विशेष लेखः आज गळ्यात गळे, उद्या पायात पाय! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार काय?

By यदू जोशी | Updated: May 30, 2025 11:20 IST2025-05-30T08:31:30+5:302025-05-30T11:20:02+5:30

विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत असा चंग बांधलेल्या महायुतीत 'इनकमिंग' जोरात आहे. उद्या स्थानिक निवडणुकीत हेच नेते एकमेकांना पाडतील, तेव्हा कळेल!

Incoming is in full swing among the three parties in the grand alliance including the BJP | विशेष लेखः आज गळ्यात गळे, उद्या पायात पाय! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार काय?

विशेष लेखः आज गळ्यात गळे, उद्या पायात पाय! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार काय?

यदु जोशी
सहयोगी संपादक

भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसतसे पक्षप्रवेशाचे सोहळे वाढतील. तिन्ही पक्षांना वाटते की आपण ज्यांना आणत आहोत त्यामुळे पक्षाचे भांडवल वाढेल, पण प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर महायुतीत भांडणं लागण्यासाठी हे इनकमिंगवाले जबाबदार असतील. हा धोक्याचा इशारा आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तीन-चार महिन्यांमध्ये येईलच. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर विरोधक म्हणजे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धराम मेहेत्रे. आता हेच मेहेत्रे परवा शिंदेसेनेत गेले. महायुतीमध्ये कल्याणशेट्टी अन् मेहेत्रे एकत्र राहतील का? अक्कलकोटचे शेंबडे पोरही सांगेल की दोघांचे पटू शकत नाही. पूर्वी विरोधात होते, तेव्हा रेषा स्पष्ट होत्या, आता दोघे मित्रपक्षात आहे, संघर्ष तर होईलच.

सगळीकडेच असे सुरू आहे. जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील. त्यांचे कट्टर विरोधक माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर परवा अजित पवार गटात गेले. आता एका गुलाबावर दुसऱ्या गुलाबाचा मुका घेण्याची पाळी आली. पाचोरा-भडगावमध्ये किशोर पाटील हे शिंदेसेनेचे आमदार आहेत. तेथे त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार दिलीप वाघ यांना शरद पवार गटातून भाजपने आपल्याकडे ओढले.

जिल्ह्या-जिल्ह्यात सध्या हेच सुरू आहे. विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत यासाठी महायुतीने जणू चंग बांधला आहे, पण त्या नादात आपण आपल्यातच एकमेकांचे विरोधक तयार करत आहोत याचे भान दिसत नाही. उद्या हेच नेते एकमेकांना पाडतील. महायुतीतील तीन पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची ही लक्षणे आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राधानगरीचे आमदार आहेत. त्यांनी तीन वेळा ज्यांना हरविले ते माजी आमदार के. पी. पाटील आधी शरद पवार गटात होते, मग उद्धव ठाकरेंकडे गेले आणि परवा अजित पवार गटात गेले. आता एका म्यानात दोन तलवारी बसायच्या कशा? महायुतीत जागोजागी ताकद वाढत असल्याचे चित्र सध्या आहे, उद्या हेच ओझे वाटू शकते.

अजितदादा किती बदलले?

रागीट अजित पवार आठवतात का? पूर्वी प्रत्येक गोष्टीत भडकायचे. 'कळत नाही का तुम्हाला?' 'हे काय चाललंय?' वगैरे सुनवायचे. हल्ली ते मिश्किल झाले आहेत. चक्क विनोद करतात, चिमटे काढतात आणि हसून दाद देतात. आपल्या स्वभावात त्यांनी करवून घेतलेला हा बदल विलक्षण आहे. सध्या त्यांचं नवं रूप प्रशासनाला पहायला मिळत आहे. त्यांच्याकडे वित्त, नियोजन आणि उत्पादन शुल्क अशी मलईदार खाती आहेत पण फायलींमधील टक्केवारी त्यांनी हद्दपार करून टाकली आहे. बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहार तर फार दूर राहिले. 'असला फालतूपणा मी खपवून घेणार नाही' असे त्यांनी कार्यालयात सगळ्यांना बजावले आहे. रागीट दादा हसरे झाले त्यापेक्षाही हा मोठा, खूप मोठा बदल आहे. ते सर्वार्थाने प्रतिमा बदलत आहेत.

'माझी चौकशी करा'

बरेचदा मंत्र्यांची अमुक घोटाळ्यात चौकशी करा म्हणून मागणी होत असते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत मात्र उलटे घडले आहे. त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मीरा-भाईंदरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून सरनाईक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले होते. सरनाईक बिल्डरदेखील आहेत, त्या अनुषंगाने हे आरोप होते. ते आरोप फेटाळण्याऐवजी सरनाईक यांनी थेट याप्रकरणी आपलीच चौकशी करा, असे पत्र फडणवीसांना दिल्याने स्थानिक भाजपची पंचाईत झाली. दिलीप जैन यांचे नेते आणि स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांवर शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसे अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांवर आरोपांची राळ उठवताना दिसतील, हे नक्की.

जानकर काँग्रेससोबत? 

देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात रासपचे नेते महादेव जानकर कॅबिनेट मंत्री होते. पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात, त्यांच्याकडून दरवर्षी राखी बांधून घेतात. काही महिन्यांपूर्वी मात्र जानकर भाजपपासून दुरावले. 'गुलामीच्या बंगल्यात राहण्यापेक्षा स्वाभिमानाच्या झोपडीत राहू' असे परवा ते सांगत होते. ते ३१ मे रोजी दिल्लीत मेळावा घेताहेत. राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव येतो म्हणाले आहेत. एकुणात भाजपचे बोट सोडून जानकर काँग्रेसचे बोट धरणार असे दिसते. काँग्रेसपासून मित्रपक्ष आणि स्वतः काँग्रेसचेच नेते दुरावत असताना एक जानकर नावाचे सध्याच्या परिस्थितीतले कच्चे लिंबू काँग्रेसला मिळत आहे, पुढचे पुढे पाहू, 

yadu.joshi@lokmat.com
 

Web Title: Incoming is in full swing among the three parties in the grand alliance including the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.