शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

देवेंद्रांचे पंचामृत! केवळ संकल्प, प्रत्यक्ष स्थिती नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:00 IST

फडणवीस यांनी पंचामृत ध्येयावर आधारित असे म्हटलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल; परंतु हा केवळ संकल्प आहे, प्रत्यक्ष स्थिती नव्हे, याचे भान सोडून चालणार नाही.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सादर केलेला अर्थसंकल्प किमान वरकरणी तरी कुठेही बोट ठेवण्यास जागा देणारा नाही. समाजाच्या सर्वच घटकांना काही ना काही तरी देण्याची घोषणा करणारा, असेच फडणवीस यांनी पंचामृत ध्येयावर आधारित असे म्हटलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल; परंतु हा केवळ संकल्प आहे, प्रत्यक्ष स्थिती नव्हे, याचे भान सोडून चालणार नाही.

राज्याची प्रत्यक्ष आर्थिक स्थिती काय आहे, याचे चित्र बुधवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे आणि ते काही फार छान नाही. अर्थात, आम्हाला सत्तेत येऊन जेमतेम आठच महिने झाले आहेत, अशी मखलाशी करण्याची संधी विद्यमान सरकारकडे नक्कीच आहे; परंतु त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याची वस्तुस्थिती काही बदलत नाही. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्याची गरज होती का आणि केलेल्या घोषणांची पूर्तता करण्याइतपत राज्याची अर्थव्यवस्था सक्षम आहे का, हे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत; किंबहुना फडणवीस यांचे अर्थसंकल्पीय भाषण आटोपताच विरोधकांनी तशी सुरुवात केलीही!

विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष अवकाश आहे. त्यामुळे सरकारकडे पुढील वर्षी किमान सहा महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची संधी नक्कीच असताना, यावर्षीच्या अर्थसंकल्पातच निवडणूकपूर्व अर्थसंकल्प असल्यागत घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. विशेषत: शेतकरी वर्गाला खुश करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गुरुवारी तुकाराम बीज होती. ते औचित्य साधून, तुकोबारायांच्या ‘पिकवावे धन, ज्याची आस करी जन’ या ओळी उद‌्धृत करीत, अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ केलेल्या फडणवीस यांनी, भाषणाच्या प्रारंभीच शेतकरी वर्गासाठी घोषणांचा अक्षरशः पूर आणला.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत राज्यातर्फे प्रतिशेतकरी सहा हजार रुपयांची भर, केवळ एक रुपयांत पीकविमा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषी विकास अभियान, २०१७ मधील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांना लाभ, मागेल त्याला शेततळे योजनेचा व्यापक विस्तार, काजू फळ विकास योजना, काजू बोंडू प्रक्रिया केंद्र, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख मदत, अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या. कुणीही त्यांचे स्वागतच करेल; पण स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत सर्वच सरकारांनी शेतकऱ्यांसाठी अनेकानेक घोषणा करून, योजना सुरू करून, त्यासाठी अब्जावधी रुपयांची तरतूद करूनही, शेतकऱ्याची स्थिती बिकटच का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सरकार कधी तरी करणार आहे की नाही? की प्रत्येक अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊसच पाडणार आहे? केवळ शेतकरीच नव्हे, तर समाजाच्या प्रत्येकच घटकाला खुश करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचे स्पष्टपणे जाणवते.

विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, निराधारांना वाढीव अर्थसाहाय्य, विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी, आर्थिक विकास महामंडळे अशा घोषणा फडणवीस यांनी केल्या. त्याशिवाय आदिवासी, अल्पसंख्याक, असंघटित कामगार, टॅक्सी व ऑटोचालक, दिव्यांग अशा विविध वर्गांसाठीही काही न काही तरी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राकडेही फडणवीस यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. महामार्ग, उड्डाणपूल, विमानतळ यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी तरतुदी करतानाच, आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांमधील रस्त्यांच्या विकासासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

त्यासाठी त्या त्या समाजांतील महापुरुषांच्या नावाने योजनांची घोषणा करण्यात आली आहे. महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरीव आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत; पण छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काय झाले, याबाबत ब्र काढलेला नाही. याशिवाय इतरही अनेक घोषणांची भरमार अर्थसंकल्पात आहे. या सर्व घोषणांचे कुणीही स्वागतच करेल; पण त्यासाठी आवश्यक असलेला पैसा कोठून आणि कसा येणार, यावर मात्र अर्थमंत्र्यांनी प्रकाश टाकला नाही. अगदी फाटकी व्यक्तीही अंथरूण बघूनच पाय पसरत असते; पण सरकारने मात्र तो विचार केल्याचे अर्थसंकल्पीय भाषणातून जाणवत नाही!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्र