आधी रोहित; आता विराट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 05:08 IST2025-05-13T05:07:27+5:302025-05-13T05:08:59+5:30
डॉन ब्रॅडमन, विजय मर्चण्ट आणि सुनील गावसकर या तिघांच्या नावे क्रिकेटजगात नेहमी फिरणारं एक गाजलेलं वाक्य आहे, Retire when people ask why, not when they ask why not!

आधी रोहित; आता विराट...
डॉन ब्रॅडमन, विजय मर्चण्ट आणि सुनील गावसकर या तिघांच्या नावे क्रिकेटजगात नेहमी फिरणारं एक गाजलेलं वाक्य आहे, Retire when people ask why, not when they ask why not! हे वाक्य यापुढे विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीलाही तंतोतत लागू होईल! देशात युद्धस्थिती असतानाच कोहलीने निवृत्तीच्या घाेषणेचा बाॅम्ब फोडला. त्याआधी आठवडाभर भारताचा कप्तान राेहित शर्मानेही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. एकामागोमाग आलेल्या या दोन घोेषणा क्रिकेटरसिकांसाठी धक्कादायक तर आहेतच, पण या दोघांनी अचानक निवृत्ती का घेतली, की त्यांना निवृत्ती घेण्यास परोक्ष-अपरोक्षपणे भाग पाडण्यात आलं, असाही ‘गंभीर’ प्रश्न आहे! बीसीसीआयमधलं बदलतं वारं आणि त्याहीपेक्षा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शर्मा-कोहली या दोन दिग्गजांचं नातं ‘पुरेसं’ प्रेमळ नसल्याच्या बंद दाराआडच्या चर्चा अधूनमधून उघड होत होत्याच.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा अपमानजनक पराभव झाला. खुद्द कप्तान शर्माला ऑस्ट्रेलियात एका कसोटी सामन्यात संघाबाहेर राहावं लागलं. त्यापूर्वी न्यूझीलंडने भारतात येऊन भारतीय संघाला कसोटीत चीतपट केलं. या दोन्ही गोष्टी भारतीय क्रिकेटसाठी लाजिरवाण्याच होत्या. शर्मा-कोहलीकडे बोट दाखवून ‘खेळापेक्षा खेळाडू मोठे होणं भारतीय क्रिकेटला मारक असल्या’ची अत्यंत बोचरी टीका झाली. पुढे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी जल्लोषात हे सारं मागे पडलं. आता इंग्लंडचा आगामी दौरा आव्हानात्मक आहे. भारतीय संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. अशावेळी कोहलीसारखा अत्यंत अनुभवी खेळाडू तडकाफडकी निवृत्ती जाहीर करतो... कप्तानी काढून घेतल्या जाण्याच्या किंवा वगळण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत रोहित शर्मा बाजूला होतो; याचा अर्थ म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये खदखद आहे हे नि:संशय.
भारतीय क्रिकेटचे ‘रो-को’ (राेहित-कोहली) यापुढे कसोटी संघात दिसणार नाहीत हे वास्तव. आता कसोटी आणि आधी टी-२० क्रिकेटमधून विराटची निवृत्ती हेच सांगते की त्याला अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळण्यात रस आहे. २०२७ च्या विश्वचषकाचं स्वप्न अजूनही त्याला खुणावतं आहे. हेही खरं, की विराट कोहली भारतीय क्रिकेटचाच नाही तर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेहरा बनला. भारतासह जगभरातल्या तरुण क्रिकेटपटूंचा आदर्श ठरला. एका ध्येयापोटी माणूस स्वत:ला किती बदलवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोहली. शिस्त, फिटनेस आणि खेळाप्रतिची बांधिलकी ही त्याची ओळख. खेळापेक्षा खेळाडू कधीच मोठा होत नाही; पण गावसकर, तेंडुलकर आणि आता कोहलीसारखे काही खेळाडू खेळाची शान इतकी वाढवतात की, प्रचंड लोकप्रियतेपलीकडे जाऊन माणसांची सुख-दु:खं खेळाशी जोडून टाकतात! परिस्थितीने पिचलेल्या आणि आपल्या रोजच्या जगण्यात हतबल असलेल्या सामान्य माणसाला कोहलीकडे पाहून विश्वास वाटतो की, धावांचा पाठलाग करण्याचं कितीही अवघड काम असो; विजयाचं लक्ष्य कोहली गाठणारच.
आवडत्या खेळाडूचं क्रीडांगणावरचं यश हे अनेकांच्या जगण्यातली आनंदाची दुर्मीळ झुळूक असते. कोहली ही अशी एक झुळूक होता. १४ वर्षांची कसोटी क्रिकेट कारकीर्द ३० शतकांसह संपवून त्यानं कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे. तेच रोहित शर्माचंही. या दोघांच्या निवृत्तीबरोबरच भारतीय कसोटी क्रिकेटमधलं ‘रो-को’ नावाचं एक पर्व संपलं. कसोटी क्रिकेटसारख्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या आणि क्रिकेटच्या अस्सल बहारदार रूपात या दोघांचा सुंदर तंत्रशुद्ध खेळ पाहणं हा क्रिकेटरसिकांसाठी एक सुंदर अनुभव होता. भारतीय क्रिकेटला अतिशय फिअरलेस आणि आक्रमक बनवणारे हे दोन खेळाडू. आज क्रिकेट खेळणारे जगभरातले हजारो क्रिकेटपटू त्यांना आदर्श मानतात. विशेषत: कोहली. भारतीय क्रिकेटपटूच नाही तर सर्वच खेळांमधले तरुण खेळाडू कोहलीसारखा फिटनेस, त्याच्यासारखा आक्रमक चपळपणा आणि त्याच्याइतकीच जिंकण्याची ईर्षा आपल्यात यावी अशी स्वप्नं पाहतात.. क्रिकेटविक्रमांची कसोटी वाट जरी कोहलीनं अर्धवट सोडली असली तरी त्यानं तरुण खेळाडूंना दिलेलं जिंकण्याचं स्वप्न मात्र कायम भारतीय क्रिकेटसोबत राहील!