अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार?
By अतुल कुलकर्णी | Updated: June 15, 2025 07:31 IST2025-06-15T07:29:31+5:302025-06-15T07:31:23+5:30
Jayat Patil: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भूमिका घेतली.

अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार?
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई: प्रिय जयंतराव नमस्कार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भूमिका घेतली. मात्र उपस्थितांनी आपल्यावर प्रेम दाखवत आपल्याला तसे बोलू दिले नाही. या निमित्ताने काही गोष्टी आपल्या कानावर घालाव्यात म्हणून हा पत्रप्रपंच. सध्या आपल्या पक्षाचे आपल्यासह १० आमदार व ७ खासदार भाजपामध्ये जायला तयार आहेत. दिंडोरीचे भगरे गुरुजी मात्र अजून तयार नाहीत अशी आमची माहिती आहे. याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असे शरद पवार यांनी सांगून टाकले आहे. आपण त्या दोघांनाही चांगले ओळखता. सुप्रियाताई मोठ्या साहेबांना न सांगता इतका मोठा निर्णय घेऊ शकतात यावर आपला विश्वास आहे का? मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या भेटीला गेले. तेव्हा त्यांनी, काही दिवस जाऊ द्या. सुप्रिया सुळे काय निर्णय घेतात ते बघू... त्यानंतर ठरवू... असे सांगितल्याची चर्चा आहे.
आपण साहेबांना चांगले ओळखता. ते जाणीवपूर्वक काही गोष्टी बाहेर येऊ देतात. त्यावर समाजात काय प्रतिक्रिया उमटतात ते बघून निर्णय घेतात. तो घेताना आपले राजकारण रिलेव्हन्ट कसे राहील याकडेही कटाक्षाने लक्ष देतात. त्याची प्रचिती आपल्याला अनेकदा आली असेल. फार दूर कशाला..? पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी अजितदादा यांच्याशी बोलून घेतल्याचे सांगितले होते. मात्र जनमत आपल्या बाजूने झुकले आहे हे बघताच त्यांनी निर्णय बदलला होता. हे बराेबर आहे ना? आपण भाजपसोबत जाणार की नाही ही चर्चा सुरू असताना आपल्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही घेतले जाईल असे सांगितले जाते. आपण चांगले बोलता. टोमणे मारण्यात आपण पटाईत आहात. पण आपल्या एकट्याच्या जीवावर आपण पक्ष उभा करू शकत नाही असे आपल्याच पक्षातले नेते खाजगीत सांगतात. रोहित पवारांसारखा पहिल्यांदा आमदार झालेला तरुण तुम्हाला चॅलेंज देतो. पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची कामगिरी समाधानकारक होणार नाही, असे वाटल्यामुळे आपण राजीनाम्याची भूमिका घेतल्याचेही काही नेते सांगत होते. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना हे ऐकून खूप वाईट वाटते.
आपले सहयोगी मित्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सुषमा अंधारे भाजप किंवा अजित पवारांच्या गटात जातील अशी चर्चा आहे. तडफदार भाषणे करणाऱ्या सुषमाताई पक्षांतर करणार व खासदारकी संपत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी भाजप सांगेल त्या पक्षात जातील असे काही नेते सांगत आहेत. हे सगळे ऐकून महाराष्ट्रात विरोधी पक्ष औषधाला तरी शिल्लक राहील का? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आपण विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्या छगन भुजबळांनी एकेकाळी सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडले होते. ते आता सत्ताधाऱ्यांसोबत गेले आहेत. त्यामुळे आपल्याकडूनच सगळ्या अपेक्षा आहेत. आपण सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी बोला. तिघे मिळून पत्रकार परिषद घ्या. आम्ही आमचे पक्ष सोडणार नाही असे ठामपणे सांगा. कार्यकर्त्यांच्या मनातली घालमेल थांबेल. आदित्य आणि राज ठाकरे यांचे एकत्रित होर्डिंग लावणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज यांच्या भेटीनंतर घराबाहेर पडलेले नाहीत. त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. आता त्या होर्डिंगचे काय करावे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
जयंतराव, पाच वर्षे विरोधी पक्षात राहून, विरोधी पक्ष जिवंत ठेवणे आणि सोबत आपला पक्ष वाढवत कार्यकर्ते जोडणे, राज्यभर स्वतःचा माहोल तयार करणे... अशी खाशी संधी आपल्याला चालून आली आहे. इतिहासात नोंद करण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे. महाराष्ट्र आपल्याकडे आशेने बघत आहे. तो निराश होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आपले हितचिंतक दुसऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही आपल्याविषयी हाच विश्वास आहे. तो विश्वास त्यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ बोलून दाखवल्याची माहिती आहे. फडणवीस यांनी मात्र त्यांच्या बसमध्ये जागा नाही. जयंतरावांना घ्यायचे तर बसमधल्या कोणालातरी उतरवावे लागेल, अशी गुगली टाकल्याने अनेक मंत्र्यांमध्ये खळबळ आहे.
काँग्रेस पक्षाचे काम अत्यंत संयमाने सुरू आहे. नवे प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि पक्षाचा बारकाईने अभ्यास करत आहेत. तो पूर्ण झाला, की ते काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करतील. जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका येतील... जातील... कार्यकारिणी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जरी ती जाहीर झाली तरी हरकत नाही. पण अभ्यास पूर्ण झाला पाहिजे या जिद्दीने ते कामाला लागल्याचे वृत्त आहे. ती चिंता आपल्याला नाही. आपला अभ्यास दांडगा आहे. आग असल्याशिवाय धूर निघत नाही ही म्हण खोटी ठरवण्याची हीच ती संधी आहे. तेव्हा महाराष्ट्राला आपला बाणेदारपणा दाखवून द्या... आम्हाला तुमचा अभिमान वाटेल, - तुमचाच, बाबूराव