सहा वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू?; अंबरनाथमधील प्रकार, पालकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:47 IST2026-02-09T08:47:11+5:302026-02-09T08:47:44+5:30
या घटनेनंतर मुलाचे पालक आणि शेकडो नागरिक डॉ. गायकर यांच्या दवाखान्याबाहेर जमले. त्यांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सहा वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू?; अंबरनाथमधील प्रकार, पालकांचा संताप
अंबरनाथ : येथे एका सहा वर्षीय मुलाचा डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मीनगरमधील या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
विजय विनोद जयस्वाल या मुलाला सर्दी- खोकल्यावरील उपचारासाठी डॉ. स्वप्नाली गायकर यांच्याकडे नेले होते. तिथे तीन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी त्याला डॉ. गायकर यांनी सलाईनमधून दोन इंजेक्शन दिले, मात्र, तिथून घरी जाताच त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला पुन्हा एकदा डॉ. गायकर यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्याचे रक्त निळे झाल्याचा दावा या मुलाच्या बहिणीने केला.
दवाखान्याला नागरिकांचा गराडा; कारवाईची मागणी
या घटनेनंतर मुलाचे पालक आणि शेकडो नागरिक डॉ. गायकर यांच्या दवाखान्याबाहेर जमले. त्यांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत डॉ. गायकर यांना पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, हे माझ्या विरोधातील कटकारस्थान असून हा एक राजकीय स्टंट असल्याचा दावा डॉ. गायकर यांनी केला आहे.
चिमुकल्याला घेऊन तीन रुग्णालयांचे मारले हेलपाटे
डॉ. गायकर यांच्या दवाखान्यात उपचार होऊ शकत नसल्यामुळे मुलाला मोठ्या रुग्णालयात दाखल केले गेले. तेथून त्याला परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले. मात्र, तेथे बेड न मिळाल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे रात्री मुलाने उपचारांना प्रतिसाद दिला, मात्र सकाळी त्याची प्रकृती खालावली. आयसीयूत उपचार सुरू असताना त्याच्या मृत्यू झाला.