दोस्ती.. दुश्मनी ! पहाटेच्या ‘शपथां’ना भीमातीरी दिला ‘सुडाग्नी’

By सचिन जवळकोटे | Published: April 18, 2021 06:22 AM2021-04-18T06:22:44+5:302021-04-18T06:23:38+5:30

लगाव बत्ती...

Friendship .. enmity! 'Sudagni' gives fear to morning 'oaths' | दोस्ती.. दुश्मनी ! पहाटेच्या ‘शपथां’ना भीमातीरी दिला ‘सुडाग्नी’

दोस्ती.. दुश्मनी ! पहाटेच्या ‘शपथां’ना भीमातीरी दिला ‘सुडाग्नी’

googlenewsNext

सचिन जवळकोटे

एकेकाळी पहाटेचा मंगल ‘शपथविधी’ करणारे दोन मित्र आता भीमातीरी रात्री उशिरापर्यंत दुश्मनीचा ‘सुडाग्नी’ पेटविण्यात रमले. स्वत:च्या निवडणुकीतही कधी फिरलेे नसतील एवढी गल्लीबोळं यांनी पालथी घातली. एवढी जळजळीत ईर्षा कधी न पंढरपूरकरांनी पाहिली.. न  कधी मंगळवेढेकरांनी अनुभवली. आता तुम्ही म्हणाल, ‘ही दोस्ती-दुश्मनी राहू द्या बाजूला.. अंदाज सांगा अगोदर’. मग नीट ध्यानात घ्या. ग्रामीण भागात ‘घड्याळा’चा गजर झाला, तर शहरी भागात ‘कमळ’ फुललं.


गेल्या १७ दिवसांत कोरोना पेशंटची संख्या जेवढ्या पटीनं वाढली, त्याहीपेक्षा कमी टक्के मतदान दुपारपर्यंत झालं.. कारण लोकांना यात इंटरेस्टच नव्हता. नेमकं कोणाला मतदान करावं, हाच निर्णय होत नव्हता; कारण म्हणे दोघेही सारखेच. एकाला झाकावं अन्‌ दुसऱ्याला दाखवावं. एक आलिशान गाडीची काळी काच कधी खाली घेत नव्हता, तर दुसरा कार्यकर्त्यांच्या सूचनेवर कधीच रिप्लाय देत नव्हता. एकाचा चेहरा नेहमीच एसी केबिनमध्ये तर दुसऱ्याचा चेहरा सदैव निर्विकार. एकाला वाटायचं ‘पैसा हाच महत्त्वाचा’, दुसऱ्याला वाटायचं ‘वडिलांची पुण्याईच सर्वस्व’.


पंढरीची निवडणूक या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये नव्हतीच. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत ‘बारामतीकरां’चा जोश अन्‌ ‘नागपूरकरां’चा जल्लोष यातच खरी स्पर्धा लागलेली. या मतदारसंघात गेल्यावेळचा अपवाद वगळता ‘कमळ’ चिन्ह पहिल्यांदाच लोकांनी पाहिलेलं. हे ‘कमळ’ इथं उगवण्यापूर्वीच गाडण्यासाठी ‘अजितदादां’नी ‘पंढरी’त जणू ‘बारामती’च थाटलेली. तीन-चार दिवस मुक्कामच ठोकलेला. सोम्या-गोम्यापासून फुटकळ नेत्यांपर्यंत अनेकांच्या घरांचे दरवाजे पाहून घेतलेले. विशेष म्हणजे ‘पाहून घेतो’ची भाषाही वापरली गेलेली. त्यामुळे हौसे-गवसे-नवसे सारेच कामाला लागलेले.


‘नेहतरावां’सारख्या मेंबरच्या मागं जनाधार किती हे माहीत असूनही ‘दादा’ तिथंपर्यंत पोहोचलेले.. कारण त्यांना ‘लिंक रोड’ एरियाशी देणं-घेणं नव्हतं. ‘अकलूजकरां’चा माणूस फोडला, हा मेसेज मतदारसंघात पोहोचवून वातावरण निर्मिती करायची होती. मंगळवेढ्यातही ‘घुले’ गुरुजींच्या घरी त्यांनी ‘आकडे’वारीची जुळवाजुळव केली. आता हा कोणता ‘आकडा’ एवढं मात्र विचारू नका.


कमळ प्लस-मायनस

 

  • १) गावपातळीवरील स्थानिक नेत्यांशी संपर्क कमी पडला.
  • २) गेल्या निवडणुकीतील दोन उमेदवारांच्या मतांची कागदोपत्री बेरीज करण्यात वरिष्ठ नेते रमले.
  • ३) विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करावी, असा कोणताच मुद्दा नव्हता.
  • ४) भावकीकडून विश्वासघात झाल्यानं हक्काची मतं फुटण्याची शक्यता निर्माण झाली.
  • ५) पंढरपुरातील ‘पंतांच्या वाड्या’नं मात्र शेवटपर्यंत सारा मतदारसंघ पिंजून काढला.
  • ६) उमेदवार स्वत: व्यावसायिक असल्यानं पद्धतशीर नियोजन करून यंत्रणा परफेक्ट राबविली.
  • ७) कुबेराच्या दरबारात ‘पेट्या’ नव्हे तर ‘खोकी’च फुटत असतात, हे कळून चुकलं.

घड्याळ प्लस-मायनस

१) जिल्हा परिषद-पंचायत समिती नेत्यांशी व्यवस्थित संवाद ठेवला.
२) गेल्या निवडणुकीतील विरोधकांची मते फोडण्यावर ‘अजितदादां’नी भर दिला.
३) विरोधकाच्या कारखाना सभासदत्वाचा विषय प्रत्येक भाषणात पेटविला गेला.
४) स्वत:च्या कारखान्यातील संचालकांची नाराजी दूर केली असली तरी प्रत्यक्ष प्रचारात समन्वयाचा अभाव दिसला.
५) अनेक निवडणुकांचा ‘अनुभव’ असलेल्या ‘संजयमामां’नी आपल्या कारखान्याचीही यंत्रणा कामाला लावली.
६) पहिलीच निवडणूक असल्यानं उमेदवार नियोजनात खूप मागं पडले. कार्यकर्ते नाराज झाले.
७) ‘खोकी’ पाठविण्याची ‘दानत’ वरिष्ठ नेत्यांनी दाखविली. मात्र, सर्वांपर्यंत पोहोचविण्याची ‘नियत’ स्थानिक पातळीवर नव्हती.


इकडं ‘देवेंद्र नागपूरकरां’नीही पाडापाडीची घोषणा देऊन खळबळ माजवून दिलेली. ते विरोधी उमेदवार पाडायला आलेत की ‘ट्रीपल सीट सरकार’ , हेच कार्यकर्त्यांना न कळालेलं. मात्र, त्यांना तीन तास ‘फार्म हाऊस’वर बसवून आपल्या श्रीमंतीचं यथार्थ दर्शन घडविण्याचं ‘समाधान’ मिळालं. त्याऐवजी मंगळवेढ्यात ‘रोड शो’ केला असता, तर कदाचित फायदा झाला असता. ‘सिद्धू’मुळं बसणाऱ्या फटक्याची तीव्रता कमी करता आली असती.
कदाचित दिवसाच्या ‘रोड शो’नं जिंकता येत नसतं. ‘आदल्या रात्रीचा शो’ खूप महत्त्वाचा असतो, यावर त्यांचा विश्वास असावा. म्हणून ‘पाचशे’वरून सुरू झालेली बोली शेवटी ‘तीन हजारां’वर पोहोचली. गिनती करून-करून बोटं थकली. बंडलांच्या रबरांचा ढीग साठला. पस्तीस गावांच्या पाण्याची बोलबच्चनगिरी शेवटच्या दिवशी क्षणार्धात विसरून जावी, एवढा ‘धबधबा’ वाड्या-वस्त्यांवर कोसळला.
याउलट ‘भगीरथ’ बंगल्यावर परिस्थिती. ‘पुण्याई अन्‌ सहानुभूती’ हे दोनच शब्द पाठ.  प्रचारात चहासुद्धा दुसऱ्याच्या कपानं पिला. बहुधा शर्टाला खिसाच     नसावा. तरीही काही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी खिशातले पैसे खर्चून गाड्या फिरविल्या. शेवटच्या दिवशी तर ‘भरपाई’ मिळेल या अपेक्षेनं प्रचार केला. मात्र कुठलं काय. समोरची पार्टी वाटत होती ‘काजू अन्‌ बदाम’..  अन्‌ इथं हातात पडली ‘शेंगा अन्‌ खारकं’. तीही निव्वळ वाळलेली. सहनशीलता संपलेल्या कार्यकर्त्यांनी नीट घर गाठलं. गल्ली-बोळातली घरं पहाटेपर्यंत जागी राहिली. टक्‌-टक्‌ काही झालंच नाही. ‘स्लीपा’ मिळाल्याच नाहीत. फुकटचं जागरण झाल्यानं दुसऱ्या दिवशी रांगा लागल्याच नाहीत. संध्याकाळी मात्र वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी गर्दी दिसली. आता मूठ-मूठ भरून ‘साखर’ कुणी वाटली, याचा शोध दोन तारखेलाच. तोपर्यंत लगाव बत्ती...


दादा... जय महाराष्ट्र !

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, या जिद्दीनं मैदानात उतरलेल्या ‘दादां’नी मंगळवेढ्यात ‘धनुष्यबाण’वाल्यांच्या ऑफिसमध्येही मिटिंग घ्यायला कमी केलं नाही. त्यांच्या मं‌त्र्यांनाही इथं आणून भाषणं ठोकायला लावली. मात्र, जिल्ह्यातलेच स्थानिक नेते प्रचारात जास्त का दिसले नाहीत, हा कळीचा मुद्दा. असो. या भगव्या कार्यालयात ‘दादा’ आपल्या पालकमंत्री ‘मामां’ना ठसक्यात ‘‘जय महाऽऽराष्ट्र’’ म्हणत असल्याचं दृष्य हा फोटो पाहून डोळ्यांसमोर तरळलं तर आश्चर्य वाटायला नको.

(लेखक हे 'लोकमत' च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Friendship .. enmity! 'Sudagni' gives fear to morning 'oaths'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.