उमरगा येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून; चार संशयितांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 18:59 IST2021-04-22T18:56:10+5:302021-04-22T18:59:31+5:30
उमरगा शहरातील कोळीवाडा, काळे प्लॉट येथील पालिकेच्या बाजार मार्केटच्या परिसरात बुधवारी सकाळी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला.

उमरगा येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून; चार संशयितांना घेतले ताब्यात
उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील मुळज रोडलगत काळे प्लॉट भागात एका २५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
उमरगा शहरातील कोळीवाडा, काळे प्लॉट येथील पालिकेच्या बाजार मार्केटच्या परिसरात बुधवारी सकाळी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून हा मृतदेह त्याच परिसरात राहणाऱ्या आकाश दत्तात्रय अबाचणे याचा असल्याची ओळख त्याच्या नातेवाइकांनी पटवली, तसेच चार- पाच जणांवर हा खून केल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व संशयित चार आरोपींना अटक केली. मृतांचा नातेवाइकांनी सांगितलेले प्रमुख दोघे आरोपी फरार आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली, तसेच उस्मानाबाद येथून दुपारी श्वानपथक आल्यानंतर घटनास्थळी श्वान नेऊन घटनास्थळी सापडलेल्या चपलेचा वासावरून माग काढण्यात आला. यावेळी श्वानाने संशयित आरोपीच्या घरापर्यंत माग काढला. दरम्यान, सायंकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
सावकारीचे कारण? नातेवाइकांचा ठिय्या...
मृत आकाश व संशयित आरोपी आकाश धोत्रे, व्यकंट धोत्रे, प्रशांत पुरातले, विकास जाधव हे सावकारी करीत होते. यातूनच मृत व आरोपींमध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून मागील काही दिवसांपासून भांडणे होत होती. मृत आकाशला आरोपीकडून तू आमच्या ग्राहकास व्याजाने पैसे देत जाऊ नकोस, नाहीतर वाईट होईल, अशी सतत धमकी देत असत. त्यातूनच आरोपींनी हा खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला असून, गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता.