शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:21 IST

निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग व बंधू पशुपती पारस यांनी लोक जनशक्ती पक्षावर मालकी सांगितली तेव्हा वर्षभरापूर्वी, पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘बंगला’ हे चिन्ह गोठवून दोघांना अनुक्रमे ‘हेलिकॉप्टर’ व ‘शिलाई मशीन’ ही चिन्हे दिली. २०१७ मध्ये जयललितांच्या निधनानंतर त्यांच्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी अण्णाद्रमुकचे दोन गट एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. तेव्हाही अण्णाद्रमुकचे ‘दोन पाने’ हे चिन्ह तात्पुरते गोठवले गेले. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा प्रवासही याच प्रक्रियेतून झालेला आहे.

बैलजोडी, गायवासरू ते हात असा हा प्रवास होता. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचे कोंदण लाभलेल्या घटनापीठाच्या मंगळवारच्या निर्णयानंतर ‘धनुष्यबाण’ या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचे काय होते, ही उत्सुकता सगळ्यांना आहे. हे स्पष्ट आहे, की बंडखोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याचे काय होते, याची भारतीय निवडणूक आयोगाने वाट पाहण्याची गरज नाही.

शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष व मूळ राजकीय पक्ष स्वतंत्र असल्याने मूळ शिवसेना कुणाची व धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यासंदर्भातील फैसला करण्यास आयोगाला काहीच आडकाठी नाही. या निर्णयामुळे गेल्या तीन महिन्यांच्या राजकीय वावटळीची धूळ काहीशी खाली बसली आहे, असे मात्र म्हणता येऊ शकेल. ‘आपलीच शिवसेना खरी’ असल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यावर आता आयोगापुढे सुनावणी सुरू होईल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल हा शिंदे गटाला दिलासा मानला गेला. खरेतर निकालाचा तसा अर्थ होत नाही. कदाचित, शिंदे गट भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सत्तेवर आहे आणि भाजप केंद्रात सत्तेवर आहे, हे तसे मानण्याचे कारण असावे.

निवडणूक आयोगापुढे हा संघर्ष बराच काळ चालेल. १९६८ च्या निवडणूक चिन्हविषयक कायद्यानुसार चालणारी ही प्रक्रिया किचकट व वेळकाढूदेखील आहे. पक्षाची घटना व रचना, पदाधिकारी, प्रतिनिधी व सदस्य यांचे संख्याबळ, कायदेमंडळातील प्रतिनिधी व पक्षसंघटनेतील संख्याबळ या पातळ्यांवर बहुमताची पडताळणी होईल. ज्या गटाचे बहुमत असेल त्याला ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळेल. दोन्ही गट तुल्यबळ असतील, तर मात्र चिन्ह गोठवले जाईल आणि दोघांनाही नव्या पक्षाची नोंदणी करावी लागेल, असे या लढाईचे स्वरूप असेल. यापैकी विधानसभा व लोकसभा सदस्यांच्या संख्येबाबत शिंदे गटाचे पारडे जड आहे. शिवसेना पक्षाची घटना व पदाधिकारी, क्रियाशील व प्राथमिक सदस्य यासंदर्भात अजून चित्र स्पष्ट व्हायचे आहे. असे म्हणता येईल, की सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारच्या निर्णयामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर पोहाेचला आहे. गेल्या २१ जूनपासून रोज राजकारणाला उकळ्या फुटताहेत.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा व महाविकास आघाडी सरकारचे पतन हा त्याचा उत्कलन बिंदू होता. त्या बिंदूवर शिवसेनेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. विधानसभा व लोकसभेच्या बहुसंख्य सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. दोन्ही काँग्रेसऐवजी भारतीय जनता पक्षासोबत सत्ता हेच खरे हिंदुत्व आणि तीच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट पक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी सुरूवातीला सुरतला गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयाला साकडे घालण्यात आले आहे. ती याचिका थेट दिवाळीनंतर सुनावणीला येणार आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांची निवडणूक तोंडावर आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावण्याचा शिंदे गट व भाजपचा प्रयत्न राहील व त्यासाठी धनुष्यबाण हे चिन्ह महत्त्वाचे आहे. खरा प्रश्न आहे, राजकारणाच्या उत्कलन बिंदूप्रमाणे धनुष्यबाण चिन्हाचा गोठनबिंदू जवळ आला आहे का? निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय