सोशल मीडियाच्या खाईत किती जण कोसळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:19 AM2023-08-06T10:19:56+5:302023-08-06T10:20:05+5:30

सोशल मीडियावरील काही समाजघातक वृत्ती अतिरंजित, खोट्या/फेक मतांची गर्दी करून होळी पेटती ठेवण्याचे काम करीत राहतात.

How many will fall into the abyss of social media? | सोशल मीडियाच्या खाईत किती जण कोसळणार?

सोशल मीडियाच्या खाईत किती जण कोसळणार?

googlenewsNext

डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ 
ल्या काही दिवसांतील हत्याकांड समाजातील कुणाकुणाच्या मनावर किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया घडवित असतील, हे सांगणे मोठे कठीण आहे. आता किती जण स्वतंत्र सारासार विचार करू शकतील, कितींना वस्तुनिष्ठ विचार करणे खरोखर शक्य होऊ शकेल याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे, इतके नियंत्रण सोशल मीडियाने जनमानसावर मिळवले आहे. ही पकड इतकी घट्ट आहे की त्यात विवेक गुदमरून जात आहे. माणसे विचार करण्याअगोदरच सोशल मीडियाकडे धावत जाऊन माध्यमाने त्या घटनेचे काय विश्लेषण मांडले आहे, त्यावरून आपल्या आजवर जपलेल्या, पोसलेल्या मतांचे त्यात समर्थन शोधतात व पूर्वग्रहांना अधिकाधिक बळकट करण्यात गुंग होतात. मग घटनेतील इतर अनेक अंगांचा विचार करण्याची जरूरी भासत नाही. उद्वेग, संताप, अस्वस्थता, जुनाट रोगासारखे मनात काठोकाठ भरून सांडणारे वैफल्य अशा वेळी कायदे, नियम, विवेक कशालाही न जुमानता हिंसेकडे, विध्वंसाकडे वळते. मग तेथे वैयक्तिक व सामाजिक हिंसाचाराची ठिणगी पडते. त्यात आजूबाजूचे जग होरपळून निघते, मृत्यूचे तांडव सुरू होते. 

सोशल मीडियावरील काही समाजघातक वृत्ती अतिरंजित, खोट्या/फेक मतांची गर्दी करून होळी पेटती ठेवण्याचे काम करीत राहतात. थडगी उकरून जणू भुतावळी मुक्त करतात. अशावेळीच खरी कसोटी असते राजकीय नेतृत्व व प्रशासकीय व्यवस्थेची. कायदा व सुरक्षा व्यवस्थेने या साऱ्या होऊ घातलेल्या सर्वभक्षक प्रलयाला प्रारंभीच ओळखून द्रुतगतीने योग्य त्या उपाययोजना कृतीत उतरविल्या पाहिजेत. आज जगात अनेक देशांमध्ये वंश-वर्ण-जाती-धर्म यांच्या आधारे इतिहासाचे विकृतीकरण करून अस्मितेला इतके पेटविले जाते की जीवसृष्टीचे अस्तित्वच नगण्य होत जाते. द्वेषदाह शरीर-मनांत पसरतो, असह्य septicemia त्या जिवाचा व सोबत आजबाजूच्या जिवांचा घास घेत पसरत जातो. पूर्वी मनात कधीतरी ठुसठुसणारा व्रण परत भळभळती जखम होऊन वाहू लागतो. 

रेल्वेत गोळीबार करणारा जवान आता मानसशास्त्रीय चिकित्सेला सामोरा जाईल. दंगलीत पकडलेल्या माणसांवर कायदेप्रक्रिया सुरू होईल. काळ लोटत जाईल, सोशल मीडिया नव्या रोचक TPR वाढवतील अशा विषयांना टिपत राहील. सत्ताग्रहणाकडे राजकीय पावले धावत सुटतील. कायदा, सुरक्षितता, न्याय, लोकशाही व एकंदर सुराज्य निर्मितीसाठी ही जी सारी व्यवस्था उभी केली आहे ती जपण्यात लोकांचे हित आहे, त्यासाठी नागरिक सहभाग अधिकाधिक वाढला पाहिजे. जग जाणण्यासाठी माणसे समाज माध्यमांवर अधिकाधिक अवलंबून राहत आहेत, अशावेळी अशा माध्यमांची सामाजिक जबाबदारी वाढत आहे. आपल्या पोस्ट्स पुढे पाठविताना त्यांची सत्यता आधी पारखणे, त्यांचा प्रभाव लोकहितकारी असेल ना, आपण आणखी एक उतावीळ, सनसनाटी, अविवेक व क्रोधाला खतपाणी घालणारी पोस्ट तर पाठवीत नाही ना असे अनेक निकष लावून मग अशा माध्यमात उतरले पाहिजे. या किमान अपेक्षा निदान आपल्या forwarding बाबत आपण ठेवत जाऊ.

घडलेल्या हिंसा, आत्महत्या यातील व्यक्तींची वैयक्तिक मानसचिकित्सा होईल. पण, जवानापासून यशस्वी उद्योगपतीपर्यंत बळी घेत जाणारी, जीवनेच्छा संपविणारी, जिवांची व जीवनाची किंमत शून्य करणारी ही प्रेरणा वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक हातांनी विळखा घालणारी octopus ठरते, तेव्हा चिकित्साही सखोल व समाज हितकारी असायला हवी. अन्यथा प्रवासाचे दोन तास कमी करणाऱ्या मार्गावर नियम न पाळता गाड्या पळविण्यात, समृद्धी तर दूरच, जीवनच कमी करणारी जीवघेणी गोष्ट ठरू शकते. मनाचे संतुलन विवेकी वृत्तीने सांभाळीत जगणे 
सुरक्षित व सुखदायी होऊ शकेल. 

सोशल मीडियाचे व्यसन कसे ओळखणार?
n बराच वेळ सोशल मीडियाबाबत विचार करणे
n सोशल मीडियावर काही अपडेट्स आले का, ते वारंवार तपासणे
n वैयक्तिक अडचणी विसरण्यासाठी सोशल मीडियावर गुंतून राहणे
n सोशल मीडियावरील धार्मिक, वांशिक पोस्टवरून लगेच रिॲक्ट होणे
n आभासी घडामोडींची विनाकारण चिंता करणे
n नैराश्य, चिंता, एकटेपणा, झोपमोड, हरवल्याची भावना निर्माण होणे
n सोशल मीडियावरील पोस्टला कमी व्ह्यूज, लाइक, कमेंट मिळाल्यास नैराश्य येणे
n आभासी संवादावेळी लगेच प्रतिसाद न मिळल्यास अस्वस्थ वाटणे

वापर कसा ?

 मित्र/नातेवाइकांशी संपर्क     ४०%
 माहिती/बातम्यांसाठी     १६%
 समविचारी लोकांच्या संपर्क     १५%
 मनोरंजन     ९%
 स्वतःची मते मांडणे     ७%
 समाजाकडून मदत मागणे     ५%
 नव्या गोष्टी शिकणे     ४%
 अन्य     ४%


चुकीच्या गोष्टींसाठी
 अफवा माहिती पसरविणे     २७%
 जाणीवपूर्वक भावना 
दुखावल्या जाणे     १७%
 इतरांबाबत चुकीची माहिती 
पसरविणे     १५%
 बराच वेळ वाया जाणे     १४%
 नको त्या गोष्टीचे दडपण     १२%
 मानसिक त्रास जाणवणे     ४%
 अन्य     १२% 

Web Title: How many will fall into the abyss of social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.