Inside Story: 'त्या' पहाटे डार्लिंग असलेल्या अजितदादांवर भाजपाश्रेष्ठींची खप्पामर्जी का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 08:51 AM2021-07-02T08:51:27+5:302021-07-02T08:51:56+5:30

एखाद्या पक्षासोबत सत्तासंसार थाटण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यावधी निवडणुकीची स्थिती निर्माण करायची, असा एकूण भाजपचा रोख दिसतो.

Is Ajit Pawar the new 'target by Ed'? | Inside Story: 'त्या' पहाटे डार्लिंग असलेल्या अजितदादांवर भाजपाश्रेष्ठींची खप्पामर्जी का झाली?

Inside Story: 'त्या' पहाटे डार्लिंग असलेल्या अजितदादांवर भाजपाश्रेष्ठींची खप्पामर्जी का झाली?

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र भाजपमध्ये सध्यातरी फडणवीसांना फडणवीस हेच पर्याय आहेत. तिन्ही सत्ताधारी पक्षांना अंगावर घेण्यासाठी प्रदेश भाजपला त्यांची फार गरज आहे.

देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीत गेले. त्यांच्या दोन भेटींविषयी कुठे लिहिले गेले नाही. एकतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तासभर भेटले आणि दुसरे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली. या दोन्ही भेटींमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधीची पुढील रणनीती नक्कीच ठरली असेल. फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात, थिंकटँकमध्ये हळूहळू सामावले जात आहेत. त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. कर्नाटकमध्ये वादग्रस्त सीडीमुळे मंत्रिपद गमवावे लागलेले आणि कमालीचे नाराज असलेले  रमेश जरकीहोळी हे नुकतेच मुंबईत येऊन फडणवीस यांना भेटले. ‘फडणवीस माझे नेते आहेत’, असे ते म्हणाले. बिहारचे मंत्री शाहनवाज हुसेन हेही फडणवीसांना मुंबईत येऊन भेटले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावर असताना फडणवीस केंद्रात जाणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते दिल्लीत गेले, तर पक्षाची राज्यात दुरवस्था होईल, ही एकच बाब त्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये सध्यातरी फडणवीसांना फडणवीस हेच पर्याय आहेत. तिन्ही सत्ताधारी पक्षांना अंगावर घेण्यासाठी प्रदेश भाजपला त्यांची फार गरज आहे.

सध्याच्या घटनाक्रमाने भाजपचे आमदार, नेते, कार्यकर्तेही गोंधळलेले दिसतात. अनिल देशमुख यांची ईडी चौकशी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची भाजपने थेट अमित शहांकडे केलेली मागणी यावरून एकाच वेळी राष्ट्रवादी व शिवसेनेला हेडऑन घेण्याचे भाजप श्रेष्ठींनी ठरविलेले दिसते. ‘आता सरकार स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाला डोळा मारायचा नाही, महाआघाडीतील  दोन पक्षांपैकी कोणाला भाजपसोबत सरकार स्थापन करायचे असेल, तर त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे, त्यानंतरच सरकार स्थापनेचे बघू. तूर्त केंद्रीय तपास यंत्रणा भुसभुशीत जमीन असलेल्या मंत्र्यांना घेरतील तेवढे घेरू देत’, असे राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्लीहून बजावण्यात आल्याचे समजते.  एखाद्या पक्षासोबत सत्तासंसार थाटण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यावधी निवडणुकीची स्थिती निर्माण करायची, असा एकूण भाजपचा रोख दिसतो.

शिवालिक, भोसले, जाधव
गैरमार्गाने आलेला पैसा शेल कंपन्यांना हवालाद्वारे पाठवायचा आणि तिथून तो आपल्या संस्थांकडे देणग्या म्हणून वळवायचा ही  मोड्स ऑपरेंडी वापरणारे दोन मंत्री चौकशीच्या रडारवर येऊ शकतात. आपल्याकडे पकडला गेला तो चोर असतो, बाकीचे साव. ‘केंद्रीय तपास यंत्रणांपासून आम्हाला कृपया वाचवा,’ अशी विनवणी करत काही जण फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्याचे उंबरठे झिजवत आहेत. ‘सागर’चे सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तर धक्कादायक नावे समोर येतील. गेल्या आठवड्यात स्वत:चे गृहनिर्माण वाचविण्यासाठी एक ठाणेदार दोन तास भेटून आले. अर्थात, फडणवीस असे कोणाला वाचवण्याच्या भानगडीत कधीही पडत नाहीत. त्यामुळेच त्यांचा धाक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपची खप्पामर्जी दिसते. एकदा पहाटे-पहाटे ते भाजपचे डार्लिंग बनले होते. मात्र, आता  अजित पवार पुन्हा पहाटे राजभवनवर येण्याची शक्यता संपली आहे. असे म्हणतात की, अनिल देशमुख प्रकरणात काही अन्य नेत्यांचे ‘मनी ट्रेल’ ईडीच्या हाती लागले आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरले जाऊ शकते. भाजपला त्याची कुणकुण लागल्यानेच थेट अमित शहांना पत्र लिहिले गेले. आता शहा आपल्याच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने केलेली मागणी केराच्या टोपलीत तर नक्कीच टाकणार नाहीत. सर्व काही ठरवून होताना दिसत आहे.  शिवालिक, भोसले, जाधव यांच्या संपत्तीवर टाच आणून कोणाची रसद बंद करविली जात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तशी ही माणसे सर्वपक्षीय आहेत. त्या-त्यावेळी त्यांनी सगळ्यांनाच खुश केले; पण अलीकडे त्यांनी घड्याळाचे  अधिक लाड चालवलेले दिसतात.
- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

Web Title: Is Ajit Pawar the new 'target by Ed'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.