Telangana Tejeshwar Murder Case: गेल्या काही दिवसांपासून देशात मेघालयातील राजा रघुवंशी हत्याकांडाची जोरदार चर्चा आहे. पत्नी सोनमने लग्नाच्या काही दिवसानंतरच पती राजाची हनिमूनला नेऊन हत्या केली होती. या हत्येचा कट इतका भयानक आहे की पोलीस अद्यापही तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेलंगणातील कुर्नूलमध्येही सोनमपेक्षाही भयकंर प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणात एक नवविवाहिता, तिची आई आणि एका बँक कर्मचाऱ्याने एका निष्पाप तरुणाची निर्घृण हत्या केली. लग्नाच्या एका महिन्याच्या आतच तरुणाला संपवण्यात आलं. या रक्तरंजित कटाची सूत्रधार नवविवाहित पत्नी आणि सासू होती.
३२ वर्षीय तेजेश्वरचा मृतदेह कुर्नूलमधील एका नाल्यात सापडला होता. तो १७ जूनपासून बेपत्ता होता. त्याचे लग्न १८ मे रोजी झाले होते आणि तो व्यवसायाने जमीन सर्वेक्षक आणि नृत्य शिक्षक होता. तेजेश्वरच्या कुटुंबाचा आरोप आहे की पत्नी ईश्वर्याने त्याची हत्या केली आणि तिचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी ईश्वर्याची आई सुजाता हिलाही ताब्यात घेतले. ईश्वर्याची आई सुजाता एका बँकेत काम करते आणि ईश्वर्याचे एका बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते. तिचे तेजेश्वरसोबतही प्रेमसंबंध होते आणि दोघांनी लग्नाची तयारी केली होती. लग्न फेब्रुवारीमध्ये होणार होते. पण ईश्वर्या मध्येच गायब झाल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ती परत आली आणि दोघांनीही लग्न केलं. धक्कादायक बाब म्हणजे ईश्वर्या आणि तिच्या आईचे एकाच पुरुषासोबत संबंध होते. तो सध्या फरार आहे.
कुटुंबाच्या विरोधानंतरही केलं लग्न
तेजेश्वर आणि ईश्वर्याचे लग्न मूळतः १३ फेब्रुवारी रोजी सोबत होणार होते, परंतु लग्नाच्या काही दिवस आधी ती तिच्या कुटुंबाला न सांगता घराबाहेर पडली. १६ फेब्रुवारी रोजी ईश्वर्या परतली. मात्र तेजेश्वरच्या कुटुंबाने ईश्वर्याच्या अचानक गायब होण्याने नाराज होऊन लग्न रद्द केले. त्यानंतर ईश्वर्याने तेजेश्वरशी संपर्क साधला आणि सांगितले की माझी आई सुजाता लग्नासाठी पैसे जमवण्यासाठी संघर्ष करत होती आणि ती आतापर्यंत तिच्या नातेवाईकांसोबत राहत होती. तेजेश्वरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि कुटुंबाच्याविरुद्ध १८ मे रोजी ईश्वर्याशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. ईश्वर्या सतत फोनवर एका अनोळखी व्यक्तीशी बोलत असल्याने तेजेश्वर नाराज होता.
कर्ज देण्याचे आमिष दाखवून हत्या
१७ जून रोजी संध्याकाळी, तेजेश्वर गडवाल येथे कारमधून निघाला मात्र घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी, तेजेश्वरचा भाऊ तेजवर्धन याच्या तक्रारीवरून गडवाल शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा तेजेश्वर गाडीत बसलेला दिसत होता.२१ जून रोजी एचएनएसएस कालव्यात कुजलेला मृतदेह आढळला. मृत्यूपूर्वी तेजेश्वर ज्या कारमध्ये चढला होता त्याच्या आधारे, पोलिसांनी नागेश, परशुराम आणि राजू यांना ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितले की कर्जासाठी कुर्नूलस्थित एनबीएफसीचे व्यवस्थापक तिरुमला राव यांच्याशी संपर्क साधला होता. तिघांनी सांगितले की, आम्हाला तेजेश्वरला मारण्यासाठी तिरुमला राव यांनी सुपारी दिली होती. १७ जून रोजी आ्ही गडवालमधील येरवली येथे जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने तेजेश्वरला गडवाल येथून उचलले. त्यानंतर गाडीत त्याची गळा चिरून त्याची हत्या केली.
आई आणि मुलीचे एकाच व्यक्तीशी संबंध
हत्येनंतर आरोपींनी तिरुमाला राव याची भेट घेतली आणि तेजेश्वरचा मृतदेह दाखवला. तिरुमाला रावने तिघांना २ लाख दिले. त्यानंतर आरोपींनी मृतदेह कालव्यात फेकून दिला. विवाहित तिरुमला रावचे सुरुवातीला ईश्वर्याची आई सुजाता हिच्याशी प्रेमसंबंध होते. सुजाताच्या अनुपस्थितीत, ईश्वर्या साफसफाईचे काम करत होती. तिरुमला रावनेही तिच्याशी मैत्री करत प्रेमसंबंध निर्माण केले. तिघांनी मिळून तेजेश्वरला संपवण्याचा आणि त्याची संपत्ती हडपण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी ईश्वर्या सीडीआर तपासले तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. सीडीआरवरून पोलिसांना कळले की लग्नानंतरही ईश्वर्या ज्या तिरुमाला रावसोबत लग्नापूर्वी गायब झाली होती त्याच्याशी सतत बोलत होती. सीडीआरनुसार लग्नानंतरही ईश्वर्या तिरुमाला रावशी २००० पेक्षा जास्त वेळा बोलली होती. मारेकऱ्यांना तेजेश्वरचे लोकेशन ईश्वर्यानेच दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.