बेरोजगारीचा विळखा अन् संशयाचं भूत; आधी पत्नीला संपवलं अन् मग स्वतः देखील टोकाचं पाऊल उचललं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:50 IST2026-02-18T12:49:45+5:302026-02-18T12:50:54+5:30
श्रवण कुमार गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. तो कोणताही कामधंदा करत नसल्याने घरात नेहमीच पैशांवरून वाद व्हायचे. घरचा संपूर्ण गाडा त्याची पत्नी ओढत होती.

AI Generated Image
एकीकडे रोजगारासाठी होणारी वणवण आणि दुसरीकडे ढासळत जाणारे मानसिक आरोग्य किती भयंकर टोक गाठू शकते, याचा प्रत्यय हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आला आहे. भरमौर भागातील लोथल गावात एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात सन्नाटा पसरला असून, मजुरी करून घर सावरणाऱ्या एका कष्टाळू माऊलीचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण कुमार आणि त्याची पत्नी बुधवारी सकाळी आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. मंगळवारी सायंकाळी हे दाम्पत्य भावाच्या घरी गेले होते. तिथे बराच वेळ घालवल्यानंतर रात्री उशिरा ते घरी परतले. मात्र, घरी परतल्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या श्रवणने घरातील धारदार दरातीने पत्नीचा गळा चिरला. पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून पतीनेही त्याच खोलीत फसाला लटकून आपली जीवनयात्रा संपवली.
कष्टाळू पत्नी आणि बेरोजगार पती
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण कुमार गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. तो कोणताही कामधंदा करत नसल्याने घरात नेहमीच पैशांवरून वाद व्हायचे. घरचा संपूर्ण गाडा त्याची पत्नी ओढत होती. ती घोडे-खच्चर चालवून आणि मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण आणि घराचा खर्च भागवत होती. मात्र, पतीला तिच्या या कष्टाचे कौतुक वाटण्याऐवजी तो वारंवार तिला मारहाण करत असे.
मुलांच्या डोक्यावरचे छत्र हरपले
या दुर्दैवी दाम्पत्याला तीन मुले आहेत. दोन मुलींची लग्न झाली असून १७ वर्षांचा मुलगा घटनेच्या वेळी घरी नव्हता. जर तो घरी असता, तर कदाचित हा अनर्थ टळला असता किंवा त्याच्याही जिवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आईचा खून आणि वडिलांची आत्महत्या या धक्क्यातून ही मुले सावरणे आता कठीण झाले आहे.
मानसिक आजाराची पार्श्वभूमी
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी श्रवण कुमार हा मानसिकदृष्ट्या खचलेला होता. त्याने यापूर्वीही एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला वाचवले होते. "आम्ही दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती भरमौरचे एएसआय यशपाल यांनी दिली.