नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:52 IST2025-08-06T11:52:10+5:302025-08-06T11:52:36+5:30
अनुरागने मधूकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.

नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
लखनौमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर अनुराग याची पत्नी मधूच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. लग्नाच्या सहा महिन्यांतच मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आत्महत्या नाही तर सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांनी मधूला खूप त्रास देण्यात आला. पती अनुरागने तिच्याकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
मधूची बहीण प्रियाने दिलेल्या माहितीनुसार, अनुरागला दारूचं व्यसन होतं आणि मधूलाही दारू पिण्यास भाग पाडत होता. तिने नकार दिल्यावर तो तिला मारहाण करायचा. तो मधूचा फोनही चेक करत होता आणि जर ती कोणाशी बोलली तर तिला शिवीगाळ करत होता. खूप संशय घ्यायचा. बहिणीशी बोलण्यापासूनही रोखायचा आणि दोन्ही बहिणींमधील नात्याबद्दल आक्षेपार्ह आरोपही करायचा.
मधूच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, १० मार्च रोजी अनुरागने प्लेट ठेवण्याच्या छोट्याशा कारणावरून मधूला मारहाण केली. त्या दिवशी तिने बहिणीला बोलावलं आणि म्हणाली, " तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल." प्रियाने मधूचे शेवटचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील ऐकलं, ज्यामध्ये ती खूप रडत आहे. ऑडिओ ऐकून कुटुंबाला धक्का बसला आहे. लग्नाआधी मधू खूप उत्साही होती, तिला पार्टी करायला आणि फिरायला खूप आवडायचं, परंतु लग्नानंतर तिचं आयुष्यच बदललं.
घटनेच्या एक दिवस आधी रविवारी अनुराग आणि मधू गाडीतून कुठेतरी गेले होते. अनुराग गाडीत दारू पिऊन होता, तर मधू गाडी चालवत होती. वाटेत खड्डा टाळण्यासाठी मधूने गाडी वळवली तेव्हा अनुरागने तिला टोमणे मारले आणि म्हणाला, "मुलांना पाहून तू गाडी वळवलीस का?" त्यानंतर त्याने मधूला गाडीतच मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी, दुपारी ४ वाजताच्या सुमारास, अनुरागने मधुच्या वडिलांना फोन करून सांगितलं की मधूने आत्महत्या केली आहे. कुटुंब तिथे पोहोचेपर्यंत मधुचा मृतदेह फासावरून खाली उतरवण्यात आला होता. कुटुंबाचा दावा आहे की, ही आत्महत्या असू शकत नाही, कारण मधू अशी मुलगी नव्हती जी टोकाचं पाऊल उचलेल.
मधूच्या कुटुंबाचं असंही म्हणणं आहे की, अनुराग ३० एप्रिल रोजी मर्चंट नेव्ही शिप ड्युटीवर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता आणि सहा महिने परत येणार नाही असं सांगितलं होतं. परंतु तो २२ जुलै रोजी अचानक घरी परतला. त्यानंतर बरोबर १० दिवसांनी मधूचा मृत्यू झाला. या संदर्भात कुटुंबाचं म्हणणं आहे की, अनुरागचं अचानक परतणं आणि त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू होणं हा एक मोठा कट आहे.