उस्मानाबाद : कोरोनावर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांसाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. तरीही वाढीव बिले आकारली जाऊ नयेत, यासाठी अशा प्रत्येक रुग्णालयात ऑडिटिंगसाठी शासकीय कर्मचारी दिवसभर बसविण्यात येणार आहे. ऑडिटर्सची संख्या कमी असल्याने गरजेनुसार सध्या शाळा सुरु नसल्याने शिक्षण विभागाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे दिली.
कोरोना स्थिती व खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने राज्यात सर्वत्र आरोग्य यंत्रणेची काय तयारी आहे, याचा दौऱ्यातून आढावा घेत आहोत. यात असे दिसून येत आहे की, रुग्णसंख्या कमी होऊ लागताच टेस्टिंग कमी केल्या जात आहेत. असे होता कामा नये. आरोग्य यंत्रणेला टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पीक कर्जाच्या बाबतीत नोंदविलेले निरीक्षणही त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्हा बँका वगळता इतर सर्व बँका मोठ्या, बागायतदार शेतकर्यांनाच भरमसाठ कर्ज देत आहेत. याद्वारे भरपूर पीककर्ज वाटप केल्याचे ते दाखवतात. मात्र, आता यापुढे कर्ज दिलेल्या शेतकर्यांची संख्या वाढली पाहिजे, अशी सूचना बँकांना करीत आहोत. जेणेकरुन छोट्या शेतकर्यांनाही या कर्जाचा लाभ होईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार ओम राजेनिंबाळकर हेही उपस्थित होते.
आमदार निधीत १ कोटींची वाढ...सध्या आमदारांना ४ कोटींचा निधी दिला जात आहे. यातील १ कोटी हे कोविड कामांसाठी देण्यात आले आहेत. मात्र, आमदारांची मागणी वाढल्याने कोविड कामांसाठी त्यांच्या निधीत आणखी १ कोटी रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय लवकरच बैठकीत घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.