लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
By मिलिंद कुलकर्णी | Updated: September 2, 2025 09:57 IST2025-09-02T09:54:33+5:302025-09-02T09:57:11+5:30
हतबल असहाय्यता झुगारून डीजेच्या दणदणाटाविरोधात सोलापूरच्या नागरिकांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. त्या चळवळीची कहाणी!

लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
मिलिंद कुलकर्णी,
कार्यकारी संपादक, लोकमत, सोलापूर
भारतीय समाज उत्सवप्रिय. वर्षाचे ३६५ दिवस कुठे ना कुठे सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी होत असतात. रस्त्यावर उतरून शुभेच्छांचे डिजिटल फलक, डीजेचा दणदणाट, लेझरचा झगमगाट आणि वेडेवाकडे नृत्य करीत मिरवणुका काढल्याशिवाय उत्सव साजरा झाला असे हल्ली वाटत नाही. समूहाला मतदार म्हणून बघण्याकडे राजकीय नेते आणि पक्षांचा कल असल्याने सर्वसामान्यांना चढाओढीच्या स्पर्धेत गुंगविण्यात आले आहे. अर्थसहाय्य, साधने पुरवून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रात रुढ झाली आहे. हे रोखण्यासाठी उपाय नाहीत का, तर आहेत. सर्वोच्च न्यायालय, राज्य सरकार, प्रशासनाने वेळोवेळी निकष, नियम आणि बंधने घालून दिली आहेत. पण त्यावर मात करीत ‘राजकीय हस्तक्षेप’ नेहमीच प्रभावी ठरतो, असा अनुभव. ही विचित्र कोंडी फोडण्यासाठी सोलापूरकरांनी एक मार्ग शोधला आहे : ‘निर्नायकी’ लढ्याचा!
डिजिटल फलक, डीजेच्या कर्णकर्कश भिंती, मिरवणुकीत नाचती लेझर किरणे यांचे दुष्परिणाम सगळ्यांना माहीत आहेत. ‘कुणालाच हे नको आहे, पण आपण काय करू शकतो?’- या बहुसंख्यांच्या मनातल्या हतबलतेला दूर सारून समाजाची मानसिकता तयार व्हावी म्हणून सोलापुरातील सजग नागरिकांनी एकत्र येऊन ‘सजग सोलापूरकर समिती’ गठित केली. चळवळीत ‘व्यक्तिगत अजेंडे’ शिरू नयेत म्हणून समिती स्थापन करतानाच ती ‘निर्नायकी’ असेल असे ठरले. या समितीचे अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्ययुद्धातल्या चार हुतात्म्यांना मान देण्यात आला. सोलापुरातील दहा लाख नागरिकांना समितीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. या सर्वसमावेशक धोरणामुळे अल्पावधीत हा लढा निर्नायकतेपर्यंत पोहोचू शकला आहे.
सोलापूरचे राजकीय, भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व वेगळे आहे. १९३० मध्ये सोलापूरकरांनी अभूतपूर्व लढा उभारून इंग्रज अधिकाऱ्यांना सोलापूर सोडणे भाग पाडले होते. १९४७ पूर्वी चार दिवसांचे स्वातंत्र्य सोलापूरकरांनी अनुभवले होते. कापड गिरण्या, यंत्रमाग आणि विडी उद्योग यामुळे हे कष्टकरी लोकांचे शहर. कर्नाटक, तेलंगण राज्याच्या सीमेवर असल्याने मराठी, तेलुगू आणि कान्नड भाषिक समाज याठिकाणी गुण्यागोविंदाने राहतो. कोणताही वाद न उद्भवता तिन्ही भाषा भगिनी सुखाने नांदतात. मिश्र संस्कृतीमुळे तिन्ही राज्यांचे सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी येथे जल्लोषात साजऱ्या होतात. वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी १८७ दिवस सोलापुरात सार्वजनिक मिरवणुका काढल्या जातात. अलिकडे डिजिटल फलक, डीजे आणि लेझर शो यामुळे मिरवणुकांचे स्वरूप आमूलाग्र बदलले. त्यामुळे समाजातील धोरणी, सुज्ञ व विवेकी माणसे हळूहळू सार्वजनिक उत्सवांमधून बाहेर पडली. तरुणाईच्या हातात हा उत्सव गेला आणि त्याला राजकीय पाठबळ लाभले. हे स्वरूप बदलण्यासाठीच हा लढा उभारला गेला.
सार्वजनिक मिरवणुका जशा रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करतात, त्याच पद्धतीने सज्जनशक्तीचे दर्शन रस्त्यावर उतरून घडविण्याचा निर्णय झाला. स्वाक्षरी मोहिमेच्या उपक्रमात एका दिवसात ४२ हजार नागरिकांनी डीजेमुक्तीचा निर्धार बळकट केला. ज्येष्ठ नागरिकांच्या २२ संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डीजे आणि लेझरचा आरोग्याला त्रास फार. या सगळ्यांबाबत वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रचार व प्रसार केला. आयएमए, निमा, होमिओपॅथी डॉक्टर संघटना यांनी एकत्र येऊन जनजागृतीपर रॅली काढली. डीजेचा दणदणाट विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असल्याने शालेय विद्यार्थ्यांनी तीन किलोमीटर अंतराची मानवी साखळी तयार केली आणि या गंभीर समस्येकडे प्रशासन व समाजाचे लक्ष वेधले. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी मिसकॉल मोहीमही राबविण्यात आली.
सज्जनशक्तीच्या या स्वयंस्फूर्त लढ्याची दखल प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घ्यावी लागली. गणेशोत्सव मंडळांनीच डीजे व लेझर शो बंदीचा निर्णय उत्स्फूर्तपणे घेतला. डीजे व्यावसायिकांना दिली गेलेली आगाऊ रक्कम मिळवून देण्याची ग्वाही पोलिस आयुक्तांनी दिली. परिणामी गणेश स्थापनेला सोलापुरात डीजे वाजलाच नाही. लेझरचा झगमगाट झालाच नाही. मिरवणुकीत पारंपरिक खेळ व वाद्ये दिसली. वारकरी शाळांमधील मुलांनी गायिलेल्या अभंगांनी डीजेला विसरायला लावले. हे व्यापक यश आहे. ते पुढे १८७ दिवस टिकावे, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.