धाराशिवमध्ये खाकीसाठी संग्राम! पोलिस दलात चालकाच्या २५ जागांसाठी १० हजार अर्जांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:30 IST2026-02-05T13:30:32+5:302026-02-05T13:30:57+5:30
या उमेदवारांच्या पुढील चाचण्यांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

धाराशिवमध्ये खाकीसाठी संग्राम! पोलिस दलात चालकाच्या २५ जागांसाठी १० हजार अर्जांचा पाऊस
धाराशिव : जिल्हा पोलिस दलातील रिक्त पोलिस शिपाई व चालक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. यानंतर चालक पदाच्या अवघ्या २५ जागांसाठी १० हजारांहून अधिक अर्ज पोलिस दलाकडे दाखल झाले आहेत. आता ११ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत संबंधित उमेदवारांची पुढील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.
धाराशिवच्या जिल्हा पोलिस दलात रिक्त झालेल्या २५ चालक शिपाई व १२३ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली आहे. चालक पदासाठी १० हजार ३८५ तर पोलिस शिपाई पदासाठी ४ हजार ८१७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांच्या पुढील चाचण्यांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यात पहिल्यांदा शारीरिक मोजमापाची चाचणी होणार आहे. या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. चालक पोलिस शिपाई पदाच्या उमेदवारांची ५० गुणांचीच कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी एकाच दिवशी चाचणी आल्यास त्यांना दुसरी तारीख देण्यात येणार असल्याचे पोलिस दलाकडून कळवण्यात आले आहे. चाचणीसाठी येताना उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेशपत्र, आधार, पॅन, मतदान कार्ड, चालक परवाना, शैक्षणिक कागदपत्रे व ५ पासपोर्ट साईझ छायाचित्रे सोबत आण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आमिषाला बळी पडू नका
ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेत कसलीही अनधिकृत मदत, शिफारस किंवा पैसे घेवून लाभ देणे शक्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींच्या आमिषाला, भूलथापांना उमेदवारांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी केले आहे.