नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...
By चेतनकुमार धनुरे | Updated: June 11, 2025 15:10 IST2025-06-11T15:10:22+5:302025-06-11T15:10:59+5:30
मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. तो कोणाचा बाप नसतो : नारायण राणे

नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...
धाराशिव : काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथून केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी खदखद व्यक्त केली. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनीही वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगून त्यांना समज दिल्याचे बुधवारी तुळजापुरात सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बुधवारी तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘नितेशला याबाबतीत मी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणे चुकीचेच आहे. याबद्दल समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. तो कोणाचा बाप नसतो. मीही मुख्यमंत्री राहिलो आहे. तेव्हा लोक मला साहेब म्हणायचे. मात्र, मी त्यांना सांगायचो की, मी जनतेचा सेवक आहे. साहेब म्हणू नका’, असे सांगत नितेश यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वडील नारायण राणे यांनी केला.
दरम्यान, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर बोलताना ते म्हणाले, ‘प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याला कोण विचारतंय’, असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर नारायण राणे म्हणाले, ‘ते एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा.’
फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज
राज्यात भाजपाचे सरकार असून, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाबत त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.