Mumbai Crime: उबरच्या ड्रायव्हरचा दादर ते पुणे प्रवास ठरला शेवटचा; गाडी गॅरेजमध्ये तर मृतदेह सापडला टोलनाक्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:38 IST2025-06-24T15:32:48+5:302025-06-24T15:38:22+5:30
Mankhurd Murder Case: मुंबईतल्या तरुणाची हत्या करुन मृतदेह पुण्याजवळ फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime: उबरच्या ड्रायव्हरचा दादर ते पुणे प्रवास ठरला शेवटचा; गाडी गॅरेजमध्ये तर मृतदेह सापडला टोलनाक्यावर
Mumbai Crime:मुंबईतील उबर कॅब ड्रायव्हरच्या 'मिसिंग मिस्ट्री'चा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. मानखूर्द पोलिसांनी दोन दिवसांच्या कसून तपासानंतर बेपत्ता उबर चालकाच्या प्रकरणाचा तपास लावला. पोलिसांना तपासादरम्यान, उबर चालकाची हत्या झाल्याचे कळलं. त्यानंतर पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला लगेचच अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे बेपत्ता असलेल्या उबर चालकाची हत्या करणारा त्याचाच मित्र आहे.
कारच्या व्यवहारातून मित्रानेच उबर चालकाची हत्या केल्याचे मानखुर्द पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मोहम्मद सलिम अब्दुल करीम वाहीद अन्सारी (३०) असे मृत उबेर चालकाचे नाव आहे. तो १९ जूनपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी प्रवासी घेऊन पुण्यात गेल्यापासून तो बेपत्ता होता. नातेवाइकांनी संपर्क साधला, पण तो झाला नाही. अखेर त्याच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अन्सारीच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अन्सारीची कार भोसरी पुणे येथे आढळली. त्यानंतर त्या परिसरात कार पार्क करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी उर्स टोलनाक्याजवळ एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे धाव घेतली असता तो मृतदेह अन्सारीचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सलीमच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली. पोलिसांनी अन्सारीच्या मोबाइलवर आलेले आणि त्याने केलेले कॉल याचाही पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल नाका आणि खासगी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी आदित्यला लातूर येथून अटक केली.
चौकशीदरम्यान आदित्यने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्याने सलीमशी त्याची गाडी खरेदी करण्याबाबत बोलणे केलं होते. १८ जून रोजी दोघेही दादरमध्ये भेटले आणि तेथून ते पुण्याला निघाले. वाटेतच दोघांमध्ये पैशांवरून वाद झाल. आदित्यने संतापाच्या भरात डॅशबोर्डमध्ये ठेवलेल्या चाकूने सलीमची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पळ काढला. गाडी खराब झाल्यावर, आदित्यने टोइंग व्हॅनच्या मदतीने ती भोसरीतील एका गॅरेजमध्ये सोडली. पोलीस गाडीपर्यंत पोहोचल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.