शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘मॅडम’ आणि ‘साहेबां’ ना हद्दपारच करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 05:40 IST

‘साहेब’ १९४७ साली देश सोडून गेले... आता जे खुर्चीत आहेत, तेही नागरिक; आपण समोर उभेदेखील नागरिकच आहोत. दोघांचा दर्जा एकच आहे!

ठळक मुद्देइंग्रजांनी काळ्या-गोऱ्यात जो भेद करून ठेवला, तो आता आयएएस / आयपीएस / आयएफएस आणि इतर असा चालू आहे. इंग्रजांच्या काळी कलेक्टर गोरा असे, आता तो भारतीय असतो.

मिलिंद थत्ते 

केरळमधल्या मदूर गावच्या ग्रामपंचायतीने एक अनोखा नियम केल्याची बातमी वाचली. या ग्रामपंचायतीतले सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्व सदस्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून असा नियम केला की, यापुढे ग्रामपंचायतीतले अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांना सर किंवा मॅडम म्हणायचे नाही. या प्रत्येकाच्या टेबलावर त्यांच्या नावाची पट्टी ठेवण्यात येईल. नागरिकांनी त्यांना नावाने बोलावे किंवा वयाने मोठे असतील तर दादा-ताई अशा शब्दांनी सन्मान दर्शवावा. कर्मचाऱ्यांनाही सक्त आदेश आहेत की, भेटीला येणाऱ्या नागरिकांनी ‘साहेब’ म्हणू नये यासाठी कर्मचाऱ्यांनीही लोकांना आग्रह करावा. आणखी एक गोष्ट या पंचायतीने केली आहे. ती म्हणजे सर्व विनंती अर्जांचे नाव बदलून ‘अधिकार अर्ज’ असे केले आहे. या दोन्ही गोष्टी वरकरणी छोट्या वाटल्या तरी कळीच्या आहेत. लोकशाहीत नागरिक महत्त्वाचा आहे ही बाब नोकरशाहीच्या मनात रुजवणे कठीण आहेच; पण लोकांच्या मनात रुजवणेही कठीण आहे. इंग्रजी भाषक देशातदेखील ऊठसूट सर्वांना ‘सर’ - ‘मॅडम’ म्हणत नाहीत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षालादेखील ‘मिस्टर प्रेसिडेंट’ म्हणतात. आपण मात्र ब्रिटिश गुलामीची मानसिकता टिकवून कुणाला हिज् एक्सलन्सी, कुणाला माय लॉर्ड, कुणाला ऑनरेबल – अशा सगळ्या किताबती डोक्यावर बसवून ठेवल्या आहेत.

इतकेच नव्हेतर, यात भर घातली आहे. ग्रामसेवकाला ‘भाऊसाहेब’, त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना ‘रावसाहेब’ आणि त्याहून वरच्यांना ‘साहेब’ – असे म्हणण्याचा संकेत कायद्याहून पक्का होऊन बसला आहे. कृषी सहायकाला ‘तात्या’ आणि वनरक्षकाला ‘दादा’ – हे जरा वेगळे आहे; पण त्याही खात्यात जरा वर चढले की ‘रावसाहेब’ आणि ‘साहेब’ येतातच. अनेक चकचकीत सरकारी कार्यालयांत नव्याने प्रवेश करणारा गावकरी संकोचतो आणि चपला बाहेर काढतो. अधिकाऱ्यांसमोर ठेवलेल्या खुर्च्यांवर आपण बसावे की नाही याबद्दल त्याला धाकधूक वाटत असते. वृद्ध महिला तर अशा कार्यालयात जमिनीवरच बसतात. दंडाधिकारी असा दर्जा असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचे आसन दीड-दोन फूट उंचावर असते, भोवती लाकडी कठडा असतो. भले-मोठे टेबल, फायलींचे गठ्ठे आणि तो लाकडी कठडा यातून साहेबाचे जेमतेम डोके खाली बसलेल्या नागरिकाला दिसते. मग, तो अवघडून उभाच राहतो आणि आपले म्हणणे मांडतो.

इंग्रजांनी काळ्या-गोऱ्यात जो भेद करून ठेवला, तो आता आयएएस / आयपीएस / आयएफएस आणि इतर असा चालू आहे. इंग्रजांच्या काळी कलेक्टर गोरा असे, आता तो भारतीय असतो. तेव्हा आयसीएस म्हणत, स्वातंत्र्यानंतर फक्त नाव बदलून आयएएस झाले, बाकी कोणत्याही नियमात, संकेतात काहीही फरक नोकरशहांनी होऊ दिलेला नाही. “मंत्री येती-जाती, पण आयएएस तसेच राहती” – असा आपल्या व्यवस्थेचा महिमा आहे. त्यामुळे “साहेब वाक्यम् प्रमाणम्” हे ‘सत्यमेव जयते’पेक्षा महत्त्वाचे भासते. ब्रिटिशकालीन बांधकामे जशी आत्ताही मजबूत असतात, तशीच ही सरकार नावाची व्यवस्था आहे. त्यात १९१९ आणि १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायद्यांनी लोकप्रतिनिधींना शिरायला एक दार उघडले. पण, बाकी बांधकाम तसेच राहिले. या चिरेबंदी बांधकामाला माहिती अधिकार कायद्याने पहिला तडा दिला. ई-ग्राम स्वराजसारख्या मोबाइल-ॲपमुळेही काही तडे गेले. लोकसेवा हक्क कायदे काही राज्यांनी केले खरे; पण, प्रत्यक्षात त्याने काही फरक पडला नाही. म्हणूनच केरळमधल्या त्या पंचायतीचे सरपंच पी. आर. प्रसाद म्हणतात, त्याला महत्त्व आहे. ते म्हणतात की नागरिक हेच सार्वभौम आहेत. त्यांनी विनंत्या कसल्या करायच्या, त्यांनी अधिकार सांगितला पाहिजे व त्या अधिकारानुसार पंचायतीने त्यांना सेवा पुरवल्या पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारने ठरवलेली उद्दिष्टे पार पाडणाऱ्या पंचायतींना अनेकदा गौरवले जाते. पण, घटनेने दिलेले उद्दिष्ट पार पाडणाऱ्या म्हणजेच “आम्ही भारताचे लोक” यांचे सार्वभौमत्व प्रत्यक्षात आणणाऱ्या मदूर ग्रामपंचायतीचा आदर्शही देशात सर्वत्र पोहोचला पाहिजे.

आम्ही वयम् चळवळीत गेली कित्येक वर्षे हे पाळत आहोत, प्रचारत आहोत की, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना भाऊ-ताई याच संबोधनाने बोला. “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत,” अशीच प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेतलेली आहे. त्यातले काही काही साहेब आहेत, असे तर म्हटले नाही ना? उलट साहेब १९४७ साली देश सोडून गेले आहेत, हेच सत्य आहे. आता जे खुर्चीत आहेत, तेही नागरिक आहेत, आपण समोर उभेदेखील नागरिक आहोत. दोघांचा दर्जा एकच आहे. दोघांची कर्तव्ये वेगवेगळी आहेत. अनेक गावांनी हे सूत्र पाळून शासनातील कलेक्टरपासून ग्रामसेवकापर्यंत सर्वांनाच बंधुभावाने जोडले आहे. ही सवय छोटी असली, तरी नाते बदलणारी आहे; आणि म्हणूनच तिचा प्रचार होणे मोलाचे ठरणार आहे. एखादी छोटी कृती सर्वांनीच एकदिलाने केली तर मोठा बदल घडतो हे आपण इतिहासात आणि वर्तमानातही अनेकदा अनुभवले आहे.

milindthatte@gmail.com

टॅग्स :Keralaकेरळgram panchayatग्राम पंचायत