भागवत, भान आणि भविष्य! नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 06:29 IST2026-02-10T06:28:26+5:302026-02-10T06:29:05+5:30
शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती

भागवत, भान आणि भविष्य! नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे
सलमान खान, अक्षय कुमार यांच्यापासून ते शिल्पा शेट्टी, रणबीर कपूर आणि नव्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळविलेल्या अदनान सामीपर्यंत झाडून साऱ्या बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी मायानगरी मुंबईत संघाचा दृष्टिकोन मांडला. यापैकी सलमान खान व अदनान सामीच्या हजेरीमुळे भागवतांची विधाने राजकीय वर्तुळाबाहेर चर्चेत आली. अर्थात, अनेकांच्या भुवया उंचावल्या. अदनान सामीच्या पाक पायलट वडिलांनी १९६५च्या युद्धात भारतावर हवाई हल्ले केल्याच्या कारणाने टीका झाली. प्रत्येक भारतीयाने तीन अपत्यांना जन्म देण्याचा मुद्दा, व्यक्ती-कुटुंब किंवा देशाच्या प्रगतीसाठी लोकसंख्यावाढ तारक की मारक या अनुषंगाने तसा वादाचा आहे. केवळ भागवतच नव्हे, तर अगदी दक्षिणेकडील काही राजकीय नेतेदेखील वेगळ्या परिप्रेक्ष्यात हा आग्रह धरीत आहेत. भागवत पुन्हा बोलल्यामुळे पुन्हा चर्चा झाली इतकेच.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, त्यामुळे पुरस्काराचा सन्मान होईल, हे भागवतांचे विधान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुखावणारे, तर काँग्रेसला डिवचणारे आहे. संघविचाराचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यामुळे संघाला ‘अच्छे दिन’ आले हे खरे नाही, तर संघामुळेच भाजपला वैभव प्राप्त झाले, ही स्पष्टोक्ती, तसेच वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर सरसंघचालक पदावर कायम का आहोत, याविषयी प्रांजळ कबुली, असे भागवतांच्या बोलण्यातील आणखी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यावरून वाद उभा झाल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. कारण, असे मानले जाते की, संघ तसा कधीच बदलत नाही. बदल दिसलेच तर ते वरकरणी असतात. संघविचाराचा गाभा कायम राहतो. असो.
शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती. मुंबईच्या वरळी सेंटरमधील दोन दिवसांच्या संवादाचा विषयच मुळात ‘संघाची शताब्दी व नवे क्षितिज’ असा होता. तेव्हा, या वरवरच्या कथित वादग्रस्त मुद्यांच्या पलीकडे सरसंघचालकांनी कोणते नवे क्षितिज समाजासमोर, देशासमोर ठेवले हे पाहणे गरजेचे ठरते. या अनुषंगाने भागवत यांची दोन विधाने ठळक आहेत. पहिले-अगदी अनुसूचित जाती किंवा जमातीसह हिंदू धर्मातील कोणीही रा. स्व. संघाचे सरसंघचालक बनू शकते आणि दुसरे- स्वच्छ व नैतिक अशा आदर्श कारभाराची सुरुवात व्यक्तींपासून व्हायला हवी. हे खरे आहे की, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची, व्यवस्थेची अपेक्षा मतदारांनी सरकारकडून धरायला हरकत नाही; परंतु अशा आदर्श व्यवस्थेची सुरुवात व्यक्तींपासून होते. व्यक्ती किंवा समाज नैतिक असेल तरच व्यवस्था तशी असू शकते. भागवतांचे याविषयीचे विधान एक कटू सत्य, जळजळीत वास्तव आहे.
सामान्य माणूस आणि विशेषत: राजकीय कार्यकर्त्यांचा वर्ग अत्यंत भाबडेपणाने शासन, प्रशासनाकडून स्वच्छ कारभाराची अपेक्षा बाळगतो. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात, दैनंदिन व्यवहारात स्वत:पासून तो स्वच्छतेची सुरुवात करीत नाही. भ्रष्टाचाराला राजमान्यता नंतर मिळते, आधी लोकमान्यता मिळालेली असते. तेव्हा, भ्रष्टाचारमुक्ती हवी तसेल तर प्रत्येक नागरिकाने स्वत:पासून सुरुवात करायला हवी. तो आग्रह केवळ वैयक्तिक पातळीवर नसावा. त्याविरुद्ध सार्वजनिक पातळीवर सतत बोलायलाही हवे, हे सरसंघचालकांना अभिप्रेत आहे. संघाची स्थापना, रचना व वाटचाल ही एका विशिष्ट जातीभोवती, म्हणजेच ब्राह्मण समाजाभोवती केंद्रित आहे, हा गेल्या शंभर वर्षांमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेेला मुद्दा आहे. बहुजन, दलित, अल्पसंख्याक समाज संघापासून दूर राहण्याचे हेच कारण आहे.
या मुद्यावर बोलताना भागवतांनी, संघ जात-पात मानत नाही, हिंदू समाजाचा एकत्रित विचार करतो असे पुन्हा एकदा सांगताना कोणत्याही जातीची, अगदी अनुसूचित जाती किंवा जमातीची व्यक्ती संघाचे प्रमुखपद भूषवू शकते, असा निर्वाळा दिला. त्याचे स्वागत करायला हवे. तथापि, संघाचे नवे क्षितिज असे सर्वसमावेशी करताना चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातींची उतरंड नाकारावी लागेल. जात-पातविरहित समाजरचनेचा पुरस्कार करावा लागेल. कारण, ही उतरंड हे हिंदू संस्कृतीचे अटळ वैशिष्ट्य आहे. कर्मावर आधारित जातीची उतरंड संघ नाकारेल का, भागवत म्हणतात तसे तळाचा माणूस सरसंघचालक होईल का, ही खूप दूरची गोष्ट झाली. खरेच असे होईल का हे कोणीही सांगू शकत नाही. तूर्तास त्या दिशेने भागवतांनी नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे.