अवकाळी धो-धो, दुकानांमध्ये घुसले पाणी! व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान
By राजकुमार जोंधळे | Updated: May 30, 2025 08:33 IST2025-05-30T07:48:21+5:302025-05-30T08:33:40+5:30
बाजार चौकातील २२ ते २५ दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी धो-धो, दुकानांमध्ये घुसले पाणी! व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान
राजकुमार जोंधळे
ईट (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील ईट परिसरात गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह धो-धो अवकाळी पाऊस कोसळला. बाजार चौकातील २२ ते २५ दुकांनामध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ईटसह परिसरात गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जवळपास तासभर पाऊस झाला होता. यानंतर उघडीप दिली. दरम्यान रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीडतास धो धो अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे मुख्य बाजार चौकामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले झाले होते. पाण्याचा फ्लो वाढल्यानंतर साधारणपणे सव्वादहा वाजता बाजारपेठेतील २५ ते २५ दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामध्ये व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
वीज मीटर पाण्यात...
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसात महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण शहरात काळोख पसरला होता. परिणामी अंधारात दुकानातील साहित्य हलविणे व्यापाऱ्यांसाठी कठीण झाले होते. एकेका दुकानाचे मीटरही पाण्यात बुडाले होते.
शाळेची संरक्षक भिंत ढासळली...
धो धो पाऊस झाल्याने जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ढासली. तसेच विद्युत पोल आडवे झाले असून ताराही तुटल्या आहेत.