लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:06 IST2025-08-26T10:01:39+5:302025-08-26T11:06:57+5:30
नांदेडमध्ये विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची वडिलांनी हत्या करुन विहिरीत फेकल्याची घटना घडली

लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
Nanded Honor Killing: नांदेडमध्ये पुन्हा एकदा हॉनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्याने विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला विहिरीत टाकून मारल्याची घटना घडली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला मुलीच्या वडिलांनी संपवलं. विवाहित मुलीच्या वडिलांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला हात पाय बांधून विहिरीत फेकलं. पाण्यात बुडाल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांपासून एकाच गावात राहणाऱ्या दोघांचेही प्रेमसंबंध होते. मात्र गेल्यावर्षी मुलीचे लग्न झालं होतं. सोमवारी प्रियकर मुलीने बोलवल्यामुळे तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला होता. मात्र मुलीच्या वडिलांनी तिथे दोघांनाही संपवलं. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात पित्याने पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली. पित्याने दोघांचेही हात पाय बांधून त्यांना चाळीस फूट खोल असलेल्या विहरीत फेकून दिलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहरीतून बाहेर काढले, तर मुलाचा शोध सुरुच होता. धक्कादायक बाब म्हणजे दोघांच्याही हत्येनंतर आरोपी पिता स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
संजीवणी कमळे आणि लखन बालाजी भंडारे अशी मृतांची नावे आहेत. संजीवनी ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी गोळेगाव इथल्या सुधाकर कमळे याच्यासोबत संजीवनीचा लग्न झालं होतं. विवाहापूर्वी संजीवनीचं लखन भंडारे याच्यासोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. लग्नानंतरही ही दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सोमवारी संजीवनीने प्रियकराला घरी बोलवले. त्यावेळी संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी दोघांना एकत्र पाहिल्यामुळे तिच्या वडिलांना बोलवून घेण्यात आलं आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी मुलीचे काका आणि आजोबादेखील सोबत होते.
झालेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी दोघांनाही गावी आणलं. त्यानंतर करकाळा शिवारात दोघांना मारहाण करुन संजीवनी आणि लखनचे हात-पाय बांधून त्यांना विहिरीत फेकून दिलं. मुलीने लखनला फोन करुन बोलवून घेतलं होतं. तिथे गेल्यावर त्याला पकडलं. त्यानंतर माझ्या मुलाने मित्राला फोन केला. मित्राने मला फोन करुन असा प्रकार घडल्याचे सांगितले. त्यांनी तुमच्या माणसांना घेऊन या आपण मिटवून टाकं असं सांगितले. त्यामुळे आम्ही निघालो. मात्र त्याआधीच मुलाला तिथून गायब केलं होतं, असं लखनच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी मुलीचे वडील मारोती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांना अटक करण्यात आली. मुलीचा मृतदेह सापडला असून मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.