घरी बोलवून आंधळं केलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; महिलेने पतीसोबत मिळून प्रियकराला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:41 IST2025-06-22T12:26:28+5:302025-06-22T12:41:34+5:30
तेलंगणामध्ये एका महिलेने पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरी बोलवून आंधळं केलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; महिलेने पतीसोबत मिळून प्रियकराला संपवलं
Telagana Crime: तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी नालगोंडा जिल्ह्यातील नोमुला गावात एका ३४ वर्षीय व्यक्तीला त्याच्या आधीच्या प्रेयसीने आणि तिच्या पतीने झाडाला बांधून संपवले. जोडप्याने डोळ्यात मिरची पावडर टाकून आधी त्या व्यक्तीला आंधळे केले आणि नंतर काठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मृत व्यक्तीचे नाव पीडित एन. जनाय्या असून तोनोमुला गावचा रहिवासी होता. तो त्याची आई एन. प्रमीला सोबत राहत होता आणि अविवाहित होता. जनाय्याचे त्याच गावातील एका विवाहित महिलेशी बऱ्याच काळापासून संबंध होते. दोन्ही कुटुंबांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. कुटुंबियांनी दोघांनाही हे प्रेमप्रकरण मिटवण्यास सांगितले होते. मात्र तरीही जनाय्या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता.
आठ महिन्यांपूर्वी महिलेने जनाय्या विरोधात छळ केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाकरेकल पोलिसांनी त्याला अटक केली. जनाय्या एक महिना तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जनाय्या शांत होता. मात्र परत त्याने महिलेशी बोलणं सुरु केले. "जेव्हा जेव्हा माझ्या मुलाकडे पैसे होते तेव्हा ती त्याला भेटायला यायची. शुक्रवारी तिने त्याला घरी बोलावले. तो कदाचित ती घरी आहे एकटी समजून तिथे गेला असेल, पण तिचे कुटुंबीय तिथे होते आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला," असा आरोप जनाय्या याच्या आईने केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आणि तिचा पती नागराजू याने आध जनैय्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. नंतर काठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी जनय्याला त्यांच्या घरासमोरील झाडाला बांधले आणि मारहाण करत राहिले. गावकऱ्यांनी जनय्याच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर जनय्याचे इतर कुटुंबिय तिथे आले. त्यांनी पोलिसांना तिथे बोलवलून जनय्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र जनय्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जनय्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली. जनय्याच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.