सावधान! जग निखाऱ्यावर उभे ! युद्धखोर धोरणे आणि विस्कळीत अर्थकारणामुळे जगाचे भविष्य धोक्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:22 IST2026-01-16T08:22:23+5:302026-01-16T08:22:45+5:30
ग्लोबल व्हिलेज नावाने एकजीव झालेल्या जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला हे प्रश्न भेडसावताहेत.

सावधान! जग निखाऱ्यावर उभे ! युद्धखोर धोरणे आणि विस्कळीत अर्थकारणामुळे जगाचे भविष्य धोक्यात?
लहरी डोनाल्ड ट्रम्प, व्हेनेझुएलापासून ग्रीनलँडपर्यंतचे त्यांचे रोजचे चाळे, इराणमधील असंतोषाला उघड मदत आदींच्या माध्यमातून रोज दिसणारी युद्धाची खुमखुमी, शत्रू म्हणविणाऱ्या देशातील नागरिकांवर अमेरिकेत रोज नवनवे निर्बंध आणि दुसऱ्या बाजूला रोज एकेका देशाला व्यापारावर टॅरिफची धमकी हे सगळे पाहता जगाचे नजीकचे भविष्य नेमके काय असेल? रोजचा दिवस काहीतरी नवे आरिष्ट घेऊन उगवतो आहे. प्रत्येकापुढे उद्याची चिंता आहे. अशावेळी इराण व त्याच्या मित्रराष्ट्रांवर अमेरिका, इस्रायल हल्ला करील का, तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल का, तसे झाले तर किती जीवितहानी होईल आणि महत्त्वाचे म्हणजे जगाचे राजकारण, अर्थकारण कसे वळण घेईल? ग्लोबल व्हिलेज नावाने एकजीव झालेल्या जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला हे प्रश्न भेडसावताहेत. या प्रश्नांची उत्तरे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल रिस्क रिपोर्टने दिली आहेत आणि प्रत्यक्षात ती नुसतीच उत्तरे नाहीत तर अंगावर काटा आणणारी भीती त्यातून उभी राहिली आहे. हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी जानेवारीत स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक अर्थ परिषद घेतो.
महाराष्ट्रात आपल्याला ही परिषद परिचित आहे ती तिथे होणाऱ्या गुंतवणूक करारासाठी. पण, या परिषदेच्या तोंडावर फोरमने पुढच्या दोन वर्षांत, तसेच दहा वर्षांत असे अनुक्रमे नजीकच्या व थोड्या दूरच्या भविष्यातील धोके ग्लोबल रिस्क रिपोर्टच्या माध्यमातून जगापुढे आणले आहेत. जगभरातील तब्बल तेराशे तज्ज्ञांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे आणि एका वाक्यात सांगायचे तर, महासत्तांमधील व्यापारी संघर्ष, त्यातून उभे राहणारे युद्धाचे प्रसंग यामुळे पुढची दोन वर्षे जगासाठी वादळी, अस्थिर, अर्थातच गंभीर चिंतेची असतील. जिओइकॉनॉमिक कन्फ्रेंटेशन म्हणजे भू-आर्थिक टकराव रोज अनुभवावा लागेल. व्यापारयुद्ध, टॅरिफ, निर्बंध हे शब्द रोज मेंदूवर आदळतील. त्यातून जागतिक व्यापाराची सध्याची घडी, पुरवठा साखळी पार विस्कळीत होईल. ज्या जागतिक महासत्ता हे व्यापारयुद्ध खेळताहेत त्या खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवत राहतील. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होईल. सामाजिक व आर्थिक ध्रुवीकरण वाढेल. गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढेल. युद्धे लादली जातील. त्यात किती भयंकर नरसंहार होतो हे अलीकडेच आपण पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत अनुभवले आहे. आपण अमुक इतकी युद्धे थांबविली असा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प तेलाची तहान भागविण्यासाठी व्हेनेझुएलाच्या लोकनियुक्त अध्यक्षाला उचलून आणतात, ग्रीनलँडवर ताबा सांगतात आणि या प्रकारे नव्या युद्धाला कारणीभूत ठरतात, हा यातील विरोधाभास. या साऱ्याच्या जोडीला जोडीला जागतिक तापमानवाढ, त्यातून नैसर्गिक आपत्ती वगैरे संकटे असतीलच. देशादेशांमधील या मुद्द्यावरील परस्पर सहकार्य कमी झालेले असेल, असे प्रश्न सोडविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अनेक मंच अमेरिकेने सोडले हे या अनुषंगाने उल्लेखनीय. तथापि, ट्रम्पकेंद्रित सुल्तानी संकटाने या आस्मानी संकटांची तीव्रता व धोका कमी केला आहे. यंदाच्या अहवालात ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानबदलाचे संकट दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीतील धोक्यांच्या यादीत आहे.
भारतासारख्या सध्या तटस्थ असलेल्या देशावर अमेरिकेने लादलेल्या टॅरिफसोबतच सायबर हल्ले वाढतील. आर्थिक असमानता वाढेल. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत राहतील. आर्थिक मंदीचाही सामना करावा लागेल. एकंदरित परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि चोहोबाजूंनी येणाऱ्या संकटांमध्ये सामान्य माणूस भरडला जाणे परिहार्य आहे. या जागतिक भांडणाशी आपला काय संबंध असे म्हणून कोणालाही या संकटाला चकवा देता येणार नाही. कारण, आपण रोज वापरणाऱ्या वस्तू, सेवा अशा सगळ्यांचाच जागतिक व्यापाराशी संबंध आहे आणि दूरवरच्या अमेरिकेत, रशियात किंवा गेला बाजार चीनमध्ये जे काही घडते, घडेल त्याचा थेट परिणाम भारतातल्या प्रत्येकावर होतोच होतो. एक प्रकारे महासत्तांमधील ही लढाई जगाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य माणसाचे नुकसान करीत असते. तेव्हा, या उद्याच्या संकटाच्या हाका वेळीच लक्षात घेणे, या संघर्षाची कमीत कमी झळ आपल्याला बसेल याची तजवीज करणे, स्वतः तसेच देशाने शक्य तितके स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनणे, सरकारच्या अशा प्रयत्नांना साथ देणे, एवढे तरी प्रत्येकाच्या हातात नक्कीच आहे. त्यासाठी सज्ज होऊया !