राजा रघुवंशीच्या हत्येचे ५ गुन्हेगार...; ३ राज्यातल्या पोलिसांना १७ दिवस चकवा दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:08 IST2025-06-09T17:08:15+5:302025-06-09T17:08:33+5:30
राजा आणि सोनम हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. त्याठिकाणी सुपारी किलर्सने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला.

राजा रघुवंशीच्या हत्येचे ५ गुन्हेगार...; ३ राज्यातल्या पोलिसांना १७ दिवस चकवा दिला
मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांडाचे कोडे पोलिसांनी सोडवले आहे. या प्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी ३ राज्यातील पोलिसांनी दिवसरात्र एक केली. १७ दिवस मेघालय आणि मध्य प्रदेशातील पोलीस या घटनेचा तपास करत होते. अखेर पोलिसांनी राजाच्या हत्येचे रहस्य उलगडले. राजाच्या मृत्यूमागे त्याची पत्नी सोनमच मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी म्हटलं. त्याशिवाय या हत्याकांडातील अन्य ४ आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
राजा आणि सोनम हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. त्याठिकाणी सुपारी किलर्सने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला. राजाचा मृतदेह २ जून रोजी पोलिसांना सापडला. तो पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता परंतु कुटुंबाने त्याची ओळख पटवली. सोनमनेच त्याचा प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाची हत्या केली असं मेघालय पोलिसांनी सांगितले. मेघालय पोलीस अधिकारी विवेक यांनी सांगितले की, सोनमसोबत ४ अन्य आरोपींना अटक केली आहे. सर्वात आधी आकाश राजपूत याला अटक केली. ज्याचे वय १९ वर्ष आहे. तो ललितपूरचा रहिवासी आहे. अन्य आरोपींमध्ये विशाल सिंह चौहान, राज सिंह कुशवाह यांचा समावेश आहे. दोघेही इंदूरमधील आहेत. राजचे वय २१ असून तो सोनमला बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जाते.
आनंद कुर्मीने केला पहिला हल्ला
या प्रकरणी आनंद कुर्मीला अटक करण्यात आली आहे. सर्वात आधी राजावर हल्ला आनंद कुर्मी यानेच केला होता. सोनमचा शोध सातत्याने पोलीस घेत होती आणि तिलाही अटक करण्यात आली आहे. मेघालय पोलिसांची एक टीम गाजीपूरला रवाना झाली असून ती सोनमला ताब्यात घेईल. २३ मे रोजी ही घटना घडली. सुरुवातीला राजा आणि सोनम दोघेही गायब असल्याने हे हत्येचे प्रकरण मानले गेले नाही. बेपत्ता जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. परंतु २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि त्यात नवा खुलासा समोर आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक नेमण्यात आले.
सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती. या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे.