पद्मसिंह पाटलांचा प्रस्ताव, प्रतिभा पवार यांचा पुढाकार...'अशी' आहे अजितदादांच्या लग्नाची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:53 IST2026-01-28T18:48:01+5:302026-01-28T18:53:18+5:30
Ajit Pawar Death: तेरचा लाडका 'जावई' हरपला! लाडक्या जावयास श्रद्धांजलीसाठी पद्मसिंह पाटलांच्या वाड्यासमोर जमले हजारो ग्रामस्थ

पद्मसिंह पाटलांचा प्रस्ताव, प्रतिभा पवार यांचा पुढाकार...'अशी' आहे अजितदादांच्या लग्नाची गोष्ट!
तेर (धाराशिव): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे सासुरवाडीचे गाव 'तेर' पूर्णपणे सुन्न झाले. बारामतीचे पवार आणि तेरचे पाटील घराणे यांच्यातील ४० वर्षांचे कौुटुंबिक आणि राजकीय नाते आज एका करुण वळणावर येऊन थांबले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तेर गटातून सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील प्रचारात व्यस्त होत्या. बुधवारी सकाळी ८ वाजता विठ्ठल नगर भागात 'डोअर टू डोअर' प्रचार सुरू असतानाच, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा फोन आला. बातमी ऐकताच अर्चना पाटलांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. कार्यकर्त्यांना "मी येते," इतकेच शब्द सांगून त्या तातडीने तेर सोडून निघाल्या. काही क्षणातच गावभर बातमी पसरली आणि निवडणुकीची धामधूम थांबून संपूर्ण गाव डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाड्यासमोर जमले.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
१९८५ ची 'ती' रेशीमगाठ
तेरचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. ते खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी तेही एक. पवार व पाटील यांच्यात प्रचंड राजकीय सख्य होते. १९८५ साली खुद्द डॉ. पाटील यांनीच शरद पवार व प्रतिभाताई पवार यांच्याकडे भगिनी सुनेत्राताईंचा हात अजितदादांच्या हाती देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. यानंतर प्रतिभाताईंनी पुढाकार घेतला. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतच डॉ. पाटील यांच्या बंधूंच्या घरी झाला. पसंती कळवल्यानंतर ३० डिसेंबर १९८५ रोजी बारामतीत दोघांची लग्नगाठ बांधली गेल्याचे डॉ. पाटील यांचे विश्वासू साथी रामलिंग लामतुरे यांनी सांगितले.
शेवटचा दौरा आणि आठवणी
अजितदादांनी पाच वर्षांपूर्वी मेहुणे अमर पाटील यांच्या निधनानंतर तेरला भेट दिली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मल्हार पाटील यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त त्यांनी नळदुर्ग येथे घेतलेली सभा जिल्ह्यासाठी शेवटची ठरली. आज पक्षभेद विसरून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवून आपल्या जावयाला श्रद्धांजली वाहिली.