उस्मानाबाद : उसतोड संबंधीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना परंडा तालुक्यातील वारेगव्हाण येथे ५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी परंडा ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
वाणेगव्हाण येथील पाटील कुटुंबीयांतील फुलचंद, यशवंत, भालचंद्र, सुमित, विश्वजीत, सुजीत, चेतन, सचिन, दुष्यंत, प्रताप, संग्रामसिंह यांच्या गटाचा गावातीलच जगताप कुटुंबीयांतील शहाजी, शिवाजी, सुषेन, सूरज, विलास, बाबुराव यांच्या गटाशी ५ फेब्रुवारी रोजी ऊसतोड संबंधीच्या कारणावरून वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, दगड, काेयता, कुळवाची फास, काठीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी दोन्ही गटांतील सदस्यांनी परंडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करीत आहेत.
दगड नेल्याच्या कारणावरून एकास मारहाण
उस्मानाबाद : शेतातील दगड नेल्याच्या कारणावरून दाम्पत्याने एकास बेदम मारहाण केली. ही घटना लोहारा तालुक्यातील भातांगळी येथे २ फेब्रुवारी रोजी घडली. भातांगळी येथील किरण जगताप हे आपल्या शेतात बांधावर दगड लावत होते. यावेळी शेजारील शेतकरी दाम्पत्य भरत व अनिता फत्तेपुरे यांनी तेथे येऊन किरण जगताप यांना दगड नेल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत, कत्ती, दगड, काठीने मारहाण करून जखमी केले. किरण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आर्थिक लाभावरून भावाने बहिणीस केली मारहाण
उस्मानाबाद : वडिलांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभावरून भावाने दोन बहिणींना वायरने मारहाण केली. ही घटना उस्मानाबादेत ४ फेब्रुवारी रोजी घडली.
उस्मानाबाद येथील बहीण-भाऊ वियश्री, भाग्यश्री व श्रीराम सुधाकर मुंबरे यांच्यात वाद आहे. ४ फेब्रुवारी रोजी श्रीराम मुंबरे यांनी बहिणी वियश्री व भाग्यश्री यांना राहत्या घरी लाथाबुक्क्यांनी व वायरने मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद विजयश्री मुंबरे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून श्रीराम मुंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.