आॅनलाइन लोकमतधुळे : दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक आवड आहे, याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोबाईलद्वारे कल चाचणी घेण्यात येत आहे. एका महिन्यात धुळे जिल्ह्यात ४६७ नोंदणीकृत शाळांमधील २९ हजार १५० पैकी २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली. त्याची टक्केवारी ९९.६३ एवढी असल्याची माहिती कल चाचणीच्या जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे.भविष्यातील करिअरच्या वाटा निवडताना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे.दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.चाचणी घेण्यास मुदतवाढजिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी मोबाईल अॅपचा तसेच संगणकाचा वापर करण्यात येत आहे. ही चाचणी १८ जानेवारी २०२०पर्यंत घेण्याचे आदेश होते. मात्र आता कलचाचणी घेण्यास मुदतवाढ मिळालेली असून, ३१ जानेवारीपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २९ हजार १५० एवढी आहे. २८ जानेवारी अखेरपर्यंत २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे.जिल्ह्यात कल चाचणीचे प्रमाण ९९.६३ टक्के एवढे असल्याचे सांगण्यात आले. यात धुळे ग्रामीणमध्ये ६ हजार ४७३, धुळे शहरात ६ हजार ६३४,साक्री तालुक्यातील ६ हजार २५४, शिंदखेडा तालुक्यातील ४ हजार ६३०, शिरपूर तालुक्यातील ५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल चाचणी दिलेली आहे.यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, तसेच कलचाचणीच्या जिल्हा समन्वयक तथा डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील, समुपदेशक डी.बी.पाटील यांचे सहकार्य लाभत आहेत.