"...तुम्हा पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 08:23 IST2026-03-17T08:23:30+5:302026-03-17T08:23:42+5:30
शहरातल्या माणसांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात. याबद्दल महानगरांबाहेरच्या माणसांना वाटणाऱ्या असूयेतूनच असे शेरे मारले जातात.

"...तुम्हा पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!"
मेघना भुस्कुटे, ब्लॉगर, भाषांतरकार
“तुम्हा पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!” अशी किंचित असूयायुक्त अप्रूपाची एक झाक महाशहरांच्या बाहेरच्या लोकांच्या बोलण्यात असते. त्या असूयेचं मूळ कशात असतं? तर ते सुरळीत आणि सुसज्ज अशा यंत्रणांची कायमस्वरूपी उपलब्धता गृहीत धरता येणं, या महाशहरांच्या वैशिष्ट्यात असतं.
लोडशेडिंग होईल म्हणून घाईनं कामं आटपावी न लागणं, पाणी भरण्याचं प्रचंड कष्टप्रद काम करावं न लागता नळ सोडला की पाण्याची धार पडू लागणं, मैलोनमैल चालावं न लागता बस-ट्रेन वा रिक्षा-टॅक्सीसारखी वेगवान आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक सर्वांना उपलब्ध असणं...
या तर मूलभूत गोष्टी झाल्या. पण मनोरंजनापासून वैद्यकीय सुविधांपर्यंत अनेक संदर्भात हे लागू होईल. शहरातल्या माणसांना अनेक गोष्टी सहजासहजी आणि सतत उपलब्ध असतात. याचा अर्थ सदासर्वकाळ सगळे जण सगळ्या गोष्टी उपभोगत असतात असं नव्हे. गरज पडली तर कुठल्याही संघर्षाशिवाय हे मिळेल, अशी खात्री त्यांना असते.
या सदासर्वकाळ उपलब्धतेमुळे माणसं सैलावतात. ज्यांचं लहानपण पाण्याच्या अभावात गेलं आहे, अशी माणसं बारमाही पाणी असलेल्या ठिकाणी वास्तव्याला गेली, तरी काही काळ त्यांचा त्या वैपुल्यावर विश्वासच बसत नाही. जमेल त्या प्रत्येक भांड्यात जमेल तेव्हा जमेल तितकं पाणी भरून ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी ते ओतून टाकून पुन्हा भरणं, असा अव्यापारेषु व्यापार ती करत राहतात.
यंत्रणांच्या उपलब्धतेवर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती त्यांनी कधी अनुभवलेलीच नसते. त्यातून हे वागणं येतं. त्यावर तर्काचा इलाज चालत नाही. मात्र एखाद्या नेटक्या शहरात जन्मलेल्या माणसांच्या वर्तनात याचा लवलेशही नसतो. बॉलीवूड वा क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीजचं अप्रूप न बाळगता आपापले व्यवहार चालू ठेवणारे मुंबईकर; रिक्षाच्या तळावर रांग धरली की रिक्षा मिळणार या खात्रीनं घाईगडबड न करता बसमधून शांतपणे उतरणारे म्हैसूरकर; सकाळी सातच्या ठोक्याला स्टेशनवरच्या बेकरीत ताजा नाश्ता मिळणार या खात्रीनं उपाशीपोटी ऑफिसला निघणारा पॅरिसकर; चाकाची खुर्ची स्वतःची स्वतः नेता येईल असे उतार शहरभर असणार आणि ते नीट राखलेले असणार या खात्रीनं लंडनमध्ये स्वावलंबीपणे फिरणारे वृद्ध आणि अपंग लंडनकर... ही सगळी त्यांचीच उदाहरणं. हे सगळे लोक एक प्रकारची सुरक्षित, रिलॅक्स्ड, उदार मनोवस्था अनुभवत असतात. त्यांना निदान या व्यवस्थांच्या बाबतीत तरी वखवख वा असुरक्षितता नसते.
जी शहरं भांडवलशाहीच्या प्राथमिक पायरीचं लक्षण आणि अंतिम पायरीची खूण मानली जातात, त्यांनीच तृप्त आणि उदार सहजीवनाचं हे प्रारूप उभं करावं हे विसंगत आणि मजेशीर आहे खरं, पण त्यातच शहर नावाच्या व्यवस्थेतली सगळी गंमत दडलेली आहे. ‘गावाकडची निर्मळ-ताजी हवा आणि घरच्या मळ्यातला सेंद्रिय भाजीपाला’ यांचे गुण गाताना न थकणाऱ्या लोकांनाही त्याचं आकर्षण असतं.
अर्थात हे चित्र एका आदर्श शहराचं आहे. अशी निरामय, सहज – आणि मुख्य समतादर्शक समृद्धी कमावली, तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं शहरं होऊ हे वेगानं बकाल होत त्यालाच ‘विकास’ मानणाऱ्या गावांना कळलं आहे का?
meghana.bhuskute@gmail.com