न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:52 IST2021-03-14T05:09:57+5:302021-03-14T06:52:05+5:30
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती.

न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी
ठाणे : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले व एटीएसकडून चौकशी करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. शनिवारच्या सुनावणीत त्यांचा अर्ज फेटाळून न्यायालयाने पुढील सुनावणी १९ मार्च २०२१ रोजी ठेवली. (There is no immediate relief from the court, Waze's anticipatory bail hearing in Thane on March 19)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांची गुप्तवार्ता विभागातून विशेष शाखा १ मध्ये बदली केली असून नागरी सुविधा केंद्र विभागाचा पदभार त्यांच्याकडे सोपविला.
दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला असून एटीएसने आतापर्यंत तीन वेळा वाझे यांची चौकशी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाबाहेर स्फाेटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्याचा तपास त्यांच्याकडे होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्यामुळे एनआयएही त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. मनसुख यांच्या पत्नीने जबाबात वाझे यांनीच पतीची हत्या केल्याचा आराेप केला.
स्वत: गैरहजर, वकिलांनी मांडली बाजू
अटक टाळण्यासाठी वाझेंनी १२ मार्चला न्यायालयात अर्ज केला. त्यावर १३ मार्चला झालेल्या सुनावणीस ते स्वत: हजर नव्हते. त्यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने तत्काळ अटकपूर्व जामीन देण्यास नकार देऊन पुढील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली.