आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा!

By किरण अग्रवाल | Published: July 23, 2020 09:44 AM2020-07-23T09:44:07+5:302020-07-23T09:46:38+5:30

राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत.

Confidence is needed along with self-reliance! | आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा!

आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा!

Next

- किरण अग्रवाल

संकटे येतात व जातात; परंतु त्यावर मात करण्याची जिद्द व त्याबाबतचा विश्वास मनात असला तर कोणतेही संकट कुणालाही अडवू शकत नाही. कोणाचे जगणे मुश्कील करू शकत नाही, की कोणाची प्रगती रोखू शकत नाही. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात व्यावहारिकदृष्टीने दिल्या गेलेल्या आत्मनिर्भरतेच्या संदेशाला आत्मविश्वासाची जोड लाभणे त्यासाठीच गरजेचे आहे. या आजारातून आपण बरे होऊ शकतो, यासंबंधीचा विश्वास जागविण्यासाठी भारतीय जैन संघटनेसारख्या संस्थांनी योजिलेल्या ‘मिशन झिरो’सारख्या उपक्रमांचे महत्त्व म्हणूनच मोठे आहे.

राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्ती अधिकच घाबरून जाणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थात शासन प्रशासनातर्फे ठिकठिकाणी कोविड सेंटर्सची उभारणी करून काळजी घेण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेतच, मात्र बाधितांची संख्या अशा वेगाने वाढते आहे की, या यंत्रणा अपुऱ्या पडाव्यात. परिणामी कोरोनाची तपासणी व त्याचे निदान सोडाच; परंतु अन्य आजारांसाठी रुग्णालयाची पायरी चढणेदेखील अनेकांसाठी मुश्कील बनले आहे. कसे होईल आपले, अशी भीती अनेकांच्या मनात दाटली आहे. या भीतीमधून रक्ताच्या नातेसंबंधातील रुग्णांकडेसुद्धा काही ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे सामाजिक पातळीवरील संबंधांचे नवेच प्रश्न आकारास येऊ पहात आहेत. अशा स्थितीत सामाजिक भान जपत प्रत्येकच अडीअडचणीच्या वा संकटाच्या काळात मदतीसाठी धावून येणा-या भारतीय जैन संघटनेने पुन्हा पुढे येत व शासनाला मदतीचा हात देत सेवा कार्यास जुंपून घेतले आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

खरे तर अलीकडच्या काळात अनेक सामाजिक संघटना या केवळ त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वासाठी अस्तित्वात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते, त्यामुळे सामाजिक कामांचे संदर्भही बदलून गेलेले दिसून येतात; परंतु भारतीय जैन संघटनेने आपल्या सेवाकार्याच्या बळावर निस्पृहतेचा वेगळा ठसा उमटविण्यात यश मिळविले आहे. या संघटनेचे अर्ध्वयू शांतिलाल मुथा या व्यक्तीची या संघटनेमागील प्रेरणा व ऊर्जा स्तिमित करणारीच आहे. मनाची संवेदनशीलता काय असू शकते व त्यातून ‘एैसी कळवळ्याची जाती’ याचा प्रत्यय कसा येऊ शकतो, हे मुथा यांच्याकडे पाहून कळावे. त्यामुळेच जिथे शासन प्रशासनही एकटेच पडताना किंवा त्यांना मर्यादा आलेल्या दिसून येतात, तिथे मुथा यांची संघटना धावून जाताना दिसून येते. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांपासून ते लातूरच्या किल्लारी व सास्तूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेनंतर तेथील मदतकार्यासाठी धावून जाण्यापर्यंतची या संघटनेच्या सेवेची उदाहरणे देता येणारी आहेत. दूर कशाला जायचे, गेल्या दोनेक वर्षापूर्वी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून अभिनेते आमीर खान यांच्या पानी फाउण्डेशनच्या सहकार्याने व स्थानिक नागरिकांच्या श्रमदानाने या संघटनेने अनेक ठिकाणी तलावांमधील गाळ उपसून पाणी साठवण्यासाठीची जी मोहीम हाती घेतली होती व त्यासाठी शेकडो जेसीबी उपलब्ध करून दिले, ते अजूनही जनतेच्या विस्मृतीत गेलेले नाही. कोरोनाचेच घ्या; लॉकडाऊन झाल्यावर स्थलांतरितांचे जे लोंढे गावाकडे परतू लागले होते त्यांच्या जेवणा-खाण्यासाठी व हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी या संघटनेने जागोजागी अन्नछत्र चालवून लाखोंच्या तोंडी जो घास भरवला ते तर ताजे उदाहरण आहे.

एवढ्यावर न थांबता भारतीय जैन संघटना आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठीही पुढे आली असून, फोर्स मोटर्सच्या सहकार्याने या संघटनेने सुमारे ४९ शहरांमध्ये २७९ मोबाइल डिस्पेंसरी व्हॅन्सच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठीचा ‘मिशन झिरो’ उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सुरू करण्यात आलेल्या या मिशनमुळे संशयित रुग्णांचे ट्रेसिंग होऊन व त्यांना वेळेवर उपचार मिळून कोरोनामुक्तीकडील त्यांची वाटचाल सुलभ होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदान व उपचार वेळेवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात असलेली भीती दूर होऊ शकेल. आजच्या संकटसमयी कोरोनाबाबत मनामनात घर करून असलेली भीती दूर होणेच प्राधान्याचे आहे. भीतीने मनुष्य खचतो, म्हणून संकटाशी लढण्याची जिद्द व आत्मविश्वास त्यामध्ये जागवणे गरजेचे आहे. त्याचसाठी कोरोनाला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा असा संदेश देत आत्मविश्वास जागविण्याकरिता हे मिशन हाती घेण्यात आल्याचे शांतिलाल मुथा यांनी म्हटले आहे. तेव्हा हे मिशन तडीस जावो आणि शासन तसेच सामाजिक संस्था-संघटनांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या भयापासून मुक्ती मिळो याच अपेक्षा.  

Web Title: Confidence is needed along with self-reliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.