Tiruppur Dowry Suicide: तमिळनाडूमध्ये हुंड्यामुळे आणखी एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे. हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित तरुणीने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच या तरुणीचे लग्न झालं होतं. हुंड्यासाठी तिच्या सासरच्या लोकांनी आणि पतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. नवविवाहितेने गाडीतच कीटकनाशक गोळ्या घाऊन आत्महत्या केली.
तामिळनाडूतील तिरुपूर येथे एका नवविवाहित तरुणीने तिच्या सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. २७ वर्षीय रिधान्या कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या अन्नादुराई यांची मुलगी रिधान्या हिने एप्रिलमध्ये २८ वर्षीय कविनकुमारशी लग्न केलं होतं. अन्नादुराई यांनी मुलीच्या लग्नात खूप पैसे खर्च केले होते. ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० लाख रुपये किमतीची व्होल्वो कार भेट म्हणून देण्यात आली होती. मात्र एवढं देऊनही सासरच्यांची भूक भागली नाही आणि त्यांनी मुलीचा छळ केला असा आरोप अन्नादुराई यांनी केला.
लग्नाच्या दोनच महिन्यांमध्ये रिधान्याच्या सासरच्यांनी तिचा मानसिक आणि पतीने शारीरिक छळ करायला सुरुवात केली. ते जास्त हुंडा मागत होते. जेव्हा तिला हा छळ सहन झाला नाही तेव्हा ती मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि तिने गाडीत कीटकनाशक खाऊन आत्महत्या केली. रविवारी रिधान्या मोंडीपलयम येथील मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. वाटेत तिने गाडी थांबवली आणि कीटकनाशकांच्या गोळ्या खाल्ल्या. गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस गाडीची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांना रिधान्या आत मृतावस्थेत आढळली आणि तिच्या तोंडातून फेस येत होता.
पोलिसांनी तिला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तिचे कुटुंबिय रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपी पती कविन कुमार, त्याचे वडील ईश्वर मूर्ती आणि आई चित्रा देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी, रिधान्याने तिच्या वडिलांची माफी मागत सात व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेज पाठवले होते. मी आता हुंड्यासाठी होणारा छळ सहन करू शकत नाही, असं म्हटलं होतं. "हे लग्न एका कटाचा भाग होता. मी आता रोजचा छळ सहन करू शकत नाही. लोक मला तडजोड करण्यास सांगतात, माझे दुःख कोणीही समजत नाही. तुम्हालाही वाटत असेल की मी खोटे बोलत आहे, पण तसे नाही. सगळे ढोंग करत आहेत आणि मला माहित नाही की मी काहीही का करू शकत नाही. पण मला आयुष्यभर तुमच्यावर ओझे व्हायचे नाही. यावेळी मी कोणतीही चूक केली नाही. मला हे जगणं आवडत नाहीये," असं रिधान्याने म्हटलं होतं.