ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश
By अजित मांडके | Updated: August 24, 2022 16:25 IST2022-08-24T16:23:56+5:302022-08-24T16:25:08+5:30
ठाणे पोलिसांनी तब्बल १४ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश
ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापुर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले १४ लाखांचे ७० मोबाईल हस्तगत करण्यात ठाणे शहर पोलीस दलातील खंडणी विरोधी पथक, व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांना यश आले आहे. ज्या नागरीकांचे फोन चोरीस किंवा गहाळ झाले असतील त्यांनी पोलिसांच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीला जाणे गहाळ होणे असे प्रकार वाढले होते. शहर पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी याबाबत आढावा बैठक घेत, त्या मोबाईलचा व आरोपींचा शोध घेण्याबाबत विशेष मोहिम राबवण्याचे आदेश खंडणी विरोधी पथक व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेला दिले होते. यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक करून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचे त्यांच्या आयएमईआय नंबरवरून तसेच दुरसंचार विभाग, भारत सरकारकडून, चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईलबाबत असलेल्या वेबसाईटच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाने १२ लाख ४० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ५५ मोबाईल जप्त केले आहेत.
७० मोबाईल केले हस्तगत
तसेच मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेने एकूण १ लाख ५० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण १५ मोबाईल असे एकूण १३ लाख ९० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ७० मोबाईल हस्तगत केले आहेत. ही कामिगरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान सोनवणो आदींसह इतर पथकाने केली आहे.