने या भागाला महात्मा गांधींच्या अहिंसेचे अधिष्ठान आहे. इथल्या उत्सवांना इतिहासाचे कोंदण आहे. पोळ्याच्या निमित्ताने निघणारी मारबत मिरवणूक हे त्याचे सुंदर उदाहरण. हे शहर वैचारिक विविधताही जपते. यंदा शताब्दी साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जन्मभूमी आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या ऐतिहासिक घटनेमुळे ही दीक्षाभूमी. नागपूरकरांनी या वरवर स्पर्धक वाटणाऱ्या आस्था इतक्या श्रद्धेने जपल्या की कालांतराने त्या एकमेकींना पूरकही ठरल्या आणि त्यातून भारतीय विविधतेचे एक मूर्तिमंत उदाहरणही देशासमोर, जगासमोर ठेवले गेले. नागपूरची माणसे मोकळीढाकळी आहेत. नागपुरी किंवा वैदर्भीय पाहुणचार हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. जे पोटात तेच ओठात अशा मोकळ्या व तितक्याच भिडस्त स्वभावाचे हे शहर आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये नागपूरने कात टाकली आहे. आता हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर बनले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या वेगाचे धुरीण आहेत. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. उड्डाणपुलांचा नक्षीदार गोफ नागपूरच्या अंगाखांद्यावर खेळतो आहे. इथल्या विमानतळाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होत आहे. हा विकासाचा प्रवाह अवतीभोवतीच्या जिल्ह्यांकडूनही गतिमान होत आहे. नेमक्या याच टप्प्यावर धार्मिक हिंसाचार व्हावा, शांततेला नख लागावे हे काही चांगले चिन्ह नाही. नागपूरच्या चाैफेर विकासाला अशी हिंसेची दृष्ट लागायला नको. कारण, अशा घटनांचे परिणाम दूरगामी असतात. शांतता, कायदा-सुव्यवस्था ही कोणत्याही शहराच्या, प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाची, गुंतवणूक व रोजगार निर्मितीची, विकासाची महत्त्वाची गरज असते. अशावेळी हे असे वळण नागपूरला किंवा विदर्भाला, मध्य भारताला कदापि परवडणारे नाही. धर्म व जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी हा धोका वेळीच ओळखलेला बरा.

Web Title: It would be better if those who try to do politics of religion and caste recognized 'this' danger in time editorial about Nagpur riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.