कर्ज फेडण्यासाठी हैदराबादला आले, भाड्याने घरही घेतलं अन्... दरवाजा उघडताच सापडले पाच मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:08 IST2025-08-21T14:06:18+5:302025-08-21T14:08:02+5:30
तेलंगणात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कर्ज फेडण्यासाठी हैदराबादला आले, भाड्याने घरही घेतलं अन्... दरवाजा उघडताच सापडले पाच मृतदेह
Telagana Crime: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हैदराबादमधल्या या घटनेने दिल्लीतील भयानक बुरारी घटनेची आठवण करून दिली, ज्यामध्ये एकाच घरातून ११ मृतदेह सापडले होते. आता हैदराबादमधील एकाच घरात एकामागून एक ५ मृतदेह सापडले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथलं चित्र पाहून त्यांनाही धक्का बसला. सध्या सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
तेलंगणाच्या हैदराबादच्या मेहबूबपेट भागातील मकठा येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मेहबूबपेट परिसरातील मकठा येथे एका कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी, त्यांची मुलगी, जावई आणि नात यांचा समावेश आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्ही सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. लक्ष्मीय्या (६०), वेंकटम्मा (५५), अनिल (३२), कविता (२४) आणि अप्पू (२) अशी मृतांची नावे आहेत. ते कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि गेल्या सहा वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील काही नातेवाईकांनी तिथे पोहोचले. पोलीस शेजारी आणि नातेवाईकांकडे चौकशी करून मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नातेवाईक आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार, कविता एका आठवड्यापूर्वी तिच्या पतीसोबत तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती आणि घर शोधत होती. अनिलच्या एका मित्राने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्याच्याशी फोनवर बोललो होते आणि त्याने सांगितले की भाड्याने घर मिळाले आहे आणि ते गुरुवारी राहायला जातील. अनिल बांधकाम मजूर म्हणूनही काम करत होता. हे कुटुंब काही कर्ज फेडण्यासाठी हैदराबादला गेले होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा पोलिसांना संशय आहे.