दीड वर्षांपासून आरओ प्लांट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:21+5:302021-03-04T05:00:21+5:30
खामसवाडी : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये ...

दीड वर्षांपासून आरओ प्लांट बंद
खामसवाडी : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्चून सुरू केलेला आरओ प्लांट मागील जवळपास दीड-पावणेदोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना सध्या पंधरा लिटर पाण्यासाठी वीस रुपये मोजावे लागत आहेत. शासनाने गोर-गरीब लोकांची लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांसाठी गैरसोय होऊ नये यासाठी गावात तीस लाख रुपये खर्चून मंगल कार्यालय बांधले होते. यानंतर ग्रामपंचायतीने याच मंगलकार्यालयात आरओ प्लांट सुरू केला. परंतु, तोही मागील वीस महिन्यांपासून बंद ठेवल्यामुळे सध्या नागरिकांना ना मंगल कार्यालयाचा लाभ होतोय, ना आरओ प्लांटचे शुद्ध पाणी मिळतेय. नागरिक रस्त्यावर मंडप टाकून कार्यक्रम उरकत आहेत. शिवाय पिण्यासाठी देखील ग्रामस्थांना पंधरा लिटर पाण्यासाठी वीस रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांमधून देखील सदरील प्लांट सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.
कोट......
नागरिकांना अल्प दरात शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, या दृष्टीने हा प्लांट सुरू करण्यात आला. परंतु, ग्रामपंचायतीकडे हा प्लांट चालविण्यासाठी मनुष्यबळ नाही. शिवाय, यात काही बिघाडही झाले आहेत.
- दिगंबर पटणे, ग्रामसेवक
सदरील आरओ प्लांट सुरू करण्याबाबत ग्रामसेवकांना आम्ही वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. परंतु, त्यात काही बिघाड झाल्याने हा प्लांट सुरू करता येत नसल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.
- मनीषा कोळी, सरपंच
मागील वीस महिन्यांपासून आम्ही सर्व सदस्य आर ओ प्लांट चालू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. परंतु, याकडे कुणी लक्ष देत नाही. आम्ही यासंदर्भात गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी देखील तक्रारी केलेल्या आहेत.
- किरण पाटील, सदस्य ग्रामपंचायत