'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 08:38 IST2025-06-11T08:36:24+5:302025-06-11T08:38:20+5:30
Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्याकांडानंतर सोनम इंदूरला आल्याचा राजाच्या आईचा दावा

'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
Sonam Raghuvanshi: मेघालयमधील राजा रघुवंशी हत्याकांड ( Raja Raghuvanshi Murder ) सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाला आहे. पतीला गोड बोलून हनिमूनला नेऊन पत्नी सोनम रघुवंशीने त्याच्या हत्येची सुपारी दिली. मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडातील दररोज नवे खुलासे होत आहेत आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजा रघुवंशीची चुलत बहीण सृष्टी रघुवंशी म्हणाली की, लग्नानंतर सोनम घरी आली तेव्हा ती कायमच फोनवर चॅटिंग करत असे. ती कोणाशीही बोलत नव्हती. ती चारही दिवस तिच्या खोलीतच बसून राहिली. याशिवाय, राजा रघुवंशीच्या आईने देखील एक धक्कादायक दावा केला आहे. सोनम आणि तिच्या आईमध्ये हत्याकांडानंतर संवाद झाला असू शकतो असा त्यांचा दावा आहे.
मला कुणी लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये!
राजाची आई उमा रघुवंशी यांनी सोनम आणि तिच्या आईबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उमा म्हणाल्या की सोनमच्या आईने सांगितले होते की, सोनम त्यांच्या स्वप्नात आली होती. त्यांनी तिला विचारले की ती एकटीच कशी काय परत आली. त्यावर सोनमने सांगितले की राजा नंतर परत येईल, आता मी एकटीच आले आहे. सोनमच्या आईने स्वप्नात सोनमला पैसे आणि दागिन्यांबद्दलही विचारले. तुमच्यावर हल्ला झाला का? तुम्हाला कुणी लुटले का? असे प्रश्न विचारले. तेव्हा सोनमने उत्तर दिले की 'मला कुणी लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये!' या कथित स्वप्नावर शंका व्यक्त करताना उमा रघुवंशी म्हणाल्या की हे कदाचित स्वप्न नसून सोनम आणि तिच्या आईमधील हत्याकांडानंतरचे खरे संभाषणही असू शकते. त्यामुळे या स्वप्नातील बाबींची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उमा रघुवंशी यांनी केली.
हत्याकांडानंतर सोनम इंदूरला आली होती?
याचसोबतच, उमा यांनी असेही सांगितले की, त्यांना अलीकडेच कळले की राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी येण्यापूर्वी सोनम इंदूरला आली होती. त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, जर ती इंदूरला आली असेल तर ती कोणाच्याही संपर्कात नव्हती हे कसे शक्य आहे? मग ती इंदूरहून गाजीपूरला कशी पोहोचली? तिला गाजीपूरला सोडणारा ड्रायव्हर कोण होता? याचाही तपास व्हायला हवा.
'सोनम राजाकडे दुर्लक्ष करायची'
राजाची आई उमा रघुवंशी असेही म्हणाल्या की, राजा पूर्वी म्हणायचा की सोनम त्याच्याशी बोलत नाही. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते असे राजाने आम्हाला सांगितले होते. तिचे वडील म्हणायचे की आमची मुलगी चांगली आहे. ती घराबाहेरही जात नाही. सोनमनेच शिलाँगचे तिकीट बुक केले होते. आम्ही राजाचा आनंद पाहत होतो. तो आनंदी होता म्हणून आम्हीही आनंदी होतो. पण सोनम असे करेल हे आम्हाला माहित नव्हते, असेही राजाची आई उमा रघुवंशी म्हणाल्या.