अग्रलेख: उसाची एआय शेती! उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:13 IST2025-06-15T08:12:29+5:302025-06-15T08:13:40+5:30

एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे.

AI farming of sugarcane! 30 percent increase in production | अग्रलेख: उसाची एआय शेती! उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ

अग्रलेख: उसाची एआय शेती! उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ

नीलेश नलावडे, तुषार जाधव 
कृषी विज्ञान केंद्र, बारामती

एआय... आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज ‘एआय’चा शिरकाव झाला आहे. एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे. शेतीतही एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे. ऊसाची शेतीही आता एआय तंत्रज्ञानावर करण्याचे युग अवतरले आहे. ॲग्रिकल्चर डेव्हेलोपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या मार्गदर्शनानुसार काही शेतकऱ्यांनी एआयवर उसाची शेती सुरू केली आहे. त्याचे निष्कर्ष खूपच चांगले आहेत. 

एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी संगणकीय प्रणाली. त्यात शिकण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता असते. एआय केवळ एक तंत्रज्ञान नाही, तर मानवी जीवनात परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. ती आपली भविष्यातील साथीदार ठरू शकते. एआयची सुरुवात १९५० साली अमेरिकेत झाली. संगणक वैज्ञानिक ॲलन ट्यूरिंग यांनी मशीन विचार करू शकते का? या प्रश्नावर आधारित संशोधनाला सुरुवात केली. त्यातून एआयचा जन्म झाला. 

एआयची कार्यपद्धती
ड्रोन, सेन्सरमार्फत जमीन, पीक आणि हवामानातील घटकाची माहिती संकलित केली जाते. मागील अनेक वर्षांतील पारंपरिक पद्धतीने एकत्रित केलेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. एआय तंत्रज्ञानाने विश्लेषित केलेल्या आणि नकाशावरून हवामान, पीक उत्पादन, रोग व किडींचा प्रादुर्भाव यांचा अचूक अंदाज येतो. मोबाइलद्वारे किंवा ड्रोनद्वारे पिकांच्या घेतलेल्या फोटोवरून रोग व कीड तसेच अन्नद्रव्य कमतरतेची अचूक माहिती मिळते.

एआयमुळे होणारे फायदे
- पेरणीची वेळ ठरवता येते.
- अचूक पाणी व्यवस्थापन करता येते.
- हवामानानुसार संभाव्य रोगांची माहिती मिळते, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. योग्य हवामानानुसार ऊस शेतीचे नियोजन करता येते. 
- पूर, दुष्काळ या आपत्तींसाठी पूर्वसूचना मिळते.
- उसाच्या उत्पादन खर्चात बचत होते. अनावश्यक खते, पाणी, संसाधने वाचतात. 
- एआय आणि अचूक उपग्रह नकाशा प्रणालीच्या साहाय्याने ऊस शेतीच्या उत्पादनात  ३५% ते ४०% पर्यंत वाढ मिळते.
- मातीतील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत.
- शेतकऱ्यांना प्रती टन २०० रुपयांपर्यंत अधिकचा नफा मिळण्यास मदत होईल.

एआय ठरले गेम चेंजर
- एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ
- महाराष्ट्रात ऊस उत्पादनातून मिळणारे एकूण उत्पन्न : ३०,००० कोटी ते ३५,००० कोटी 
- एआयमुळे उत्पादनामध्ये ३०% वाढ : अपेक्षित उत्पन्न : ४५,००० कोटी रुपये

Web Title: AI farming of sugarcane! 30 percent increase in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.