रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:07 IST2025-08-28T16:06:55+5:302025-08-28T16:07:25+5:30
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभला अटक केली असून, हे हत्याकांड प्रेमप्रकरण आणि आपापसातील वादामुळे झाल्याचे समोर आले आहे.

रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला!
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या मंटू हत्याकांड प्रकरणाचा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभला अटक केली असून, हे हत्याकांड प्रेमप्रकरण आणि आपापसातील वादामुळे झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत २४ ऑगस्ट रोजी सौरभला अटक केली.
नेमके काय घडले?
सहारनपूर जिल्ह्यातील बडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिमलाना गावात २३ ऑगस्ट रोजी मंटू नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मंटूचा भाऊ संदीप याने गावातील तीन तरुण - सौरभ, मुकेश आणि संजीव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. संदीपने आरोप केला होता की, या तिघांनी मिळून मंटूला घेरले आणि प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रेमप्रकरण ठरले हत्येचे कारण!
पोलिसांनी अटक केलेल्या सौरभची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येमागील कारण ऐकून पोलीसही चक्रावले. सौरभने सांगितले की, तो आणि मंटू दोघेही एकत्र तंबू लावण्याचे काम करत होते. कामावर असताना मंटू अनेकदा त्याचा फोन सोबत आणत नसे. त्यामुळे, त्याची पत्नी सौरभच्या फोनवर कॉल करून त्याच्याशी बोलायची. यातून सौरभ आणि मंटूच्या पत्नीमध्ये जवळीक वाढली. मंटूला जेव्हा याची कुणकुण लागली, तेव्हा त्यांच्यात तणाव वाढायला सुरुवात झाली.
घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरून सौरभ आणि मंटू यांच्यात जोरदार वाद झाला आणि शिवीगाळही झाली. या वादामुळे चिडलेल्या सौरभने मंटूवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मंटूचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे.
इतर आरोपींचा शोध सुरू
पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले आहे. मात्र, या प्रकरणातील इतर दोन आरोपी मुकेश आणि संजीव यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून, पोलीस लवकरच इतर आरोपींनाही अटक करतील, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हे हत्याकांड प्रेमप्रकरण आणि वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.