लेख: काही लोकांकडे मखमली गादी आणि अनेकांकडे चटईही नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:05 IST2026-02-27T08:04:04+5:302026-02-27T08:05:15+5:30

आजची जागतिक परिस्थिती मोजक्या लोकांनाच समृद्धीच्या संधी व त्यात वाटा देते. ही असमानता केवळ उत्पन्न वा संपत्तीपुरती मर्यादित राहत नाही !

Article: Some people have velvet mattresses and many don't even have a mat? | लेख: काही लोकांकडे मखमली गादी आणि अनेकांकडे चटईही नाही?

लेख: काही लोकांकडे मखमली गादी आणि अनेकांकडे चटईही नाही?

-अमृत बंग (सहसंचालक, 'सर्च' 'निर्माण' या युवा उपक्रमाचे प्रमुख)
वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट २०२६ नुकताच काही काळापूर्वी जाहीर झाला. दोनशे नामवंत अभ्यासकांनी अत्यंत तपशीलवारपणे तयार केलेल्या या 'जागतिक असमानता अहवाला'तील मुख्य निष्कर्ष काय? जग अत्यंत असमान आहे: जगातील सर्वात गरीब अर्धे लोक एकूण जागतिक उत्पन्नाच्या केवळ ८ टक्के एवढेच कमावतात, तर वरच्या १० टक्के लोकांचे उत्पन्न (इन्कम) उर्वरित ९० टक्के लोकांपेक्षा जास्त आहे.

संपत्ती (वेल्थ) आणखीनच केंद्रित आहे. वरच्या १० टक्के लोकांकडे जागतिक संपत्तीचा ७५ टक्के, तर खालच्या अर्ध्या लोकांकडे फक्त २ टक्के भाग आहे. सर्वात वरच्या १ टक्के लोकांची संपत्ती ही खालच्या ९० टक्के लोकांपेक्षा दीडपट अधिक आहे. वरच्या ०.००१ टक्के (सुमारे ५६,०००) लोकांकडे जगातील अर्ध्या लोकसंख्येपेक्षा ३ पट जास्त संपत्ती आहे.

हे आर्थिक केंद्रीकरण वेगाने वाढते आहे. जगात एका मोजक्या 'अल्पसंख्याक' गटाकडे अभूतपूर्व आर्थिक शक्ती आहे, तर अब्जावधी लोक मूलभूत आर्थिक स्थिरतेपासूनही वंचित आहेत. वशिष्ठ अनुप त्यांच्या 'इसलिये' या कवितेत म्हणतात त्याप्रमाणे..

'हो किसी के लिए मखमली बिस्तरा, और किसी के लिए एक चटाई ना हो' अशी ही विचित्र परिस्थिती आहे.
मुळातच कमी सरासरी उत्पन्न असलेला भारत हा जगात सर्वाधिक आर्थिक असमानता असलेल्या देशांपैकी एक आहे. सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या ६५ टक्के आणि त्यातही वरच्या १ टक्के लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे, तर खालच्या ५० टक्के लोकांचा हिस्सा फक्त ६.४ टक्के आहे. 

सार्वजनिक व्यवस्था अत्यंत कमकुवत असलेल्या आपल्यासारख्या जिथे विविध देशांमध्ये, जीवनावश्यक गरजांसाठी, प्रगतीच्या संधींसाठी आणि कठीण समयी सुरक्षितता म्हणून पैसा अधिकाधिक महत्त्वाचा ठरतो, तिथे कमालीची आर्थिक असमानता ही विशेष धोकादायक आहे.

हवामान बदलातील योगदानाचे वितरण देखील असमान आहे. जगातील सर्वात गरीब अर्ध्या लोकसंख्येचा कार्बन उत्सर्जनाचा वाटा फक्त ३ टक्के आहे, तर वरच्या श्रीमंत १० टक्के लोकसंख्येचा वाटा ७७ टक्के आहे. त्यातही टॉप १ टक्के लोक ४१ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. जे कमी उत्सर्जन करतात ते हवामानाच्या धक्क्यांना सर्वाधिक बळी पडतात. 

दरम्यान, जे सर्वात जास्त उत्सर्जन करतात त्यांच्याकडे हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी किंवा टाळण्यासाठी भरपूर संसाधने असतात. म्हणूनच, कार्बन उत्सर्जनातील जबाबदारीची ही प्रचंड तफावत जगण्याच्या जोखमीचे देखील असमान वितरण आहे.

अमेरिकेच्या 'डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स'मधील 'ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल' ही ओळ प्रसिद्ध आहे. आजची जागतिक परिस्थिती मात्र त्यातील मोजक्यांनाच आर्थिक समृद्धीच्या संधी व त्यात वाटा देते आणि ही असमानता केवळ उत्पन्न वा संपत्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करते. प्रश्न हा की आता याचे काय करायचे ?

तुमची एकूण संपत्ती (सर्व असेट्स, शेती, घर, गुंतवणूक मिळून) ६० लाख रुपये असल्यास तुम्ही जगातील सर्वाधिक श्रीमंत १० टक्क्यांमध्ये आहात आणि ६.५ लाख रुपये तुम्हाला मधल्या ४० टक्क्यांचा भाग बनवतात. याचाच अर्थ जगातील अर्ध्या लोकसंख्येकडे साडेसहा लाख रुपये इतकीदेखील संपत्ती नाही. असे जग न्याय्य व सर्वासाठी राहायला योग्य आहे का?
amrutabang@gmail.com

Web Title : धन असमानता: कुछ के पास विलासिता, कई के पास बुनियादी ज़रूरतें भी नहीं।

Web Summary : वैश्विक धन अत्यधिक असमान है। सबसे अमीर 10% के पास 75% वैश्विक धन है, जबकि सबसे गरीब आधे के पास केवल 2% है। भारत में भी यही असमानता है, जो कमजोर सार्वजनिक प्रणालियों के कारण खतरे पैदा करती है। जलवायु परिवर्तन के प्रभाव इस अन्याय को और बढ़ाते हैं।

Web Title : Wealth disparity: Some have luxury, many lack basic necessities.

Web Summary : Global wealth is extremely unequal. The richest 10% own 75% of global wealth, while the poorest half own just 2%. India mirrors this disparity, posing dangers due to weak public systems. Climate change impacts further exacerbate this injustice.