कलदेव निंबाळा : डांबरी रस्त्याचेही काम सुरू
उमरगा : तालुक्यातील कलदेव निंबाळा ते दाळिंब (कल्लेश्वर मंदीराजवळील) रस्त्याच्या ओढ्यावरील दोन पुलांसह रस्ता डांबरीकरणाचे काम रविवारी सुरू करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. कलदेव निंबाळा, शास्त्रीनगर, दाळिंब या रस्त्याच्या शिवारातील पूल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी, महिला व मधल्यामार्गे शास्त्रीनगर, दाळिंबाला जाणारे प्रवाशीही करीत होते. मात्र, प्रशासनाने याकडे डोळेझाक केली होती. विशेषत: कलदेव निंबाळच्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत अत्यावश्यक मागणी होती. दरवर्षी या शिवारातील महिला शेतकरी, नागरिक व मधल्या मार्गे दाळिंबाला जाणाऱ्या प्रवाशांना पाणी व चिखलातून वाट काढावी लागत होती. पाण्यामुळे रस्ता बंद झाल्यास सालेगाव मार्गे ५ ते ६ किलोमीटर दूरवरून शेतात यावे लागत होते. यासाठी सरपंच सुनीता पावशेरे यांनीही ही मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्याकडे लावून धरली होती.
अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्याने, रविवारी या कामास प्रा.सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सुनीता पावशेरे, पं. स. चे माजी सदस्य बाळासाहेब स्वामी आदींच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी अमोल पाटील, देविदास पावशेरे, अमर नांगरे, संभाजी बिराजदार, कलाकार पाटील, राहुल स्वामी, तुकाराम बिराजदार, बालाजी पाटील, पांडुरंग पाटील, बाबुराव पावशेरे, दिगंबर पावशेरे, वैजनाथ कल्याणकर, ग्रा.प. सदस्य, योगेश दळवे, रमेश पाटील, प्रभाकर बिराजदार, दिलीप बिराजदार, उत्तम सरवदे, प्रा.रमाकांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.