शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘मसाप’ : १२० वर्षांच्या वाटचालीची समृद्ध कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:09 IST

महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२० वा वर्धापन दिन २६ व २७ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त..

मृणालिनी कानिटकर - जोशीज्येष्ठ कवयित्री

कालपटलावरची ११९ वर्षे सरली आहेत. या शतकाने अनेक चढ-उतार पाहिले. देशाचा स्वातंत्र्य लढा, सामाजिक समतेसाठी-बंधुतेसाठी चाललेल्या चळवळी, स्त्री शिक्षण, रुढी परंपरांच्या जोखडातून मुक्त होण्याचे प्रयास इथपासून ते आजच्या अनेक चांगल्या वाईट बदलांची साक्ष देणाऱ्या संगणकीय क्रांतीच्या युगापर्यंतची ही वाटचाल. या वाटचालीत साहित्यिकांच्या आधुनिक उदारमतवादी विचारांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या साहित्याचा मोठा प्रभाव समाजमनावर पडला. 

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलनाची सुरुवात केली होती. समाजहिताच्या दृष्टीने वैचारिक आदान-प्रदान व्हावे, तसेच साहित्य परंपरा टिकून राहावी हा त्यामागचा उद्देश. चौथे ग्रंथकार संमेलन २७ मे १९०६ रोजी मळेकर वाड्यात भरले होते. प्रसिद्ध कवी गोविंद वासुदेव कानिटकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाच्या समारोपप्रसंगी साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्याला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक जडण घडणीचा, संवर्धनाचा जणू पायाच रचला गेला. या नंतरच्या १२० वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) हा वारसा अतिशय कसोशीने जपला, संवर्धित केला. 

मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन ही अतिशय वेगळी संकल्पना महाराष्ट्र साहित्य परिषदेने यशस्वी करून दाखवली. आतापर्यंत झालेल्या ९८ साहित्य संमेलनांपैकी पहिली ४५ संमेलने  महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरविली होती. पुढे १९६० साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यावर ही संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने आयोजित केली जातात. साहित्य संमेलनाची अशी दीर्घ आणि समृद्ध परंपरा मराठी भाषेतच आढळते. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था. या संस्थेच्या स्थापनेपासून ते आजवर परिषदेने साहित्य सेवेची आपली परंपरा अखंडीत चालू ठेवली आहे. गेल्या दोन दशकात तर परिषदेत अनेक चांगले बदल घडून आले आहेत. अधिकाधिक लेखक, कवी, वाचक, रसिक परिषदेशी जोडले जात आहेत. फक्त पुण्यातच नाही तर लहान-लहान गावांतील साहित्यिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे. परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १६ जिल्ह्यांतील गावांमध्ये परिषदेच्या शाखा आहेत. त्यांच्या मार्फत  अनेक उपक्रम घेतले जातात. शिवार संमेलनांची कल्पना तर अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय झाली आहे. परिषदेकडे मोठ्या विश्वासाने पुरस्कार देण्यासाठी अनेक देणग्या सुपुर्द केल्या जातात. या पुरस्कारांसाठी योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना पुरस्काराने गौरविले जाते. 

मराठी भाषेची गळचेपी होऊ नये, तसेच महाराष्ट्रातच मराठी उपेक्षित राहू नये, यासाठी महाराष्ट्रात मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करावा, यासाठी  मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात साहित्य परिषदेचा महत्वपूर्ण सहभाग होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळावा, यासाठी परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांद्वारे एक लाख पत्रे पाठवणे, सततचा पत्रव्यवहार, दिल्लीत धरणे आंदोलन अशा अनेक मार्गांचा वापर करून आपली मागणी सरकारसमोर प्रभावीपणे मांडली. मराठी भाषेच्या प्रसार व वृद्धीसाठी परिषदेतर्फे मराठी भाषेचे वर्ग व परीक्षा घेतल्या जातात. 

साहित्य परिषदेचे अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांमध्ये प्रकाशित करून आपल्या अमूल्य साहित्यिक व सांस्कृतिक ठेव्याचे जतन परिषदेने केले. बदलत्या काळाला अनुसरून हे खंड ई-बुक स्वरूपातही आणले आहेत. परिषदेच्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह कोशाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सर्व कार्यकारी मंडळाने यशस्वी केले.  

येत्या तीन वर्षांसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याकडे आले आहे. ९९, १०० आणि १०१ वे साहित्यसंमेलन आयोजित करण्याची संधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. सकस साहित्यातून निरोगी समाजमने घडविण्याच्या उद्दिष्टाचा प्रभाव या साहित्य संमेलनांवर नक्की दिसेल आणि साहित्याच्या या समृद्ध आणि वैभवी परंपरेचा वारसा परिषद समर्थपणे पुढे नेईल, याची खात्री वाटते.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी